भारत आणि पाकिस्तान संघ 23 ऑक्टोबर रोजी टी20 विश्वचषक 2022 स्पर्धेत आमने-सामने येणार आहेत. या सामन्यात पाकिस्तानी गोलंदाज शाहीन आफ्रिदी भारतीय फलंदाजांची डोकेदुखी वाढवू शकतो. त्यामुळे त्याच्याविरुद्ध कशाप्रकारे खेळले पाहिजे, याबद्दल भारतीय संघाचा माजी फलंदाज गौतम गंभीर याने खेळाडूंना मोलाचा सल्ला दिला आहे. काय म्हणाला आहे गंभीर, चला जाणून घेऊया…
गौतम गंभीर (Gautam Gambhir) म्हणाला की, टी20 विश्वचषकातील पहिल्या सामन्यात भारताने पाकिस्तानी वेगवान गोलंदाज शाहीन आफ्रिदी (Shaheen Afridi) याचा आक्रमकरीत्या सामना केला पाहिजे. त्याच्याविरुद्ध विकेट्स वाचवण्याचा विचार केला नाही पाहिजे. आशिया चषकातून बाहेर पडलेला आफ्रिदी आता टी20 विश्वचषक 2022मध्ये (T20 World Cup 2022) भारतीय फलंदाजांसाठी मोठे आव्हान असल्याचे म्हटले जात आहे. मागील वर्षी टी20 विश्वचषकात त्याने भारतीय संघाची सुरुवात खराब करून टाकली होती. त्यामुळे पाकिस्तान संघ विश्वचषकाच्या इतिहासात पहिल्यांदा भारतीय संघाला पराभूत करण्यात यशस्वी ठरला होता.
स्टार स्पोर्ट्सच्या एका कार्यक्रमात बोलताना गंभीर म्हणाला की, “शाहीन आफ्रिदी याच्यासमोर विकेट वाचण्याचा विचार करू नका. त्याच्याविरुद्ध धावा करण्याचा विचार करा. जेव्हा तुम्ही विकेट्स वाचवण्यासाठी खेळाल, तेव्हा सर्वकाही खूप लहान होऊन जाईल. बॅकलिफ्ट, फुटवर्क सर्वकाही. टी20 क्रिकेटमध्ये या विचाराने खेळले जाऊ शकत नाही.” तो पुढे म्हणाला की, “मला माहिती आहे की, तो खतरनाक गोलंदाज आहे, परंतु भारतीय फलंदाजांना त्याच्याविरुद्ध धावा कराव्याच लागतील. भारताकडे वरच्या फळीत शानदार फलंदाज आहेत, जे आफ्रिदीविरुद्ध धावा करू शकतात.”
‘बाबर किंवा रिझवानला संधी देऊ नका’
भारतीय माजी गोलंदाज इरफान पठाण याने भारतीय गोलंदाजांना सल्ला देत म्हटले की, “बाबर आझम किंवा मोहम्मद रिझवान यांना संधीच देऊ नका. रिझवान पॉवरप्लेमध्ये खूप आक्रमक खेळतो. बाबरला वेळ लागतो. त्यांचा खेळ समजून गोलंदाजी करावी लागेल.”
अशात भारतीय संघ टी20 विश्वचषकाच्या तयारीसाठी ऑस्ट्रेलियाला पोहोचला आहे. गुरुवारी (दि. 13 ऑक्टोबर) भारताला एका सराव सामन्यात वेस्टर्न ऑस्ट्रेलियाविरुद्ध पराभव पत्करावा लागला.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
आता कसं करणार! टी20 विश्वचषकापूर्वी महत्त्वाचे सराव सामने रद्द, यादीत बलाढ्य संघांचा समावेश
रवी शास्त्रींचे मोठे विधान; म्हणाले, ‘बिन्नी बीसीसीआयचे अध्यक्ष झाले तर…’






