भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात इंग्लंड विरुद्ध भारत (ENGvsIND) यांच्यात १ जुलैपासून कसोटी सामना खेळला जाणार आहे. या कसोटी सामन्याची प्रतिक्षा फक्त दोन्ही संघातील खेळाडूच नाही तर चाहतेही करत आहेत. हा कसोटी सामना एजबस्टन क्रिकेट ग्राउंड, बर्मिंघम येथे खेळला जाणार आहे. या मैदानावर भारतीय संघाची कामगिरी आणि सध्याचा इंग्लंडचा संघ पाहिला असता भारतीय संघाला हा सामना जिंकणे तितके सोपे नाही.
पूर्वनियाजित असणारा हा सामना मागील वर्षाच्या मालिकेतील शेवटचा सामना आहे. २०२१मध्ये झालेल्या या पाच सामन्यांच्या मालिकेत भारतीय संघ २-१ने आघाडीवर आहे, तर शेवटचा सामना कोरोनामुळे रद्द करण्यात आला होता. भारताने हा सामना जिंकला किंवा अनिर्णीत राखला तर भारतीय संघ मालिका जिंकेल. इंग्लंडच्या मैदानावर भारत १५ वर्षानंतर पहिल्यांदा आणि ९० वर्षामध्ये चौथाच मालिका विजय असणार आहे. भारताने इंग्लंडमध्ये एकूण १९ कसोटी मालिका खेळल्या आहेत. त्यातच एजबस्टनचा विक्रम पाहिला तर भारताचा पराभव निश्चित आहे.
या मैदानावर भारत आणि इंग्लंडमध्ये ७ कसोटी सामने खेळले गेले आहेत. त्यातील सहा सामन्यात यजमान संघ वरचढ ठरला आहे, तर भारताने या मैदानावर एकही सामना जिंकलेला नाही. एक सामना अनिर्णीत राहिला आहे.
एजबस्टन क्रिकेट ग्राउंड, बर्मिंघम
भारत विरुद्ध इंग्लंड कसोटी सामने – ७
इंग्लंड – ६
भारत – ०
अनिर्णीत – १
या मैदानावर भारताची कामगिरी कुठे कमी पडली आणि कोणत्या कर्णधाराखाली संघाने निराशाजनक कामगिरी केली, ते पाहुया.
भारताने या मैदानावर १९६७मध्ये मन्सूर अली खान पतौडी यांच्या नेतृत्वाखाली पहिला सामना खेळला होता. ४१० धावांचा पाठलाग करताना भारत २७७वर तंबूत परतला होता. हा सामना भारताने १३२ धावांनी हरला होता.
दुसरा सामना १९७४मध्ये अजित वाडेकर यांच्या कर्णधारपदाखाली खेळला होता. या सामन्यात भारताचा पहिला डाव १६५ धावांवर संपुष्टात आला होता. त्याच्या बदल्यात इंग्लंडने ४५९ धावा केल्या होत्या. दुसऱ्या डावात २१६ धावा केल्याने भारताने हा सामना ७८ धावांनी गमावला होता.
तिसरा सामना १९७९मध्ये वेंकटराघवणांच्या नेतृत्वाखाली खेळताना भारताने या मैदानावर पराभवाची हॅट्ट्रीक केली होती. या सामन्यात यजमान संघाने पहिल्या डावात ६३३ धावांचा डोंंगर रचला होता. भारताने पहिल्या डावात २९७ आणि दुसऱ्या डावात २५३ धावा केल्याने भारताला फॉलोऑन टाळता न आल्याने हा सामना डाव आणि ८३ धावांनी गमावला होता.
कपिल देव यांना या मैदानावर यश आले नाही, मात्र अपयशही आले नव्हते. त्यांनी १९८६च्या मालिकेत संघाचे नेतृत्व केले होते. हा सामना भारताने अनिर्णीत राखला होता. त्यामध्ये चेतन शर्मा यांनी या सामन्यात १० विकेट्स घेतल्या होत्या.
१९९६मध्ये मोहम्मद अझरूद्दीनच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने एजबस्टनची कसोटी ८ विकेट्सने गमावली होती. पहिल्या डावात भारताने २१४ धावा केल्या होत्या, तर दुसऱ्या डावात सचिन तेंडुलकरने १२२ धावांची खेळी केल्याने धावसंख्या २१९ एवढी झाली. हा सामना यजमान संघाने पहिल्या डावात ३१३ आणि दुसऱ्या डावामध्ये १२१ धावा करत सहज जिंकला.
या मैदानावर भारताचा २०११मध्ये सगळ्यात मोठा पराभव झाला होता. या सामन्यात भारताने पहिल्या डावात २२४ धावा केल्या होत्या. त्याच्या प्रत्युत्तरात इंग्लंडने ७१० धावांचा रतीब घातला. नंतर भारताचा दुसरा डाव २४४ धांवावरच कोलमडल्याने सामना डाव आणि २४३ धावांनी गमावला.
या मैदानावर भारत २०१८मध्ये शेवटचा खेळला आहे. विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारताने ३१ धावांनी हा सामना गमावला होता. यामध्ये कोहलीने १४९ आणि ५१ धावांच्या खेळी केल्या होत्या. दुसऱ्या डावात १९४ धावांचा पाठलाग करताना भारत १६२ धावांवरच सर्वबाद झाला होता.
एजबस्टनच्या मैदानावर भारताच्या विजयाचे खाते उघडले नाही तर इंग्लंडमध्येही भारत खूप मागे राहिला आहे. त्यांनी इंग्लंडमध्ये ६६ कसोटी सामने खेळताना ९ सामनेच जिंकले आहेत. यातील ३५ सामन्यात पराभव तर २२ सामने अनिर्णीत राहिले आहेत. तसेच नुकतेच इंग्लंडने घरच्या मैदानावर कसोटी चॅम्पियन न्यूझीलंड संघाचा तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेत ३-० असा पराभव केला आहे. या मालिकेतून बेन स्टोक्स (Ben Stokes) याने प्रथमच इंग्लंड संघाच्या नेतृत्वाची जबाबदारी घेतली आहे.
मालिकेत भारत पुढे असला तरी एजबस्टन आणि इंग्लंड विरुद्ध भारताची कामगिरी पाहता हा सामना जिंकणे अवघड वाटत आहे. या सामन्यात रोहित शर्मा उपलब्ध असला तर तो संघाचे नेतृत्व करणार आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
दीपक हुड्डाच्या तुफानी फलंदाजीमागचे रहस्य आले पुढे, अजून कोणी नव्हे ‘या’ खेळाडूने दिलेलं गुरू ज्ञान!
बिग ब्रेकिंग! इंग्लंडचा विश्वविजेता कर्णधार ओएन मॉर्गन आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त
२००७नंतर भारताचे जिंकण्याचे स्वप्न स्वप्नच राहणार, बेन स्टोक्सने केला विश्वास व्यक्त