भारतीय क्रिकेट संघाने कर्णधार सूर्यकुमार यादव याच्या नेतृत्त्वाखाली श्रीलंकेविरुद्धच्या 3 सामन्यांच्या टी20 मालिकेत 2-1 अशी आघाडी घेतली आहे. रविवारी (28 जुलै) पावसाने प्रभावित झालेल्या दुसऱ्या टी20 सामन्यात प्रथम फलंदाजी करताना यजमान संघाने 20 षटकांत 9 बाद 161 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात डीएलएस पद्धतीनुसार 7 विकेट्सने भारतीय संघ विजयी ठरला. हा भारताचा सलग दुसरा विजय होता.
या सामन्यात श्रीलंकेचा अष्टपैलू वानिंदु हसरंगा विशेष खेळ दाखवू शकला नाही. दरम्यान सामन्यानंतर माजी पाकिस्तानी खेळाडू बसित अली याने स्टार खेळाडू हसरंगावर घणाघाती टीका केली आहे.
दुसऱ्या टी20 सामन्यात हसरंगा फलंदाजी करताना शून्यावर बाद झाला. पहिल्याच चेंडूवर युवा भारतीय गोलंदाज रवि बिश्नोईने त्याला त्रिफळाचीत केले. त्यानंतर गोलंदाजीतही हसरंगा कमाल दाखवू शकला नाही. त्याने आपल्या दोन षटकांत तब्बल 34 धावा दिल्या. तो केवळ एकच विकेट घेण्यात यशस्वी ठरला. यापूर्वी पहिल्या टी20 सामन्यातही त्याने 4 षटकांच्या स्पेलमध्ये 28 धावा देताना फक्त 1 विकेट घेतली होती. तर फलंदाजी करताना तो केवळ 2 धावांवर बाद झाला होता.
हसरंगावर टीका करताना बसित अली म्हणाला, “अव्वल क्रमांकाचा अष्टपैलू खेळाडू, वानिंदू हसरंगा. मला वाटतं तो स्वत:ला क्रिकेट या खेळापेक्षाही मोठा मानत आहे. क्रिकेट छोटी गोष्ट आहे, तो त्यापेक्षा मोठा आहे. (दुसऱ्या टी20 मध्ये) तो पहिल्याच चेंडूवर खराब फटका खेळून बाद झाला. गोलंदाजीतही त्याची सूर्यकुमार यादव आणि यशस्वी जयस्वाल या जोडीने धुलाई केली. माझ्या मते सामनावीराचे बक्षीस हसरंगाला द्यायला हवं होतं. त्याला ‘मॅन ऑफ द मॅच’ द्या आणि तिसऱ्या सामन्यात संघाबाहेर बसवा. तो खराब फटके खेळतो आणि गोलंदाजीतही खूप महागडा ठरतोय. तो स्वत:ला बुमराह समजायला लागला आहे असं दिसतंय. रवी बिश्नोईकडून त्याने शिकायला हवं,” अशा रोखठोक शब्दांत बसित अलीने हसरंगाला सुनावले आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
टीम इंडियाबाहेर असलेल्या पृथ्वीचा इंग्लंडमध्ये जबरदस्त ‘शो’, केवळ इतक्या चेंडूत फटकावल्या 76 धावा
पॅरिस ऑलिम्पिक: अर्जुन बबुताचा निशाना थोडक्यात चुकला..! एअर रायफलमध्ये गमावलं पदक
“गोलंदाजीच्या क्षमतेमुळे रियान परागला…” माजी भारतीय खेळाडूचा मोठा दावा