भारत आणि ऑस्ट्रेलिया संघादरम्यान नुकत्याच पार पडलेल्या बॉर्डर – गावसकर मालिकेमध्ये भारतीय संघाने ऐतिहासिक विजय मिळवला आहे. मालिकेतील पहिल्या सामन्यात मानहानीकारक पराभव स्वीकारावा लागल्यानंतर भारतीय संघासाठी पुढील वाटचाल अवघड मानली जात होती. नियमित कर्णधार विराट कोहलीची पालकत्व रजा व जवळजवळ दहा प्रमुख खेळाडूंची दुखापत भारतीय संघासाठी चिंतेची बाब ठरत होती. मात्र या सर्व परिस्थितीतही कर्णधार अजिंक्य रहाणेने आपल्या नेतृत्व क्षमतेची चुणूक दाखवत भारतीय संघाला ऐतिहासिक विजय मिळवून दिला. हा मालिका विजय मिळवल्यानंतर अजिंक्यने ड्रेसिंग रूममध्ये एक भावनिक भाषण केले होते, त्यामध्ये त्याने सर्व खेळाडूंचे आभार मानले.
ब्रिस्बेन कसोटीच्या पाचव्या दिवशी विजय मिळाल्यानंतर अजिंक्यने ड्रेसिंग रूममध्ये भाषण केले होते. अजिंक्य म्हणाला,”ॲडीलेडमध्ये आपल्यासोबत जे काही झाले ते फारच निराशाजनक होते. मात्र, यानंतर आपण मेलबर्नमध्ये व मालिकेतील इतर सामन्यात जे पुनरागमन केले ते खरोखरच विशेष होते. या मालिका विजयात केवळ एक-दोन खेळाडूच नव्हे तर संपूर्ण संघाने उत्तम खेळ करत विजय मिळवला.”
As we draw curtains on our historic triumph and start our preparations for the home series, here’s Captain @ajinkyarahane88‘s address to #TeamIndia from the Gabba dressing room.
Full ????https://t.co/Sh2tkR5c7j pic.twitter.com/l7wr6UXSxq
— BCCI (@BCCI) January 23, 2021
भारताची ऑस्ट्रेलिया विरुद्धची मालिका अतिशय रोमांचक ठरली. मालिकेतील पहिला सामना ऑस्ट्रेलियाने, तर दुसरा सामना भारताने जिंकला. सिडनी येथे झालेला तिसरा कसोटी सामना अनिर्णित राहिल्याने सर्वांच्या नजरा ब्रिस्बेन येथे होणाऱ्या चौथ्या कसोटी सामन्याकडे होत्या. ब्रिस्बेन येथे झालेला मालिकेतील शेवटचा सामना ऐतिहासिक ठरला.
या सामन्यात ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात मार्नस लॅब्युशेनच्या शतकी खेळीच्या जोरावर ३६९ धावा केल्या होत्या. पहिल्या डावात भारताकडून टी नटराजन, शार्दुल ठाकूर आणि वॉशिंग्टन सुंदरने प्रत्येकी ३ विकेट्स घेतल्या होत्या. त्यानंतर फलंदाजीसाठी उतरलेल्या भारतीय संघाने शार्दुल ठाकून (६७) आणि वॉशिंग्टन सुंदर (६२) यांच्या शतकी भागीदारीसह पहिल्या डावात ३३६ धावा केल्या.
दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियाने सर्वबाद २९४ धावा केल्या. ऑस्ट्रेलियाकडून स्टिव्ह स्मिथने ५५ धावांची अर्धशतकी खेळी केली. तर भारताकडून मोहम्मद सिराजने या डावात सर्वाधिक ५ विकेट्स आणि शार्दुल ठाकूरने ४ विकेट्स घेतल्या. ऑस्ट्रेलियाने भारताला पहिल्या डावातील ३३ धावांच्या आघाडीसह ३२८ धावांचे आव्हान दिले होते. भारताने ७ विकेट्स गमावत ९७ षटकात या आव्हानाचा यशस्वी पाठलाग करत सामना जिंकला. यामध्ये रिषभ पंत(८९*), शुबमन गिल(९१) आणि चेतेश्वर पुजारा (५६) यांचे महत्त्वाचे योगदान होते.
महत्त्वाच्या बातम्या –
IND Vs AUS: इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी ‘या’ दिवशी टीम इंडिया होणार चेन्नईला रवाना






