सन १९९८ नंतर ऑस्ट्रेलिया संघ पाकिस्तानच्या (Australia vs Pakistan) मैदानात मालिका खेळणार आहे. पाकिस्तान संघासाठी ही एक महत्त्वपूर्ण मालिका असणार आहे. या दौऱ्यात ऑस्ट्रेलिया संघ तीन कसोटी मालिका आणि एक एकदिवसीय मालिका खेळणार आहे. यानंतर टी२० चा आंतरराष्ट्रीय सामना खेळला जाणार आहे. इतक्या वर्षांनंतर ऑस्ट्रेलिया पाकिस्तानमध्ये जात असल्याने तेथील खेळपट्ट्या आणि परिस्थितीबद्दल खेळाडूंना फारशी माहिती नसेल.
ऑस्ट्रेलिया सध्या जगातील अव्वल संघ आहे आणि ते पाकिस्तानमध्ये चांगली कामगिरी करतील अशी अपेक्षा आहे. या दौऱ्यावर ऑस्ट्रेलियाला सलामीवीर डेव्हिड वॉर्नरकडून (David Warner) मोठ्या अपेक्षा आहेत. नुकत्याच झालेल्या ऍशेस मालिकेत त्याने आपल्या संघाला ४-० ने विजय मिळवून देण्यात मोलाची भूमिका बजावली. भारतात त्याची कामगिरी अत्यंत खराब राहिली. वॉर्नरने पाकिस्तान दौऱ्यावर जाण्यापूर्वी इंस्टाग्रामवर आपल्या कुटुंबासाठी एक भावनिक पोस्ट लिहिली आहे
वॉर्नरने त्याची पत्नी कँडिस आणि मुली इवी, इंडी आणि इसला यांच्यासाठी एक भावनिक पोस्ट केली आहे. त्याने लिहिले की, निरोप घेणे नेहमीच कठीण असते. त्याने लिहिले, “या मुलींना निरोप देणे नेहमीच कठीण असते! गेल्या काही महिन्यांत आम्ही खूप मजा केली आणि आता जाण्याची वेळ आली आहे. काही आठवड्यांनंतर आम्ही पुन्हा एकत्र असू.” तसेच त्याने त्याची पत्नी कँडिसला टॅग करत लिहिले आहे की, “मला तुम्हा सर्वांची खूप आठवण येईल.”
यानंतर चाहत्यांनी या पोस्टवर जोरदार कमेंट केल्या. यावर वॉर्नरच्या पत्नीने प्रतिक्रिया दिली, “आम्ही तुम्हाला पुन्हा खेळताना पाहण्यासाठी उत्सुक आहोत. आम्हालाही तुझी आठवण येईल आणि आम्हीही तुझ्यावर प्रेम करतो.” वॉर्नर हा काही काळ त्याच्या कुटुंबापासून दूर राहणार आहे. पाकिस्तान दौऱ्यानंतर तो २६ मार्चपासून सुरू होणाऱ्या आयपीएलचा तो भाग होणार आहे.
वॉर्नर मात्र मर्यादित षटकांच्या संघाचा भाग नाही. काही ऑस्ट्रेलियन खेळाडू आयपीएलच्या सुरुवातीच्या सामन्यात खेळणार नाहीत. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने त्याला ६ एप्रिलपासून आयपीएलमध्ये खेळण्यासाठी एनओसी दिली आहे. वॉर्नरला आयपीएल लिलावात दिल्ली कॅपिटल्सने ६.२५ कोटी रुपयांना विकत घेतले आहे.
ऑस्ट्रेलिया- पाकिस्तान मालिकेतील पहिला कसोटी सामना रावळपिंडीत ४ मार्चपासून खेळवला जाणार आहे. दुसरा कसोटी सामना १२ मार्चपासून कराचीमध्ये, तर तिसरा आणि अंतिम सामना २१ मार्चपासून लाहोरमध्ये होणार आहे. रावळपिंडी येथे २९ मार्च, ३१ मार्च आणि २ एप्रिल रोजी तीन एकदवसीय सामने होणार आहेत. रावळपिंडीत टी२० सामनाही होणार आहे. हा सामना ५ एप्रिलला होणार आहे.
महत्वाच्या बातम्या-
फलंदाजीत सोडा, हिटमॅन रोहितचं क्षेत्ररक्षणातही अर्धशतक, बनला पहिलाच भारतीय; बघा तो खास क्षण
अय्यरमुळे पूर्ण झाला जडेजाचा बदला! सलग ६, ४, ६ ठोकणाऱ्या श्रीलंकन फलंदाजाला असं केलं चालतं






