भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीला जगातील सर्वोत्कृष्ट फलंदाजांमध्ये गणले जाते. आजवर विराटने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एकापेक्षा एक उत्कृष्ट खेळी केल्या आहेत. त्याच्या सर्वोत्कृष्ट खेळीची निवड करणे खूप कठीण आहे. परंतु, भारताचा माजी सलामीवीर फलंदाज गौतम गंभीरने विराटच्या क्रिकेट कारकिर्दीतील सर्वोत्कृष्ठ खेळीची निवड केली आहे. Gautam Gambhir Talks About Greatest Inning Of Virat Kohli Career
२०१२ साली झालेल्या आशिया चषकात विराट पहिल्यांदा भारतीय संघाचा उपकर्णधार बनला होता. यावेळी तो आशिया चषकात सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला होता. त्याने संपूर्ण टूर्नामेंटमध्ये ११९च्या सरासरीने ३५७ धावा केल्या होत्या. दरम्यान पाकिस्तानविरुद्धच्या एका सामन्यात विराटने १८३ धावांची खेळी केली होती. त्याच्या या दमदार प्रदर्शनामुळे भारताने ३३० धावांचे मोठे आव्हान पूर्ण केले होते आणि तो सामना जिंकला होता.
विराटची ही खेळी अविस्मरणीय ठरली होती. त्या सामन्यात पहिल्या क्रमांकावर फलंदाजीला उतरलेला गंभीर शून्यावर बाद झाला होता.
गंभीरच्या मते, विराटच्या कारकिर्दीतील ती सर्वोत्कृष्ट खेळी होती. याविषयी स्टार स्पोर्ट्सच्या बेस्ट ऑफ एशिया कपमध्ये बोलताना गंभीर म्हणाला की, “विराटने अनेक अविश्वसनिय खेळी केल्या आहेत. परंतु, पाकिस्तानविरुद्ध त्याने केलेल्या १८३ धावांची खेळी प्रत्येक दृष्टीकोनातून महान खेळी होती. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, त्यावेळी आम्हाला ३३० धावांचे आव्हान पूर्ण करायचे होते. भारताने आपली पहिली विकेट केवळ एक धावेवर गमावली होती. परंतु, पुढे विराटने मैदानावर प्रवेश केला आणि १८३ धावांची अफलातून खेळी केली. त्यावेळी त्याला जास्त अनुभवदेखील नव्हता. प्रामाणिकपणे सांगायचे झाले तर, ती विराटची सर्वात महान खेळी होती.”
१८ मार्च २०१२ रोजी ढाका येथे पाकिस्तान विरुद्ध भारत संघात सामना पार पडला होता. यावेळी पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करत भारताला ३३० धावांचे आव्हान दिले होते. पाकिस्तानच्या लक्ष्याचा पाठलाग करताना सचिन तेंडूलकरने विराटसोबत १३३ धावांची भागिदारी केली. त्यानंतर रोहित शर्मा मैदानावर उतरला. त्याने विराटसोबत मिळून ४६व्या षटकापर्यंत संघाचा स्कोर ३०५ धावांवर पोहोचवला. पण उमर गुलने त्याची विकेट घेतली. पुढे विराटदेखील ४८व्या षटकामध्ये उमर गुलच्या चेंडूवर बाद झाला. परंतु, सुरेश रैना आणि एमएस धोनीने मिळून उर्वरित धावा पूर्ण केल्या आणि १३ चेंडू राखून ६ विकेट्सनी तो सामना जिंकला.
महत्त्वाच्या बातम्या –
गांगुलीचा महिला आयपीएलच्या आयोजनासाठी हिरवा कंदील; यावेळी होऊ शकतात सामने
या दिग्गजाने निवडला भारत-ऑस्ट्रेलियन खेळाडूंचा मिळून सर्वोत्तम कसोटी संघ
असा एक दूर्दैवी क्रिकेटपटू जो आज असता एक महान अष्टपैलू, पण तेव्हा…
ट्रेंडिंग लेख –
४ असे प्रसंग जेव्हा बांगलादेशी खेळाडू त्यांच्या कृत्यामुळे ठरले हास्यास पात्र…..
या ५ गोलंदाजांनी आयपीएलच्या इतिहासात टाकले आहेत सर्वाधिक डॉट बॉल