ट्यूनब्रिज वेल्समधील नेव्हिल क्रिकेट मैदानात दि. १८ जून १९८३ रोजी भारत विरुद्ध झिम्बाब्वे हा विश्वचषकातील सामना खेळवला गेला होता. तत्कालीन भारतीय कर्णधार कपिल देव (Kapil Dev) यांनी झिम्बाब्वेविरुद्ध विश्वचषकाच्या या सामन्यात १७५ धावांची नाबाद ऐतिहासिक खेळी केली होती. वनडेतील त्यावेळची वर्ल्डकपमधील ही सर्वात मोठी खेळी होती.
भारताच्या १७ धावांवर ५ विकेट्स गेल्या असताना कपिलने केवळ १३८ चेंडूत १६ चौकार आणि ६ षटकारांसह १७५ धावांची खेळी साकारली होती. पुढे त्याच आत्मविश्वासाच्या जोरावर गतविश्वविजेते वेस्ट इंडिजलाही पराभूत करून विश्वचषक भारताला मिळवून दिला.
त्या झिम्बाब्वेविरुद्ध सामन्यात त्यांच्या नंतरची दुसरी सर्वोच्च धावसंख्या सय्यद किरमानी (Syed Kirmani) यांची नाबाद २४अशी होती. भारताने ८ गड्यांच्या मोबदल्यात २६६ धावा केल्या आणि त्यानंतर ३१ धावांनी विजय मिळवताना विरोधी संघाला २३५ धावांवर रोखले.
रोडोडेंड्रॉनची (Rhododendron) फुले
या सामना मैदानाव़र उपस्थित असलेल्या ४००० लोकांव्यतिरिक्त कोणालाही पाहता आला नव्हता. कारण बीबीसी व इतर प्रसार माध्यमांच्या संपामुळे हा सामना दाखविण्यात आला नाही. या मैदानाची बाउंड्री ६० ते ६५ मीटर लांब होती. तसेच ती निळ्या आणि जांभळ्या रंगाच्या रोडोडेंड्रॉनच्या फुलांच्या झाडांनी बहरलेली होती. फक्त याच क्रिकेट मैदानावरच ही फुले आढळतात. तसेच ते एक काउंटी संघाचे छोटे मैदान आहे.
लोकांना अजूनही आठवतो तो सामना
तेथील जवळच राहणाऱ्या एका दर्शकाने तो सामना पहिला होता. त्या सामन्यात सुमारे ४००० प्रेक्षक उपस्थित होते. या मैदानाचा हा पहिला आणि शेवटचा वनडे आंतरराष्ट्रीय सामना होता. तेव्हा वातावरणामुळे चेंडू स्विंग होत होता आणि या कारणामुळेच गावसकरसह भारताचे ४ फलंदाज लवकर बाद होऊन तंबूत परतले होते.
हा सामना झिम्बाब्वे संघ जिंकेल, असे प्रत्येकाला वाटत होते, पण ज्याची कुणीही कल्पना कोणी केली नव्हती ते कपिलने करुन दाखवले होते. त्यादिवशी जोरदार वारा होता आणि कपिलने वाऱ्याच्या विरूद्ध ऑफ साइडमध्ये चौकार आणि षटकार ठोकले होते. जर त्या डावाची तुलना करायचीच झाली तर ती थेट १९८१ मध्ये ऑस्ट्रेलियाच्या विरुद्ध फॉलोअननंतर इयान बोथम यांनी केलेल्या शतकी खेळीशीच.
या ऐतिहासिक सामन्याबद्दल भारतीय संघाचा माजी कर्णधार कपिल देव यांनी म्हटले आहे, की झिम्बाब्वे विरुद्धचा सामना हा फक्त एक सामना नव्हता. या सामन्यामुळे संपूर्ण संघात एक आत्मविश्वास निर्माण करणारा तो क्षण ठरला.
तेव्हा अनेकांना वाटत होते की आम्ही मोठ्या चार संघांना हरवू शकत नव्हतो. परंतू त्या सामन्याने आत्मविश्वास दिला की आम्ही कोणत्याही संघाला सहज पराभूत करु शकतो.