यूएई येथे होत असलेल्या टी२० विश्वचषकात भारतीय संघाला सलग दोन मानहानीकारक पराभव स्वीकारावे लागले. पाकिस्तान आणि न्यूझीलंड विरुद्धच्या या पराभवांमुळे भारतीय संघाचा उपांत्य फेरीत जाण्याच्या प्रवास खडतर झाला आहे. भारताच्या या पराभवानंतर अनेक दिग्गज आपली प्रतिक्रिया देत आहेत. भारतीय संघाचा माजी सलामीवीर व समालोचक गौतम गंभीर यानेदेखील भारताच्या पराभवानंतर प्रतिक्रिया देताना काही महत्त्वपूर्ण गोष्टी म्हटल्या.
कोहली मानसिकदृष्ट्या मजबूत नाही
एका क्रिकेटसंकेतस्थळाला दिलेल्या मुलाखतीत बोलताना गंभीर म्हणाला,
“कोहली दबावाखाली कामगिरी करू शकत नाही, असे नाही. मात्र, महत्त्वाच्या आणि मोठ्या सामन्यांमध्ये त्याला पूर्वीसारखी कामगिरी करता येत नाही. त्याला आयसीसी स्पर्धेतील बाद फेरीत धावा करता आल्या नाहीत. माझ्या मते, याचे एकमेव कारण म्हणजे तो कदाचित आता मानसिकदृष्ट्या तितका मजबूत राहिला नाही.”
भारतीय खेळाडूंबाबत बोलताना त्याने म्हटले,
“तुमच्याकडे सर्व कौशल्ये आहेत आणि तुम्ही द्विपक्षीय आणि दुसऱ्या मालिकेत चांगली कामगिरी करता. पण जेव्हा अशा प्रकारच्या सामन्यांचा आणि स्पर्धांचा विचार केला जातो तेव्हा तुम्हाला पुढे येऊन कामगिरी करावी लागते. तुमच्यासाठी न्यूझीलंडविरुद्धचा सामना एखाद्या उपांत्यपूर्व फेरीसारखाच होता. भारतीय संघाची सर्वात मोठी समस्या ही खेळाडूंची मानसिक कणखरता आहे. अशा प्रकारच्या करो अथवा मरो सामन्यात चुकांना जागा नसते. द्विपक्षीय मालिकेत हे वेगळे असते. कारण तेथे तुम्ही चुका करू शकता. मात्र, अशा सामन्यांसाठी योग्य ती मानसिक कणखरता भारतीय खेळाडूंमध्ये दिसली नाही.”
रोहितला सलामीला न पाठवण्याचा निर्णय चुकीचा
गंभीरने या सामन्यात रोहित शर्माला तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी देण्याच्या निर्णयाला चुकीचे ठरवले. तो म्हणाला,
“रोहितने डावाची सुरुवात करताना ४ शतके झळकावली आहेत. रोहितसारखा अनुभवी फलंदाजच तुम्हाला पहिल्या ६ षटकांत झटपट सुरुवात देऊ शकत नाही, तेव्हा इशान किशनसारख्या युवा फलंदाजाला भारताला झटपट सुरुवात करून घेण्यात अडचणी येणारच होती.”
भारतीय संघाने या सामन्यात ईशान किशनला सलामीला तर रोहितला तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला पाठवले होते. मात्र, हे दोघे खेळाडू या जागांवर अपयशी ठरले.
महत्त्वाच्या बातम्या-
न्यूझीलंडविरुद्ध भारताने केल्या ‘या’ पाच चुका, ज्यामुळे संघाला करावा लागला पराभवाचा सामना
भारताच्या पराभवाचे ‘आयपीएल कनेक्शन’; ‘ही’ आहेत धक्कादायक कारणे
सलग तीन विजयांनंतर पाकिस्तानी खेळाडू रिलॅक्स! बाबर आझमने सहकाऱ्यासोबत घेतली सुटीची मजा






