भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) शनिवारी (३० जुलै) झिम्बाब्वे दौऱ्यासाठी भारताचा संघ जाहीर केला. या दौऱ्यातील वनडे मालिकेसाठी शिखर धवनकडे संघाचे नेतृत्व दिले आहे. तर रोहित शर्मा, विराट कोहली यांना विश्रांती देण्यात आली आहे. यामुळे विराटचा फॉर्म या चर्चेने पुन्हा एकदा जोर धरला आहे. या दौऱ्यातून त्याला वगळले असल्याने पाकिस्तानचा माजी गोलंदाजाने विराटला एशिया कपमध्येही निवडले जाणार नाही, असे आश्चर्यकारक मत व्यक्त केले आहे.
भारताचा फलंदाज आणि माजी कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) याला वेस्ट इंडिजच्या दौऱ्यातूनही वगळले होते. आता त्याला झिम्बाब्वे दौऱ्यातही संघात घेतले नाही. यामुळे पाकिस्तानचा फिरकीपटू दानिश कनेरिया (Danish Kaneria) याने त्याला एशिया कपमधूनही वगळले जाईल, असे वक्तव्य केले आहे.
कनेरिया म्हणाला, “विराटला झिम्बाब्वे दौऱ्यासाठी संघात घेणे आवश्यक होते. तो आउट ऑफ फॉर्म असल्याने बीसीसीआयने त्याला फक्त मोठ्या स्पर्धांमध्ये खेळवण्याचा विचार केला असेल. मात्र तो जर तेथेही चांगली कामगिरी करू शकला नाही, तर पुन्हा त्याच्यावर टीका केल्या जातील. माझ्या मते हा त्याच्यावर होणारा अन्याय आहे.”
“विराटबाबत नेहमी स्पष्ट विचार करायला हवा. त्याला तुम्ही वेस्ट इंडिजच्या वनडे मालिकेसाठी संघात घेतले नाही. तसेच टी२० मालिकेतही त्याला संधी दिली नाही. मात्र त्याला झिम्बाब्वे दौऱ्यात घ्यायला पाहिजे होते. जो फॉर्ममध्ये नाही त्याला वनडेमध्ये खेळवणे कधीही चांगले आहे. विराट हा एक खूप मोठा खेळाडू आहे. तो सध्या फॉर्ममध्ये नाही मात्र तो कधीही फॉर्ममध्ये येईल,”
झिम्बाब्वे दौऱ्यानंतर एशिया कप सुरू होणार आहे. तेथे विराटला खेळवणे महत्वाचे आहे. याबाबत बोलताना कनेरिया पुढे म्हणाला, “एशिया कपमध्ये लागोपाठ सामने आहेत. यामुळे तेथे विराट संघात असला पाहिजे. झिम्बाब्वेच्या दौऱ्यात त्याला आराम दिल्याने असे तर नाही की त्याला एशिया कपमध्येही खेळवणार नाही.” तसेच जो भारतीय खेळाडू सुरू असलेल्या आणि आगामी टी२० सामन्यांमध्ये उत्तम कामगिरी करेल त्याला टी२० विश्वचषकाच्या संघात जागा मिळण्याची दाट शक्यता आहे.
एशिया कप २७ ऑगस्टपासून सुरू होणार आहे. युनायटेड अरब अमिराती येथे खेळल्या जाणाऱ्या या स्पर्धेचा शेवटचा सामना ११ सप्टेंबरला खेळला जाणार आहे. तसेच ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात ऑस्ट्रेलियात टी२० विश्वचषक खेळला जाणार आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
शाहरूख खानने अवघ्या चार चेंडूत विरोधी संघाच्या अंतिम फेरीच्या आशेवर फेरले पाणी
भारतासाठी निर्णायक खेळी करणारा कार्तिकच म्हणतोय, ‘फिनिशरची भूमिका सोपी नाही!’