कोरोनाचा प्रभाव भारतातून काहीसा कमी झाल्यानंतर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) २०२१-२०२२ क्रिकेट हंगामाची घोषणा केली होती. ४ नोव्हेंबरपासून देशांतर्गत क्रिकेटमधील सर्वात मोठी टी२० स्पर्धा असलेल्या सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीला सुरुवात होणार आहे. मात्र, त्याआधी या स्पर्धेच्या आयोजकांना झटका देणारी एक बातमी समोर आली. मुंबई संघातील चार खेळाडू स्पर्धेसाठी गुवाहाटीकडे रवाना होण्यापूर्वी कोरोना चाचणी सकारात्मक आली आहे.
हे चार खेळाडू आले कोरोना सकारात्मक
मुंबई संघाचा एलिट ए गटामध्ये समावेश असल्याने त्यांचे सर्व सामने गुवाहाटी येथे होणार आहेत. या स्पर्धेसाठी मुंबई क्रिकेट असोसिएशनने २० सदस्यीय संघ जाहीर केला होता. बुधवारी गुवाहाटीकडे रवाना होण्यापूर्वी संघाची कोरोना चाचणी घेण्यात आली होती. त्याचे अहवाल संघ विमानतळावर असताना प्राप्त झाले. यामध्ये सर्फराज खान, शम्स मुलानी, साईराज पाटील व प्रशांत सोळंकी हे चौघे कोरोनाबाधित असल्याचे निष्पन्न झाले.
मुंबई क्रिकेट असोसिएशनकडून आली महत्त्वाची माहिती
मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या एका अधिकाऱ्याने बोलताना म्हटले,
“हे खूप धक्कादायक आहे. सध्या या चार खेळाडूंना घरी पाठवण्यात आले असून, उर्वरित संघ गुवाहाटीकडे रवाना झाला आहे हे चौघे आता गट फेरीतील सामने करू शकणार नाहीत. हे चौघे जण संघातील महत्त्वाचे व अंतिम अकरामध्ये सामील होण्यासारखे खेळाडू आहेत. तरीही, आमचा संघ संतुलित असून आम्ही पुढच्या फेरीसाठी पात्र ठरू.”
सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीसाठी मुंबईचा संघ-
अजिंक्य रहाणे (कर्णधार), पृथ्वी शॉ (उपकर्णधार), आदित्य तारे, शिवम दुबे, तुषार देशपांडे, सरफराज खान, प्रशांत सोळंकी, शम्स मुलानी, अथर्व अंकोलेकर, धवल कुलकर्णी, हार्दिक तामोरे, मोहित अवस्थी, सिद्धेश लाड, साईराज पाटिल, अमन खान, अरमान जाफर, यशस्वी जयस्वाल, तनुष कोटियन, दीपक शेट्टी व रॉयस्टन डायस.






