भारत विरुद्ध इंग्लंड संघात कसोटी मालिकेचा तिसरा कसोटी सामना अहमदाबादला नरेेंद्र मोदी स्टेडियमवर पार पडला. हे स्टेडियम जुने मोटेरा स्टेडियम पाडून नव्याने बांधण्यात आले असून जगातील सर्वात मोठे स्टेडियम म्हणून ओळखले जाते. या स्टेडियमचे नाव सरदार वल्लभभाई पटेल क्रिकेट स्टेडियम असे होते. पण हे नाव २४ फेब्रुवारी रोजी भारत विरुद्ध इंग्लंड संघातील तिसऱ्या कसोटी सामन्याआधी बदलण्यात आले.
या स्टेडियमला भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावावरुन ‘नरेंद्र मोदी स्टेडियम’ असे नवीन नाव देण्यात आले. त्यामुळे आता अहमदाबादला असलेलं जगातील सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियम आता नरेंद्र मोदी स्टेडियम या नावाने ओळखले जाणार आहे. नरेंद्र मोदी हे असे पहिले व्यक्ती नाही, ज्यांचे नाव जिवंतपणीच क्रिकेट स्टेडियमला देण्यात आले आहे. याआधी भारतातील काही क्रिकेट स्टेडियम आहेत, ज्यांना एखाद्या जिवीत व्यक्तीचे नाव देण्यात आले होते. अशा क्रिकेट स्टेडियमचा आपण या लेखात आढावा घेऊ
६. इडन गार्डन
कोलकातामधील प्रसिद्ध क्रिकेट स्टेडियम म्हणजे इडन गार्डन. याच स्टेडियमवर व्हीव्हीएस लक्ष्मण आणि राहुल द्रविडने ऑस्ट्रेलियाविरुद्ध दिवसभर फलंदाजी करत विक्रमी भागीदारी केली होती. तसेच रोहितने ३ वनडे द्विशतकांपैकी एक द्विशतक याच स्टेडियमवर केले आहे. या स्टेडियमला ‘इडन’ हे नाव मिळाले ते लॉर्ड ऑकलंड इडन यांच्या नावाने दिले आहे.
त्यामागची कहानी अशी की साल १८६४ साली कोलकातामध्ये बाबू राजचंद्र दास हे एक मोठे जमीनदार होते. त्यांची मुलगी फार आजारी होती. त्यासाठी त्यांना परदेशी उपचारासाठी जावे लागणार होते. त्यावेळी दास यांनी त्यांचा एक बगीचा त्यावेळीचे व्हायसराय लॉर्ड ऑकलंडने इडन यांना दिला. त्याबदल्यात इडन यांनी त्यांच्या मुलीचा उपचाराची जबाबदारी घेतली. इडन यांनी पुढे या बगीचाला खेळाचे मैदान बनवले. हाच बगीचा आता ‘इडन गार्डन’ स्टेडियम म्हणून ओळखला जातो.
५. एमए चिदंबरम
चेन्नईचे एमए चिदंबरम स्टेडियममध्ये अनेक अविस्मरणीय सामने खेळवण्यात आले आहेत. सध्या भारत विरुद्ध इंग्लंड संघात चालू असलेल्या कसोटी मालिकेतील पहिले २ सामने देखील याच मैदानात झाले. या स्टेडियमला ज्यांचे नाव देण्यात आले ते एमए चिदंबरम मोठे बिझिनेसमन आणि क्रिकेट प्रशासक होते. ते १९५६ साली भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे उपाध्यक्ष आणि १९६०-६१ आणि १९६२-६३ साली अध्यक्ष राहिले आहेत. तसेच ते ३२ वर्षे तमिळनाडू क्रिकेट असोसिएशनचेही अध्यक्ष होते. त्यांचेच नाव १९८० साली पुर्नबांधणी करण्यात आलेल्या मद्रास क्रिकेट ग्राऊंडला त्यांचे नाव देण्यात आले. तेव्हापासून हे स्टेडियम ‘एमए चिदंबरम स्टेडियम’ म्हणून ओळखले जाते.
४. ग्रीन पार्क
कानपूरमध्ये ग्रीन पार्क हे क्रिकेट स्टेडियम आहे. या स्टेडियमला मिळालेल्या नावाची कहानीही अनोखी आहे. साल १९४० च्या दशकादरम्यान कानपूर हे एक महत्त्वाचे शहर म्हणून ओळखले जात होते. या शहरातील गंगा नदीजवळ एक मैदान होते. तिथे एका इंग्रज अधिकाऱ्याची पत्नी मॅडम ग्रीन घोडे सवारी करायची. या मैदानाला नंतर क्रिकेट मैदानाचे स्वरुप प्राप्त झाले. त्यावेळी या क्रिकेट मैदानाला मॅडम ग्रीन यांचेच नाव देण्यात आले. त्यामुळे हे स्टेडियम आता ‘ग्रीन पार्क’ म्हणून ओळखले जाते.
३. एम चिन्नास्वामी
बंगळुरुचं एम चिन्नास्वामी स्टेडियम भारतातील प्रसिद्ध स्टेडियमपैकी एक आहे. या स्टेडियमला नाव देण्यात आले आहे ते दिग्गज क्रिकेट प्रशासक एम चिन्नास्वामी यांच्या नावाने. एम चिन्नास्वामी १९६० ते १९६५ साला दरम्यान बीसीसीआयचे सचिव होते. तसेच ते १९७७ ते १९८० सालादरम्यान बीसीसीआयचे अध्यक्षही राहिले. याबरोबरच त्यांनी दोनवेळा आंतरराष्ट्रीय क्रिकट परिषदेमध्ये भारताचे प्रतिनिधित्वही केले. एवढेच नाही तर कर्नाटक क्रिकेट असोसिएशनच्या संस्थापकांपैकी एक आहेत. पुढे त्यांच्या पुढाकाराने बंगळुरुला क्रिकेट स्टेडियम बनवण्यात आले. या स्टेडियमला त्यांचेच नाव देण्यात आले.
२. ब्रेबॉर्न स्टेडियम
मुंबईतील प्रसिद्ध क्रिकेट स्टेडियमपैकी एक म्हणजे ब्रेबॉर्न स्टेडियम. मुंबईतील हे पहिलेच क्रिकेट स्टेडियम आहे. १९३७ साली हे स्टेडियम उभारण्यात आले. साल १९२८ ते १९३७ सालापर्यंत अँथनी डी मेलो हे बीसीसीआयचे सचिव होते. त्यांना मुंबईत स्टेडियम बनवायचे होते. त्यासाठी जमीन मिळवयाची म्हणून ते त्यावेळीचे गव्हर्नर लॉर्ड ब्रेबॉर्न यांना भेटले. त्यावेळी आपले नाव कायमचे इतिहासात कोरले जाईल, या अपेक्षेने ब्रेबॉर्न यांनी जमीन दिली. त्यानंतर मुंबईत क्रिकेट स्टेडियम तयार झाले आणि त्याचे नाव ब्रेबॉर्न स्टेडियम असे देण्यात आले.
१. वानखेडे स्टेडियम
वानखेडे स्टेडियम म्हटले की अनेकांना आठवतो तो २०११ विश्वचषकातील अंतिम सामना आणि धोनीने मारलेला विजयी षटकार. हे वानखेडे स्टेडियम भारतातील नावजलेल्या स्टेडियमपैकी एक आहे. याच स्टेडियमवर सचिन तेंडुलकरने शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता. या स्टेडियमला वानखेडे हे नाव मिळण्याची कथा अशी की ब्रेबॉर्न स्टेडियमचा अधिकार क्रिकेट क्लब ऑफ इंडियाकडे होता. त्यामुळे मॅच आयोजनावरुन क्रिकेट क्लब ऑफ इंडिया आणि बॉम्बे क्रिकेट असोसिएशन यांच्यात वाद होत होते. त्यावेळी बॉम्बे क्रिकेट असोसिएशनने स्वत:चे स्टेडियम तयार केले.
या स्टेडियमला १९७४ साली एसके वानखेडे यांच्या नावावरुन वानखेडे स्टेडियम असे नाव देण्यात आले. त्यादरम्यान एसके वानखेडे हे बीसीसीआयचे उपाध्यक्ष आणि अध्यक्ष राहिले होते. तसेच १९६३ सालापासून साधारण २५ वर्षे बॉम्बे क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष देखील होते.
महत्त्वाच्या बातम्या –
विश्वचषक २०११ च्या अंतिम सामन्यात खेळलेला ‘हा’ क्रिकेटपटू आता बनलाय बस ड्रायव्हर
इंग्लंड विरुद्धच्या टी२० मालिकेआधी ‘हा’ खेळाडू होऊ शकतो टीम इंडियातून बाहेर, कारण घ्या जाणून
टीम इंडियाची ‘माफीया गँग’! मयंक अगरवालने शेअर केलेला ‘हा’ फोटो होतोय व्हायरल