यूएई आणि ओमानमध्ये सुरू असलेली आयसीसी टी२० विश्वचषक स्पर्धा आता शेवटच्या टप्प्यात पोहोचली आहे. बुधवारी (१० नोव्हेंबर) या स्पर्धेतील उपांत्य फेरीतील सामन्यांना प्रारंभ होणार आहे. तर आयसीसी टी२० विश्वचषक २०२१ स्पर्धेचा विजेता कोण असेल? अशी उत्सुकता सर्वांनाच आहे. या स्पर्धेत चौकार आणि षटकारांचा पाऊस पडला तर अनेक मोठ मोठे विक्रम देखील झाले.अशातच भारतीय क्रिकेटपटू दिनेश कार्तिक आणि माजी क्रिकेटपटू सायमन डूल यांनी टी२० विश्वचषक स्पर्धेत चांगली कामगिरी करणाऱ्या खेळाडूंची निवड केली आहे.
भारतीय संघाचा यष्टिरक्षक फलंदाज दिनेश कार्तिक याने आपल्या संघात ४ फिरकी गोलंदाजांना संधी दिली आहे. त्याने या संघाचे कर्णधारपद बाबर आझमला दिले. या संघात एकमेव भारतीय खेळाडू म्हणून जसप्रीत बुमराहची निवड केली आहे. त्याने म्हटले की, “बाबर आझम, जोस बटलर, चरिथ असलंका, रॅसी वॅन डर डसेन, शाकिब अल हसन, मोईन अली, वनिंदू हसरंगा, ऍडम झंपा, ट्रेंट बोल्ट, जसप्रीत बुमराह आणि शाहीन शाह आफ्रिदी हे माझ्या संघात आहेत.”
तसेच तो पुढे म्हणाला की, ” मला ओएन मॉर्गनला देखील संधी द्यायची होती. कारण त्याने कर्णधार म्हणून चांगली कामगिरी केली आहे. परंतु, फलंदाज म्हणून त्याला हवी तशी कामगिरी करता आली नाही ज्यामुळे मी बाबर आझमची निवड केली. डसेन एक चांगला फलंदाज आहे. तसेच गोलंदाजांनी या स्पर्धेत अप्रतिम कामगिरी केली आहे. त्यामुळे मी ७ गोलंदाजांची निवड केली आहे.
तसेच साईमन डूल यांनी देखील ११ खेळाडूंची निवड केली आहे. त्यांनी म्हटले की, “बाबर आझम, जोस बटलर, चरिथ असलंका, एडेन मार्करम, शोएब मलिक, आसिफ अली, मोईन अली, वनिंदू हसरंगा, जोश हेजलवुड, ट्रेंट बोल्ट आणि हॅरिस रऊफ हे माझ्या संघात आहेत. मी खेळाडूंच्या प्रतिष्ठेच्या आधारावर नव्हे तर केवळ गुणवत्तेच्या आधारावर निवड केली आहे. सर्वोत्तम कर्णधाराचा प्रश्न आहे, तर तो माझ्यासाठी बाबर आझम आहे.”