तब्बल ७ वर्षांनंतर भारतीय महिला संघाला कसोटी सामना खेळण्याची संधी मिळाली होती. १६ ते १९ जून या कालावधीत इंग्लंडविरुद्ध झालेला एकमेव कसोटी सामना अनिर्णीत राखण्यात भारतीय संघाला यश आले होते. अटीतटीच्या परिस्थितीत स्नेह राणा आणि तानिया भाटिया यांनी नाबाद शतकी भागिदारी करत संघाला पराभवाच्या दाढेतून बाहेर काढले होते. परंतु पंचांच्या मध्यस्थीमुळे स्नेहला तिचे पदार्पणातील शतक पूर्ण करता आले नव्हते. यासंबंधी स्वत: भारतीय महिला संघाची कर्णधार मिताली राज हिने उलगडा केला आहे.
इंग्लंडविरुद्धच्या येत्या वनडे मालिकेपुर्वी एका व्हर्च्युअल पत्रकार परिषदेत मितालीने याबद्दल वक्तव्य केले. ती म्हणाली की, “सामन्याच्या शेवटच्या दिवशी आम्हाला पुढे अजून फलंदाजी करायची होती. आम्ही प्रतिस्पर्धी इंग्लंड संघाच्या कर्णधारालाही हेच सांगितले होते. तरीही त्यांनी स्टंप्स हटवले. हे पाहून मी आश्चर्यचकित झाले होते.”
पुढे स्नेहविषयी बोलताना मितालीने सांगितले की, “पव्हेलियनला परतल्यानंतर मी स्नेहला विचारले असता ती म्हणाली की, पंचांनी अंधुक प्रकाशाचे कारण देत दिवसाचा खेळ संपवला आहे. आम्हालाही हेच सांगण्यात आले आहे. त्यामुळे मी (स्नेह) आणि तानियाने इंग्लंडच्या खेळाडूंशी हात मिळवणी करत शुभेच्छा दिल्या आहेत. अर्थातच सामना संपला असल्याचे घोषित केले गेले होते, असे स्नेहने मला सांगितले होते.”
थोडक्यात मितालीचे असे म्हणणे आहे की, अंतिम दिवसाचा खेळ थांबवण्यात आला नसता तर स्नेहने तिचे शतक पूर्ण केले असते. याबरोबरच भारतीय संघ सामनाही जिंकू शकला असता.
भारत-इंग्लंड एकमेव कसोटी सामन्याच्या शेवटच्या डावात स्नेहने १५४ चेंडूंचा सामना करताना नाबाद ८० धावा केल्या होत्या. दरम्यान तिने १३ चौकारही ठोकले होते. परंतु अंधुक प्रकाशाच्या व्यतत्यामुळे शेवटच्या दिवसाचा खेळ थांबवण्यात आला आणि सामना अनिर्णीत घोषित केला गेला.
महत्त्वाच्या बातम्या-
‘या’ कारणामुळे कोहलीने किवी समर्थकांना तोंडावर बोट ठेऊन शांत बसण्याचा केला होता इशारा
पुजाराच्या सुमार फलंदाजीने संघ व्यवस्थापनाला विचार करण्यास पाडले भाग, इंग्लंडविरुद्ध मिळणार डच्चू!
‘आमचं यशचं इतके मोठे आहे, विमानतळावर पोलिसही WTC गदासोबत फोटो घेऊ इच्छित होते’






