क्रिकेटच्या मैदानात असो किंवा मैदानाच्या बाहेर, आपल्या बेधडक आणि निर्भीडपणामुळे ओळखला जाणारा भारतीय संघाचा माजी क्रिकेटपटू म्हणजे गौतम गंभीर होय. मात्र, एक वेळ अशी आली होती, जेव्हा गंभीरही भलताच घाबरला होता. असे स्वत: गंभीरने सांगितले आहे. गंभीरने त्याच्या कारकीर्दीतील महत्त्वाचा किस्सा सांगत म्हटले की, त्याला संपूर्ण कारकीर्दीत धावा बनवण्याचा दबाव केव्हा आला होता.
माजी खेळाडू गौतम गंभीर (Gautam Gambhir) याने सांगितले की, 2014च्या आयपीएल हंगामात कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders) संघाकडून खेळताना सलग 3 वेळा शून्यावर बाद झाला होता. त्यावेळी त्याला हा दबाव जाणवला होता.
‘मी खूप दबावात होतो आणि घाबरलो होतो’
माध्यमांना दिलेल्या मुलाखतीत बोलताना गंभीरने त्या घटनेचे वर्णन केले. तो म्हणाला की, “एकदाच असं झालं होतं, जेव्हा मला दबाव जाणवला होता. ते 2014चे वर्ष होतं. ज्यावेळी मी कर्णधार म्हणून दुबईत सलग 3 वेळा शून्यावर बाद झालो होतो. चौथ्या सामन्यात मी मनीष पांडेला सलामीला खेळण्यास सांगितले आणि स्वत: तिसऱ्या क्रमांकावर खेळलो. त्यावेळी मनीष धावा करत होता. मी असे घाबरल्यामुळे केले होते. मला हे मान्य करण्यात कोणताच संकोच नाही की, मला स्वत:ची लाज वाटली होती. मात्र, मनीष शून्यावर बाद झाला आणि मी 1 धावेवर बाद झालो. मी मनीषला म्हणालो की, मी पुन्हा कधीच असे करणार नाही. मी ठरवले की, गोष्टींचा थेट सामना करेल.”
त्यावेळी कसे वाटत होते, याबाबत केकेआरला दोन वेळा आयपीएल विजेता बनवणारा कर्णधार गंभीरने सांगितले. तो म्हणाला, “मला दबाव जाणवत होता. मला भीती वाटत होती. मात्र, हे मानसिक शक्ती आणि धाडस असते. तुम्हाला सर्वात कठीण आव्हानांचा सामना करावा लागतो. आमच्या पुढच्याच सामन्यात मी सलामीला फलंदाजी केली आणि केन रिचर्ड्सनच्या पहिल्याच चेंडूवर चौकार मारला. कदाचित माझ्या आयपीएल कारकीर्दीतील ते सर्वात महत्त्वाचा चौकार होता. तेव्हा गोष्टी बदलल्या.”
गंभीरची आयपीएल कारकीर्द
गंभीरने त्याच्या कारकीर्दीत 2008 ते 2018 यादरम्यान तब्बल 154 सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने 31.24च्या सरासरीने आणि 123.88च्या स्ट्राईक रेटने 4217 धावा केल्या आहेत. यामध्ये 36 अर्धशतकांचाही समावेश आहे. त्याची सर्वोत्तम धावसंख्या ही 93 इतकी आहे. (former cricketer gautam gambhir shares story of being in most pressure situation in his career ipl 2014)
हेही वाचा-
जो विक्रम जगातील कुठल्याच संघाला जमला नाही, तो पाकिस्तानने दाखवला करून; भारतीय संघ खूपच मागे
पाच बॉल खेळून नसीम शाह ठरला हिरो! सलग दुसऱ्या वनडेत पाकिस्तानचा रोमहर्षक विजय