---Advertisement---

रोहितने जीवाची बाजी लावून संघासाठी काढल्या धावा; पण गावसकरांच्या अपेक्षा खूपच जास्त; म्हणाले…

On: गुरूवार, डिसेंबर 8, 2022 9:58 AM
Rohit-Sharma
---Advertisement---

भारतीय संघातील खेळाडू दुखापतग्रस्त होण्याचं सत्र बांगलादेश दौऱ्यातही कायम आहे. बुधवारी (दि. 07 डिसेंबर) ढाका येथे खेळण्यात आलेल्या दुसऱ्या वनडे सामन्यातही भारताला रोहित शर्मा याच्या रूपात मोठा झटका लागला रोहित स्लिपमध्ये क्षेत्ररक्षण करताना झेल पकडण्याच्या प्रयत्नात दुखापतग्रस्त झाला. त्यामुळे त्याला मैदानाबाहेर जावे लागले. दुखापतीची गंभीरता तपासण्यासाठी त्याला एक्स-रे काढण्यासाठी रुग्णालयात नेण्यात आले. त्यामुळे त्याच्या जागी डावाची सुरुवात विराट कोहली आणि शिखर धवन यांनी केली.

विराट कोहली (Virat Kohli) आणि शिखर धवन (Shikhar Dhawan) हे दोघेही 3 षटकांच्या आतच तंबूत परतला. त्यामुळे इतर फलंदाजांवरील दबाव वाढला. तसेच, ते शेवटपर्यंत संघर्ष करत राहिले. श्रेयस अय्यर याने संघासाठी 82 धावांची सर्वोच्च खेळी साकारली. तो बाद झाल्यानंतर नियमित अंतराने विकेट पडत गेल्या. अक्षर पटेल 39व्या षटकात अर्धशतक ठोकत बाद झाला आणि भारताने पुन्हा 43व्या षटकात शार्दुल ठाकूरच्या रूपात 7वी विकेट गमावली. असे वाटत होते की, भारतीय संघाचा डाव लवकरच संपुष्टात येईल आणि रोहित शर्मा (Rohit Sharma) फलंदाजीला येणार नाही. मात्र, तेवढ्यात रोहितची मैदानावर एन्ट्री झाली. रोहित दुखापतग्रस्त अंगठ्यासोबत मैदानावर उतरला होता.

रोहित जेव्हा मैदानावर उतरला, तेव्हा भारताला 7 षटकात 64 धावांची गरज होती. पहिल्या 2 षटकात रोहितने बचावात्मक खेळ दाखवला आणि नंतर 46व्या षटकात दीपक चाहर बाद झाल्यानंतर इबादत हुसेनला 1 चौकार आणि 2 षटकार मारले. त्यानंतर पुढील 2 षटकात फक्त 1 धाव भारताला मिळाली. त्यामुळे रोहितवरील दबाव वाढला.

पुढे 49वे षटक टाकण्यासाठी महमुदुल्लाह आला. रोहितने त्याच्या पहिल्या आणि तिसऱ्या चेंडूवर खणखणीत 2 षटकार मारले. शेवटच्या षटकात भारताला विजयासाठी 20 धावांची गरज होती. ते षटक मुस्तफिजुर रहमान टाकत होता. रोहितने पहिला चेंडू निर्धाव खेळला. त्यानंतर त्याने दुसऱ्या आणि तिसऱ्या चेंडूवर चौकार मारला. चौथा चेंडू पुन्हा निर्धाव राहिला, पण पाचव्या चेंडूवर रोहितने षटकार मारला. त्यासोबतच भारतीय संघाचा कर्णधार रोहितने 27 चेंडूत अर्धशतक पूर्ण केले. शेवटच्या चेंडूवर षटकार मारण्याचा प्रयत्न केला, पण तो चुकला आणि भारताने हा सामना 5 धावांनी गमावला.

काय म्हणाले गावसकर?
या सामन्यानंतर चाहत्यांनी रोहितच्या समर्पणासाठी त्याचे कौतुक केले. भारताचे माजी दिग्गज फलंदाज सुनील गावसकर (Sunil Gavaskar) यांनी रोहितने 9व्या क्रमांकावर फलंदाजी करण्यावर टीकास्त्र डागले. ते म्हणाले की, “मला वाटते की, जर रोहित 9व्या क्रमांकावर फलंदाजी करण्याव्यतिरिक्त 7व्या क्रमांकावर फलंदाजीला आला असता, तर यामुळे इतरांना मोकळेपणाने खेळण्यास मदत मिळाली असती.”

आता भारतीय संघाने ही मालिका 0-2ने गमावली आहे. या मालिकेतील पुढील सामना शनिवारी (दि. 10 डिसेंबर) चट्टोग्राम येथे खेळला जाणार आहे. ही मालिका 0-3ने गमवायची नसेल, तर भारताला तिसरा वनडे सामना जिंकावा लागेल. (former cricketer sunil gavaskar said rohit sharma should have come out to bat earlier)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘या’ ओव्हरमुळे भारताने दुसरा वनडे सामना गमावला, सिराजने एक- दोन नाही, तर सहाच्या सहा…
क्रीडाविश्व हादरलं! 16 वर्षीय मुलाचे क्रिकेट खेळताना हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---