आयर्लंडविरुद्धच्या 2 सामन्यांच्या टी-20 मालिकेत भारतीय संघाला मानहानीकारक पराभवाचा सामना करावा लागला. आयर्लंडने भारताला 2-0 ने हरवून मालिका जिंकली. मालिकेतील शेवटच्या सामन्यात भारतीय फलंदाजांनी निराशाजनक कामगिरी केली. विशेषतः तिलक वर्माची (Tilak verma) फलंदाजी खूपच संथ होती. आता भारताचे माजी कर्णधार कृष्णम्माचारी श्रीकांत (Krishnamachari Shrikant on Tilak verma) यांनी तिलक वर्मावर जोरदार टीका केली आहे.
श्रीकांत यांनी तिलक वर्माच्या फलंदाजीवर नाराजी व्यक्त केली. त्यांच्या मते, तिलक केवळ स्वतःच्या वैयक्तिक धावांसाठी खेळत होता. तसेच, त्यांनी भारतीय मधल्या फळीतील फलंदाजांनाही ताकीद दिली आहे. श्रीकांत म्हणाले, तुम्ही भारतासाठी खेळताना मधल्या फळीत अशा प्रकारे फलंदाजी करू शकत नाही, विशेषतः तिलक वर्मा, दुबे आणि अक्षर पटेल. त्यांचा स्ट्राईक रेट खूपच खराब होता. तुम्हाला आधी थोडा संयम ठेवावा लागतो आणि त्यानंतर मधल्या फळीत आक्रमक व्हावे लागते. जर तुम्ही मधल्या फळीत अपयशी ठरलात, तर तुम्ही सामना गमावणारच. भारताने मधल्या फळीतच हा सामना गमावला.
तिलकवर टीका करताना ते पुढे म्हणाले, तिलक वर्मा फक्त स्वतःसाठी खेळत होता आणि एक-दोन धावांवर लक्ष केंद्रित करत होता. अक्षर पटेलचीही अशीच स्थिती होती. तिलक वर्माला सामना शेवटपर्यंत नेऊन ‘हिरो’ बनायचे होते. त्याला शेवटी सामना जिंकून आपली जर्सी काढून जल्लोष करायचा होता. अशा लक्ष्यांचा पाठलाग एक ओव्हर आधीच संपायला हवा होता, सामना शेवटपर्यंत नेण्याची गरज नव्हती.
तिलक वर्माने दुसऱ्या सामन्यात 46 चेंडूत 55 धावांची संथ खेळी केली होती. त्याने आपल्या खेळीत केवळ 3 चौकार आणि 1 षटकार मारला. त्याचा स्ट्राईक रेट 119.56 इतका होता. या सामन्यात भारतीय संघ 155 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करत होता, मात्र टीम इंडियाला 1 धावेने पराभव स्वीकारावा लागला. भारतीय संघ 20 षटकांत 9 खेळाडू गमावून 153 धावाच करू शकला. याआधी, पहिल्या सामन्यातही टीम इंडियाला 34 धावांनी पराभव पत्करावा लागला होता.






