शनिवारी (7 जानेवारी) भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) वरिष्ठ भारतीय पुरुष क्रिकेट संघाची नवीन निवडसमिती जाहीर केली. विशेष म्हणजे मागील बरखास्त केलेल्या निवड समितीचे अध्यक्ष असलेले चेतन शर्मा (Chetan Sharma) हेच नव्या निवड समितीचेही अध्यक्ष असणार आहेत. यासह आणखी चार सदस्य त्यांना या कामी मदत करतील. मात्र, खेळाडू म्हणून या सर्वांची कारकीर्द कशी होती? याबाबत आपण जाणून घेऊया.
टी20 विश्वचषकातील पराभवानंतर सर्वात प्रथम निवड समितीला बरखास्त करण्यात आले. शनिवारी निवडल्या गेलेल्या नव्या निवड समितीचे अध्यक्ष मागील निवड समितीचे अध्यक्षपद भूषवलेले चेतन शर्मा हेच असतील. पश्चिम विभागाचे सलील अंकोला, पूर्व विभागाचे शिवसुंदर दास, मध्य विभागाचे सुब्रतो बॅनर्जी व दक्षिण विभागाचे श्रीधरन शरथ हे प्रतिनिधी असतील.
चेतन शर्मा (Chetan Sharma)-
विश्वचषकात भारतासाठी पहिली हॅट्रिक घेणारे गोलंदाज म्हणून चेतन शर्मा यांना ओळखले जाते. त्यांनी भारतासाठी 23 कसोटी सामन्यांमध्ये 61 तर, 65 वनडेत 67 बळी टिपलेले. प्रथमश्रेणी क्रिकेटमध्ये त्यांच्या नावे 433 बळींची नोंद आहे. दोन वर्षांपासून ते निवड समितीत उत्तर विभागाचे प्रतिनिधित्व करतात.
सलील अंकोला (Salil Ankola)-
सचिन तेंडुलकर सह आंतरराष्ट्रीय पदार्पण करणारा मुंबईचा दुसरा क्रिकेटपटू म्हणून सलील अंकोला याची ओळख आहे. क्रिकेटपटू, अभिनेता आणि क्रिकेट प्रशासक अशा अनेक भूमिका त्याने आतापर्यंत व वठवलेल्या आहेत. तो आपल्या कारकिर्दीत केवळ 20 वनडे व एक कसोटी सामना खेळू शकला. सततच्या दुखापतीमुळे त्याला लवकर क्रिकेटला अलविदा करावा लागला. मागील काही वर्षांपासून तो मुंबई क्रिकेट संघटनेत कार्यरत आहे.
शिवसुंदर दास (Shiv Sundar Das)-
भारतीय संघासाठी 23 कसोटी सामने खेळलेला सलामीवीर शिवसुंदर दास नव्या निवड समितीत पूर्व विभागाचा प्रतिनिधी असणार आहे. ओडिशासाठी प्रथमश्रेणी क्रिकेट खेळणाऱ्या दासने 10 हजार प्रथमश्रेणी धावांचा टप्पा पार केला आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाल्यानंतर त्याने प्रशिक्षक म्हणून देखील काही काळ काम पाहिले.
सुब्रतो बॅनर्जी (Subroto Bannerjee)-
मध्य विभागाचे प्रतिनिधी म्हणून नव्या निवड समितीत सामील झालेले सुब्रतो बॅनर्जी एक दर्जेदार वेगवान गोलंदाज म्हणून ओळखले जात. मात्र, त्यांना भारतासाठी केवळ एक कसोटी व सहा वनडे सामने खेळण्याची संधी मिळाली. परंतु, त्यांच्याकडे देशांतर्गत क्रिकेटमध्ये खेळाडू व प्रशिक्षक म्हणून मोठा अनुभव आहे.
श्रीधरन शरथ (Sridharan Sharath)-
नव्या निवड समितीत दक्षिण विभागाचे प्रतिनिधी असलेल्या श्रीधरन शरथ यांच्याकडे कोणत्याही आंतरराष्ट्रीय सामन्याचा अनुभव नाही. मात्र, तमिळनाडूसाठी त्यांनी तब्बल 15 वर्ष देशांतर्गत क्रिकेट खेळले आहे. प्रथमश्रेणी व लिस्ट ए क्रिकेटमध्ये त्यांच्या नावे 12 हजार पेक्षा जास्त धावा जमा आहेत.
(Cricket Career Of New Selection Committee Of India Mens Cricket Team)
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘हा तर गोलंदाजांचा अपमान’, रन-आऊट प्रकरणात अश्विनने घेतली ऍडम झम्पाची बाजू, डेविस हसीला सुनावले
श्रीलंकेचा दिग्गज कुमार संगकारा फिट, पुण्याच्या रुबी हॉल क्लिनिकमध्ये केले गेले यशस्वी उपचार