जगभरात कोविड-१९ च्या वाढत्या प्रादुर्भावमुळे अनेक क्रिकेट स्पर्धा स्थगित करण्यात आल्या होत्या. परंतु आता बायो बबलच्या सुरक्षेमुळे क्रिकेट विश्वात स्पर्धांना पुन्हा एकदा जोरदार सुरवात झाली आहे. अनेक सामने हे यामुळे सुरक्षितपणे पार पाडण्यात आले आहेत. परंतु अनेक खेळाडूंनी त्याचवेळी बायो बबलबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. परंतु भारतीय संघाच्या श्रीलंका दौऱ्यासाठीचा कर्णधार शिखर धवनने याबाबत चांगली प्रतिक्रिया दिली आहे.
सलामीवीर शिखर धवनने कोविड कालावधीत आंतरराष्ट्रीय क्रिकेटसाठी आवश्यक असलेली बायो-सेफ बबलची सकारात्मक बाजू स्पष्ट केली. अनेक खेळाडूंनी बायो बबलमुळे मानसिक थकव्याचा मुद्दा उपस्थित केला आहे. पण धवन म्हणतो की सामन्यानंतर जेव्हा खेळाडू एकमेकांशी संवाद साधतात तेव्हा बायो बबलमुळे आयुष्य पूर्वीसारखे झाल्याचे वाटते. बायो बबलमुळे खेळाडूंमध्ये मैत्री निर्माण होते आहे, असे धवन म्हणाला.
संघ श्रीलंकेला रवाना होण्यापूर्वी धवनने माध्यमांना सांगितले की, “जेव्हा आम्ही आयपीएलमधून घरी गेलो होतो तेव्हा आम्ही विश्रांती घेतली आणि इतक्या दिवसानंतर आमच्या कुटुंबियांसमवेत वेळ घालवला. यावेळी आमचे प्रशिक्षणही चालूच राहिले.”
धवन पुढे म्हणाला, “आमच्याकडे ज्येष्ठ आणि तरुण खेळाडूंचे चांगले मिश्रण आहे. ज्येष्ठ म्हणून आमच्याकडे तरुणांना अनुभव सांगण्याची एक चांगली संधी आहे. १०-१५ वर्षांपूर्वी ती संस्कृती चालू होती, जेव्हा दिवसाची खेळ संपल्यानंतर सर्व खेळाडू एकत्र राहत असत. बायो-बबलमुळे हे आयुष्य परत येत आहे. आम्ही एकत्र वेळ घालवत आहोत. हे बाँडिंगमध्ये मदत करत आहे. ते एक चांगल्या संघाचे लक्षण आहे. मला विश्वास आणि खात्री आहे की आम्हाला एकमेकांच्या अनुभवाचा फायदा होईल.”
भारतासाठी १४२ एकदिवसीय सामने आणि ६५ टी -२० आंतरराष्ट्रीय सामने खेळलेला धवन म्हणाला की, “भारताचा कर्णधार होणे हा माझ्यासाठी मोठा सन्मान आहे. मी राहुल (द्रविड) भाई यांच्याबरोबरही काम करत आहे. मी बांगलादेशात भारत ‘अ’ संघाचा कर्णधार असताना मी त्यांच्या प्रशिक्षणाखाली खेळलो होतो. आम्ही एकमेकांशी सुसंवाद साधतो. आम्हाला असे वातावरण हवे आहे की ज्यात खेळाडू स्वतःला व्यक्त करू शकतात, अशाच प्रकारे आम्ही त्यांच्यातून सर्वोत्कृष्ट प्रदर्शन काढून घेऊ शकतो.”
विराट कोहली आणि रोहित शर्माच्या अनुपस्थितीत धवनच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ तीन एकदिवसीय आणि तीन टी20 सामन्यांच्या मालिकेसाठी श्रीलंका दौरा करेल. भारत तीन एकदिवसीय सामने (१३-१८ जुलै) आणि तीन टी -२० आंतरराष्ट्रीय सामने (२१-२५ जुलै) श्रीलंकेत खेळेल.
महत्वाच्या बातम्या
शेफाली वर्मा १७ नव्हे तर २८ वर्षांची? जाणून घ्या काय आहे नक्की प्रकरण