दुबई। इंडियन प्रीमीयर लीग २०२१ हंगामात मंगळवारी(२१ सप्टेंबर) पार पडलेल्या ३२ व्या सामन्यात राजस्थान रॉयल्सने पंजाब किंग्सविरुद्ध २ धावांनी विजय मिळवला. असे असले तरी, पंजाबच्या गोलंदाजांनी या सामन्यात खास कारनामा केला आहे.
या सामन्यात पंजाबने नाणेफेक जिंकून राजस्थानला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले होते. राजस्थानने प्रथम फलंदाजी करताना २० षटकात सर्वबाद १८५ धावा केल्या. पंजाबकडून अर्शदीप सिंगने सर्वाधिक ५ विकेट्स घेतल्या. याशिवाय मोहम्मद शमीने ३ विकेट्स घेतल्या, तर इशान पोरेल आणि हरप्रीत ब्रारने प्रत्येकी १ विकेट घेतली.
पंजाबकडून राजस्थानच्या सर्व १० विकेट्स घेणारे भारतीय गोलंदाज होते. त्यामुळे आयपीएलमध्ये पहिल्यांदाच असे घडले की सामन्याच्या एका डावातील सर्व १० विकेट्स भारतीय गोलंदाजांनी घेतल्या. यापूर्वी असे कधीही घडले नव्हते.
राजस्थानचा थरारक विजय
या सामन्यात राजस्थानने दिलेल्या १८६ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना पंजाबने दमदार सुरुवात केली होती. पंजाबकडून कर्णधार केएल राहुल आणि मयंक अगरवालने १२० धावांची सलामी दिली. राहुलने ४९ धावा, तर मयंकने ६७ धावांची खेळी केली. तसेच नंतर एडेन मार्करम आणि निकोलस पूरन यांनी ५७ धावांची भागीदारी केली. पण, ते पंजाबला विजय मिळवून देऊ शकले नाहीत.
अखेरच्या षटकात मार्करम आणि पूरन फलंदाजी करत होते. त्यावेळी पंजाबला विजयासाठी केवळ ४ धावांची गरज होती. यावेळी कार्तिक त्यागी गोलंदाजीसाठी आला. त्याने या षटकात केवळ १ धाव देत तिसऱ्या चेंडूवर पूरनला, तर पाचव्या चेंडूवर दीपक हुडाला बाद केले. त्यामुळे पंजाबने हा सामना २ धावांनी गमावला.
महत्त्वाच्या बातम्या –
अर्शदीप सिंगने ५ विकेट्स तर घेतल्या, पण ‘हा’ नकोसो विक्रमही झाला नावावर






