---Advertisement---

विराट म्हणाला होता, ‘या’ प्रशिक्षकाला घाबरायचे युवा खेळाडू; माजी प्रशासक समिती प्रमुखाच्या पुस्तकात दावा

On: बुधवार, एप्रिल 6, 2022 3:36 PM
Virat-Kohli-And-Ravi-Shastri
---Advertisement---

जवळपास ५ वर्षांपूर्वी विराट कोहली कर्णधार असताना त्याचा आणि प्रशिक्षक अनिल कुंबळे यांच्यात मोठा वाद झाला होता. या वादाने अवघ्या क्रिकेट जगताला हैराण करून सोडले होते. कोहली आणि कुंबळे दोघेही क्रिकेट जगतातील सर्वोत्तम खेळाडूंपैकी एक आहेत. दोघांनीही आपल्या भारतीय संघाला मोठ्या उंचीवर नेण्यात मोलाचे योगदान दिले आहे. सर्वांना अशी अपेक्षा होती की, जेव्हा हे दोघे एकत्र येऊन काम करतील आणि संघाला आणखी यश मिळवून देतील. मात्र, काही औरच घडलं. ते दोघेही एकमेकांच्या विरुद्ध झाले.

५ वर्षांनंतर समोर आला कोहली- कुंबळे वाद
दोघांमध्ये झालेल्या वादामुळे अनिल कुंबळेला भारतीय प्रशिक्षकपद सोडावे लागले होते. मात्र, सोशल मीडियावर या दोघांनीही मोकळेपणाने चर्चा केली नाही. मात्र, दोघांमधील वादाचा परिणाम संघावर दिसत होता. विराट कोहली (Virat Kohli) आणि अनिल कुंबळेमधील (Anil Kumble) वाद जगजाहीर झाला होता. अशात ५ वर्षांनंतर दोघांच्या वादावर पुन्हा एकदा चर्चा होत आहे. कारण, बीसीसीआयचे माजी प्रशासक समिती प्रमुख (COA) विनोद राय यांच्या पुस्तकात या दोघांबद्दल मोठा खुलासा करण्यात आला आहे.

माजी आयएएस अधिकारी विनोद राय (Vinod Rai) यांनी त्यांच्या ‘नॉट जस्ट अ नाईटवॉचमन- माय इनिंग्स इन द बीसीसीआय’ या पुस्तकात भारतीय क्रिकेटमधील या वादावर मोकळेपणाने लिहिले आहे. सन २०१७मध्ये विनोद यांना प्रशासक समिती प्रमुख (COA) बनवण्यात आले होते. या समितीने ३ वर्षे भारतीय क्रिकेटचे काम पाहिले होते.

माध्यमांमध्ये विनोद यांच्या पुस्तकाचा हवाला देत, कोहली आणि कुंबळे वादावर राय यांनी दावा केला की, कर्णधार आणि प्रशिक्षक यांच्यातील संबंध कोणत्याही प्रकारे योग्य म्हणता येणार नाही. रायने आपल्या पुस्तकात लिहिले की, “कर्णधार आणि संघ व्यवस्थापनाशी झालेल्या माझ्या संभाषणात मला कळले की, कुंबळे अतिशय शिस्तप्रिय आहे आणि त्यामुळेच संघातील सदस्य त्याच्यावर फारसे खुश नव्हते. याबद्दल मी विराट कोहलीशी बोललो आणि त्याने असेही नमूद केले की, कुंबळे संघातील तरुण सदस्यांशी ज्याप्रकारे वागला, त्यामुळे ते घाबरले होते.”

विनोद यांनी लिहिले की, दुसरीकडे कुंबळेने प्रशासक समितीला सांगितले होते की, तो संघाच्या भल्यासाठीच काम करतो. तसेच, खेळाडूंच्या कथित तक्रारींवर लक्ष न देता, मुख्य प्रशिक्षक म्हणून त्याच्या विक्रमाला जास्त महत्त्व दिले पाहिजे.

“जेव्हा तो यूकेवरून परतला, तेव्हा आम्ही अनिल कुंबळेशी दीर्घवेळ चर्चा केली. ही संपूर्ण घटना ज्याप्रकारे उघडकीस आली त्यामुळे तो खूपच निराश झाला होता. त्याला वाटले की, आपल्याशी अन्याय झाला आहे आणि कर्णधार आणि संघाला इतके महत्त्व देऊ नये. संघात शिस्त लावणे हे प्रशिक्षकाचे कर्तव्य आहे आणि वरिष्ठ खेळाडू असल्याने त्यांच्या मताचा आदर केला पाहिजे,” असेही त्यांनी पुढे लिहिले.

विशेष म्हणजे, अनिल कुंबळेच्या राजीनाम्यानंतर रवी शास्त्री (Ravi Shastri) यांना भारतीय संघाचे प्रशिक्षक बनवण्यात आले. शास्त्री पुढील ४ वर्षे या पदावर कार्यरत राहिले.

महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा

महत्त्वाच्या बातम्या-

Video : आधी विराट मग सिराज नंतर सगळेच, वानखेडेवर RCBचे भिडू लागले नाचू

IPL 2022| केव्हा आणि कसा पाहाल कोलकाता वि. मुंबई सामना, कसे असेल हवामान; जाणून घ्या सर्वकाही

…म्हणून दिलीप वेंगसरकरांना म्हटलं जातं ‘लॉर्ड ऑफ लॉर्ड्स’; गावसकर-सचिनलाही तोडता आला नाही विक्रम

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---