बंगळुरु। आज(19 जानेवारी) भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात एम चिन्नास्वामी स्टेडियममध्ये तिसरा आणि निर्णायक वनडे सामना सुरु आहे. या सामन्यात भारतीय संघ हाताला काळी पट्टी बांधून मैदानात उतरला आहे.
भारताचे माजी दिग्गज क्रिकेटपटू बापू नाडकर्णी यांचे शुक्रवारी(17 जानेवारी) निधन झाले. त्यांचे 86 वय होते. त्यामुळे त्यांना आदरांजली वाहण्यासाठी भारतीय संघातील खेळाडूंनी आजच्या सामन्यात हाताला काळी पट्टी बांधली आहे.
नाडकर्णी यांनी 1955ला न्यूझीलंड विरूद्ध दिल्लीमध्ये कसोटीमध्ये पदार्पण केले होते. तर त्यांनी शेवटचा कसोटी सामना ऑकलॅडमध्ये न्यूझीलंडविरूद्धच 1968 मध्ये खेळला होता.
तसेच त्यांच्या नावावर कसोटीमध्ये एका डावात सलग 21 षटके निर्धाव टाकण्याचा विक्रम होता. त्यांनी 1964 मध्ये इंग्लंड विरूद्ध मद्रास कसोटीमध्ये सलग 21 षटके निर्धाव षटक टाकले होते. त्यावेळेस त्यांनी एकूण 32 षटकांमध्ये 27 षटके निर्धाव टाकत फक्त 5 धावा दिल्या होत्या. यातील सलग 21 षटके निर्धाव होती.
त्यांनी भारतासाठी 41 कसोटी सामने खेळले. या सामन्यांमध्ये त्यांनी 1414 धावा केल्या तर 88 विकेट देखील घेतल्या आहेत. तसेच त्यांनी 191 प्रथम श्रेणी सामने खेळले. त्यात त्यांनी 500 विकेट्स घेतल्या तर 8880 धावा देखील केल्या आहेत.
आज सुरु असलेल्या भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया वनडे सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.






