भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका मालिका सुरू होण्यासाठी आता फक्त २ दिवसांचा कालावधी शिल्लक राहिला आहे. येत्या ९ जूनपासून उभय संघात ५ सामन्यांची टी२० मालिका खेळली जाणार आहे. यातील पहिला सामना दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडिअम येथे पार पडेल. दुसरीकडे, दक्षिण आफ्रिका संघाविरुद्ध जिथे रोहित शर्मा, विराट कोहली आणि जसप्रीत बुमराह यांना विश्रांती देण्यात आली आहे.
केएल राहुल याच्या खांद्यावर कर्णधार आणि यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंत याच्याकडे उपकर्णधाराची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. या मालिकेतून मागील वर्षीच्या टी२० विश्वचषकानंतर पहिल्यांदा अष्टपैलू हार्दिक पंड्या याचे पुनरागमन होत आहे.
आयपीएल २०२२मध्ये दमदार प्रदर्शन करून मिळाली भारतीय संघात एंट्री
मागील महिन्यात म्हणजेच २९ मे रोजी आयपीएलचा शेवट झाला. आयपीएलच्या १५व्या हंगामाचे विजेतेपद हार्दिक पंड्याच्या नेतृत्वातील गुजरात टायटन्स संघाने पटकावले. या हंगामात पंड्याची कामगिरी उल्लेखनीय राहिली. त्यामुळे त्याला या कामगिरीच्या आधारे भारतीय संघात स्थान देण्यात आले आहे. पंड्या पहिल्यांदाच आयपीएलमध्ये कर्णधार म्हणून खेळत होता. यादरम्यान १५ सामन्यात त्याने ४८७ धावा चोपल्या. दुसरीकडे गोलंदाजी करताना त्याने आयपीएल २०२२च्या अंतिम सामन्यात ४ षटकात १७ धावा देत ३ विकेट्स घेतल्या होत्या.
हार्दिक पंड्याला रवी शास्त्रींचा सल्ला
दुसरीकडे, भारतीय संघाचे माजी मुख्य प्रसिक्षक रवी शास्त्री यांनी म्हटले आहे की, हार्दिक पंड्या याला यावर्षीच्या टी२० विश्वचषकापर्यंत फक्त मर्यादित षटकांचे क्रिकेट खेळले पाहिजे. शास्त्रींनी स्टार स्पोर्ट्सच्या गेम प्लॅन या शोमध्ये म्हटले की, “तो माझ्यासाठी एक फलंदाज किंवा अष्टपैलू म्हणून त्या संघात परत येईल. मला वाटत नाही की, तो इतका दुखापतग्रस्त आहे की, तो तुम्हाला दोन षटके टाकू शकत नाही. त्याला पुरेशी विश्रांती मिळाली आहे आणि त्याला पुरेशी विश्रांती मिळत राहील. कारण, विश्वचषकात जाण्यासाठी त्याने हा एकमेव फॉरमॅट (टी२०) खेळावा. त्याने वनडे क्रिकेट खेळण्याचा धोका पत्करू नये.”
‘हार्दिक पंड्या संघात दोन खेळाडूंचे काम करतो’
यादरम्यान शास्त्रींनी म्हटले की, पंड्या संघात दोन खेळाडूंचे काम करतो. ते म्हणाले, “मोठ्या प्रमाणात, तो दोन खेळाडूंसाठी काम करतो. एक फलंदाज म्हणून खेळण्याचा अर्थ असा की, त्याला पहिल्या चार किंवा पाचमध्ये फलंदाजी करावी लागेल, पण पंड्या अष्टपैलू म्हणून खेळत असेल, तर तो पाच, सहा किंवा चार क्रमांकावर फलंदाजी करू शकतो आणि तरीही तुमच्यासाठी दोन- तीन षटके टाकू शकतो.”






