आयपीएल 2026 मध्ये 14 मे रोजी पंजाब किंग्स आणि मुंबई इंडियन्स (PBKS vs MI) यांच्यात सामना झाला. या सामन्यात तिलक वर्माने (Tilak verma) शानदार अर्धशतक झळकावून मुंबईला 6 विकेट्सनी विजय मिळवून दिला. मात्र, या सामन्यापूर्वी पंजाबचा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगने (Arshdeep Singh) तिलक वर्मावर केलेल्या एका टिप्पणीमुळे मोठा वाद निर्माण झाला असून, आता अर्शदीपवर बंदी घालण्याची मागणी होत आहे.
सामन्यापूर्वी अर्शदीप सिंगने इंस्टाग्रामवर एक स्टोरी शेअर केली होती. त्यामध्ये त्याने तिलक वर्माला उद्देशून “ओय अंधारे, तू सनस्क्रीन नाही लावलीस का?” असे म्हटले होते. जरी तिलकने त्यावेळी हे हसण्यावारी नेले असले, तरी सोशल मीडियावर या विधानाला वंशभेद मानले जात असून अर्शदीपवर कडक टीका होत आहे.
भारताचे माजी फिरकीपटू लक्ष्मण शिवरामकृष्णन यांनी या प्रकरणावर तीव्र संताप व्यक्त केला आहे. त्यांनी ‘X’ (ट्विटर) वर पोस्ट करत अर्शदीपवर या हंगामासाठी बंदी घालण्याची मागणी केली. त्यांनी लिहिले, कोणीही माझ्या बोलण्यावर विश्वास ठेवला नाही, उलट मला ट्रोल केले गेले. अर्शदीपवर या मोसमात बंदी घातली पाहिजे आणि त्याच्या मानधनातही कपात केली पाहिजे. आजच्या खेळाडूंना तिथेच फटका दिला पाहिजे जिथे त्यांना जास्त वेदना होतील .
एकीकडे हा वाद सुरू असताना मैदानावर मात्र तिलक वर्माने आपली बॅट चालवली. पंजाबने दिलेल्या 200 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना मुंबईची स्थिती 88 धावांवर 3 बाद अशी बिकट झाली होती. अशा वेळी तिलकने 33 चेंडूत नाबाद 75 धावांची वादळी खेळी केली. यात 6 चौकार आणि 6 षटकारांचा समावेश होता. या वादामुळे अर्शदीप सिंगच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे, कारण बीसीसीआय या प्रकरणाची दखल घेऊ शकते.






