भारतीय संघाची नवी ‘द वॉल’ म्हणून ओळखला जाणारा चेतेश्वर पुजारा याने ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर अप्रतिम कामगिरी केली. चार सामन्यांच्या कसोटी मालिकेत संथ पण माफक खेळी करत पुजाराने संघासाठी २५० हून अधिक धावांचे योगदान दिले. यासह सलग दुसऱ्यांदा ऑस्ट्रेलियाच्या भूमीत भारताने कसोटी विजयाची पताका झळकावली. यानंतर पुजाराने आपल्या फलंदाजीमागचे रहस्य सांगितले आहे. सलामीवीर रोहित शर्मा आणि शुबमन गिल यांच्यामुळे पुजाराला अधिक खुलून फलंदाजी करता आल्याचे त्याने म्हटले आहे.
हिंदुस्तान टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत बोलताना पुजारा म्हणाला की, “रोहित आणि शुबमन हे दोघेही आक्रमक खेळाडू आहेत. जे कोणत्या-ना-कोणत्या रुपात मला मदत करत असतात. जर माझा दुसरा जोडीदार गोलंदाजांविरुद्ध आक्रमक फलंदाजी करत असेल; तर मला माझी नैसर्गिक खेळी खेळण्यास मदत मिळते. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेत अगदी असेच झाले.”
कसोटीपटू पुजारा याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध अधिकतर तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी केली होती. त्यामुळे सलामी जोडी रोहित आणि शुबमनपैकी एखादा फलंदाज बाद झाल्यानंतर पुजारा फलंदाजीसाठी मैदानावर उतरत असे. रोहित आणि शुबमन दोघेही फटकेबाजी करत खेळत असल्याने पुजाराला टिकून त्याचा नैसर्गिक खेळ दाखवण्याची संधी मिळाली.
पुजारा ठरला सर्वाधिक धावा करणारा दुसरा भारतीय
पुजाराने ऑस्ट्रेलियाविरुद्ध चार कसोटी सामने खेळले असून २७१ धावा केल्या होत्या. यादरम्यान त्याने ३ अर्धशतके केली होती. तसेच त्याची सर्वोच्च वैयक्तिक खेळी ७७ धावा इतकी राहिली होती. याबरोबरच पुजारा हा ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारा दुसरा भारतीय फलंदाज ठरला. याबाबतीत यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंत हा अव्वलस्थानी आहे. त्याने पुजारापेक्षा केवळ ३ धावा जास्त केल्या होत्या.
महत्त्वाच्या बातम्या-
आर्चर म्हणतो, “भारतीय फिरकीपटूंनी आम्हाला हरवण कठीण, स्पिनर्सची आमच्याकडेही भरमार”
फ्लॅशबॅक! १५ वर्षांपूर्वी इरफान पठाणने पाकिस्तान विरुद्ध घेतली होती हॅट्रिक, पहा व्हिडिओ