---Advertisement---

बरोबर १६ वर्षांपुर्वी सचिन विरुद्ध कॅडिक युद्धात असा जिंकला होता सचिन

On: मंगळवार, फेब्रुवारी 26, 2019 6:03 PM
---Advertisement---

भारतीय क्रिकेटप्रेमींना आजही आठवणीतील क्रिकेट विश्वचषक कोणता हा प्रश्न केला तरी अनेकांची उत्तर २००३ साली दक्षिण आफ्रिकेत झालेल्या विश्वचषक असंच असतं. भारत जरी या विश्वचषकात उपविजेता ठरला असला तरी अनेकांना आजही या विश्वचषकातील काही क्षण पुन्हा त्या सामन्यांची, तेव्हा झालेल्या चर्चांची आठवण करुन देतात.

भारतीय संघाचा दादा खेळाडू सौरव गांगुली तेव्हा भारतीय संघाच नेतृत्व करत होता तर संघात सचिन, सेहवाग, द्रविड, युवी, भज्जी, श्रीनाथसारखे दिग्गज खेळाडू होते.

९ फेब्रुवारी २००३ला सुरु झालेल्या या विश्वचषकात भारतीय संघ १२ फेब्रुवारी रोजी नेदरलॅंडसोबत आपला पहिला सामना खेळला. या विश्वचषकात २९ वर्षीय सचिन तेंडूलकरची तसेच तेव्हाचे तेजतर्रार गोलंदाज शोएब अख्तर आणि ब्रेट लीची मोठी चर्चा होती.

त्यावेळी एकतर लाईव्ह सामना टीव्हीवर पहा, रेडियोवर ऐका, नाहीतर थेट सकाळी पेपरला काय झाले वाचा एवढेच मर्यादीत पर्याय चाहत्यांसमोर होते.

या विश्वचषकातील पहिले काही सामने भारतीय संघासाठी तसे निराशाजनकच ठरले होते. यात पहिल्या सामन्यात भारताने जेमतेम २०४ धावा केल्या होत्या व नेदरलॅंड संघावर ६८ धावांनी विजय मिळवला होता.

दुसऱ्या सामन्यात संघाला ऑस्ट्रेलियाकडून ९ विकेट्स आणि १६६ चेंडू राखत दारुण पराभवाला सामोरे जावे लागले होते. या सामन्यात भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना केवळ १२५ धावा केल्या होत्या.

तिसऱ्या सामन्यात मात्र या संघाला थोडीफार लय गवसली होती. तेव्हाच्या दादा संघ अशी ओळख असलेल्या झिंबाब्वे संघाला भारताने ८३ धावांनी पराभूत केले होते.

विशेष म्हणजे या तीनही सामन्यात भारताकडून सर्वाधिक धावा करणारा खेळाडू ठरला होता सचिन. त्याने पहिल्या सामन्यात ५२, दुसऱ्या सामन्यात ३६ तर तिसऱ्या सामन्यात ८१ धावा केल्या होत्या. यामुळे सचिनला जर टार्गेट केले तर आपला विजय सहजसोपा होईल अशा विचारात इंग्लंडचा संघ होता.

भारतीय संघ साखळी फेरीतील ६वा आणि शेवटचा सामना पारंपारिक प्रतिस्पर्धी पाकिस्तान सोबत खेळणार होता तर साखळी फेरीत अपराजित राहिलेल्या ऑस्ट्रेलियाविरुद्ध साखळी फेरीतील शेवटच्या सामन्यात इंग्लंड खेळणार होता. यामुळे २६ फेब्रुवारी २००३ रोजी होणाऱ्या भारत विरुद्ध इंग्लंड सामन्याला भलतेच महत्त्व आले होते. आणि अशा परिस्थीतीत भारताकडून अफलातून फलंदाजी करणारा सचिन विरोधी संघातील गोलंदाजांच्या टीकेला सामोरे जाणार यात काहीही नवलं नव्हतं.

अशा वेळी या सामन्याच्या पुर्वसंध्येला झालेल्या पत्रकार परिषदेत इंग्लंडच्या वेगवान ताफ्याचा सरसेनापती अॅंडी कॅडिकने पहिला वार केला.

“सचिन नक्कीच एक चांगला खेळाडू आहे परंतु तो एक माणूस आहे आणि त्याच्याकडूनही चुका होतात. जर भारताकडे सचिन असेल तर आमच्याकडेही मायकेल वाॅ सारखा महान फलंदाज आहे. जेम्स अॅंडरसन, अॅंडी फ्लिंटाॅफ आणि क्रेग व्हाईटमुळे आमचा गोलंदाजीचा तोफखाना जबरदस्त आहे. जर सचिनने डावाची सुरुवात केली तर आमचे गोलंदाज नक्कीच आनंदी असतील.” असे यावेळी कॅडीक म्हणाला.

“याचे कारण म्हणजे सचिन जेवढा लवकर खेळायला येईल तेवढा नवीन चेंडूवर त्याला आम्ही लवकर बाद करु. परंतु तो नेटवेस्ट सिरीजप्रमाणे जर चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला आला तर जुन्या चेंडूवर त्याला बाद करणे कठीण ठरेल.” असेही यावेळी तो म्हणाला.

विशेष म्हणजे या सामन्यापुर्वी नेटमध्ये सराव करत असाताना कॅडिकने सचिनची वनडेतील आकडेवारी देत तो एक साधारण फलंदाज असल्याचे एका पत्रकाराला म्हटले होते. त्याने ४५ च्या सरासरीने जरी १० हजार धावा केल्या असल्या ती कामगिरी ठीकठाकच आहे. तसेच तो भारतीय संघातील इतर फलंदाजांप्रमाणेच आहे, असेही यावेळी ३४ वर्षीय कॅडिक म्हणाला होता.

संपुर्ण भारत देशात तेव्हा सचिनपेक्षाही जास्त या कॅडिकची चर्चा झाली होती. सचिनबद्दल तोपर्यंत खूपच कमी गोलंदाजांनी अशी वक्तव्य केली होती. यातील एक नाव अर्थात ग्लेन मॅकॅग्रा. विशेष म्हणजे हा ग्लेन मॅकॅग्रा सचिनविरुद्ध यशस्वी देखील ठरला होता. परंतु त्यामानाने तेव्हा १० वर्षांच्या क्रिकेट कारकिर्दीत जेमतेम ५० सामने खेळलेला कॅडिक नवखाच. त्याची ही चुक संघाला किती महागात पडेल याचा त्याने तेव्हा विचारही केला नव्हता.

भारतीय वृत्तपत्रांचे त्यावेळी रकानेची रकाने कॅडिक- सचिन युद्धाने भरले होते. गावागावांतील पारांवर देखील तेव्हा या लढतीची जोरदार चर्चा होती. सचिन नक्की या गोलंदाजाला कसा खेळणार, भारत हा सामना जिंकणार का? अशीच सर्वत्र चर्चा होती.

जेव्हा २६ फेब्रुवारी २००३ दिवस उगवला तेव्हा किग्ंडम डर्बनचे स्टेडियम खऱ्या अर्थाने खचाखच भरले होते. भारतीय संघाचा दादा कर्णधार गांगलीने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. अपेक्षेप्रमाणे सचिन आणि विरु जोडी मैदानात उतरली. एवढी चर्चा त्यात समोर सचिन फलंदाजीला म्हटल्यावर इंग्लंडचा कर्णधार नासीर हुसेनने अपेक्षेप्रमाणे चेंडू अॅंडी कॅडिकच्या हातात सोपावला.

भारतीय संघाने थोडी अडखळतच या सामन्याला सुरुवात केली. पहिल्या ६ षटकांत जेमतेम २६ धावा झाल्या होत्या. समोर कॅडिक आणि तेव्हा केवळ २१ वर्षीय उंचपुरा जेम्स अॅंडरसन आग ओकत होते.

या षटकानंतर मात्र सचिनने फलंदाजीचा गिअर बदलला. त्याने चौकार मारयाला सुरुवात केली. यामुळे २६ वरुन भारतीय संघाच्या धावा ८.२ षटकांत ४६ झाल्या होत्या. यानंतर पुढच्या अर्थात ९व्या षटकातील तिसऱ्या चेंडूवर सचिनने मारलेला तो षटकार क्रिकेटप्रेमी कधीही विसरु शकले नाहीत.

कॅडिकने थोडासा आखूड परंतु ऑफ साईडला चेंडू टाकला. सचिनने अतिशय सावधपणे या चेंडूच्या रेषेत येत एका पायावरुन दुसऱ्या पायावर वजन पेलवत थोडे मागे सरकुन एक जबरदस्त पुल शाॅट मारला. हा चेंडू थेट मिडविकेटवरुन मैदानाच्या बाहेर गेला होता.

यावेळी मैदानात सचिन सचिनचा गजर सुरु झाला होता. क्रिकेट जगतात या फटक्यापेक्षाही अनेक सुंदर फटके क्रिकेटप्रेमींनी पाहिले होते. परंतु या फटक्यात एक वेगळीच नजाकत होती. सचिनच्या या खेळीला एक मोठी पार्श्वभूमी होती. याच सामन्यानंतर सचिन गोलंदाजांना किंवा टीकेला केवळ आपल्या बॅटनेच उत्तर देतो हे वाक्य सचिनप्रेमींच्या तोंडात कायम बसले होते.

अखेर या सामन्यातील १६व्या षटकातील दुसऱ्या चेंडूवर सचिन ५० धावा काढून तंबूत परतला होता. या खेळीत सचिनने ५२ चेंडूंचा सामना करताना ८ चौकार आणि एक षटकाराची बरसात केली होती. कॅडिकला त्याला बाद करण्यात मात्र अपयश आले होते. तसेच १० षटकांत ६९ धावा देणारा तो इंग्लंडचा या सामन्यातील सर्वात महागडा गोलंदाज ठरला होता.  भारताने पुढे हा सामना तब्बल ८२ धावांनी जिंकला होता.

अखेर याच विश्वचषकात ऑस्ट्रेलियाविरुद्ध शेवटचा सामना कॅडिक खेळला. या सामन्यात त्याने ४ विकेट्स घेतल्या परंतु हाच त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील शेवटचा सामना ठरला.

सचिनने मात्र या विश्वचषकात ११ सामन्यात ६७३ धावा केल्या. भारत जरी या विश्वचषकात उपविजेता ठरला तरी सचिनला त्याच्या या विश्वचषकातील अफलातून खेळींमुळे मालिकावीर पुरस्कार देण्यात आला होता. पुढे सचिनच्या होम ग्राऊंड अर्थात वानखेडेवर भारताने ८ वर्षांनी दुसऱ्यांदा विश्वचषक जिंकला होता आणि तेव्हाही सलामीवीर होता सचिन.

https://twitter.com/Thanda_soru/status/968114668861403141

महत्त्वाच्या बातम्या-

जेव्हा किंग कोहली साजरा करतो त्याच्या बाॅडीगार्डचा वाढदिवस, पहा व्हीडिओ

सुधर जाओ! विरेंद्र सेहवागच्या पाकिस्तानवरील त्या ट्वीटला ४ तासांत १८ हजार रिट्वीट

-पुलवामा हल्ल्यातील शहिदांना श्रद्धांजली वाहताना विराटने चाहत्यांना दिला शांत रहाण्याचा सल्ला

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---

Leave a Comment