मुंबई । भारताचे माजी क्रिकेटपटू गुंडप्पा विश्वनाथ सर्वोत्तम फलंदाजापैकी एक. कलात्मक फलंदाजी करण्यात प्रसिद्ध असलेल्या या खेळाडूची फलंदाजी पाहून प्रत्येकजण त्यांचा दिवाना व्हायचा. स्क्वेअर कट आणि फ्लिकचा फटके अप्रतिम मारायचे. एका चेंडूवर पाच प्रकारचे शॉर्ट खेळायचे असे त्यांच्याबाबतीत म्हटले जायचे.
गुंडप्पा विश्वनाथ स्टार स्पोर्ट्स कन्नड कार्यक्रमात बोलताना म्हणाले की, “पाकिस्तानविरुद्धच्या एका मालिकेत खराब प्रदर्शन केल्यानंतर मला संघाबाहेरचा रस्ता दाखवण्यात आला. खराब कामगिरीमुळे मला निवड समितीने डावलले, याची कल्पना मला कपिल देव यांनी दिली होती. या मालिकेत मला तीन डावात चुकीच्या पद्धतीने बाद देण्यात आले होते. मात्र हा खेळाचा भाग आहे. जर मी दोन खेळीत चांगल्या धावा केल्या असत्या तर निवड समिती मला पुन्हा संधी दिली असती. या मालिकेत भारताचा पराभव झाला होता.”
“त्यावेळी कपिल देव यांना कर्णधार म्हणून निवडण्यात आले नव्हते. पण सगळ्यांना माहित होते की, तो कर्णधार होणार आहे. 1982-83 साली झालेल्या पाकिस्तानविरुद्धच्या सहा कसोटी सामन्याची मालिका माझी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील शेवटची मालिका ठरली. केवळ एका मालिकेतील खराब कामगिरीमुळे मला संघाबाहेर ठेवण्यात आले,” असेही गुंडप्पा विश्वनाथ यांनी सांगितले.”
स्थानिक क्रिकेट ते आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधला प्रवास यावर बोलताना विश्वनाथ म्हणाले, ” इरापल्ली प्रसन्ना यांचे विशेष आभार मानतो. त्यांच्यामुळेच मला राज्याकडून क्रिकेट खेळण्यास मदत झाली. मन्सूर अली खान पतौडी त्यावेळी हैदराबादमध्ये रणजी ट्रॉफी खेळत होते. मी कर्नाटकच्या संघात हैदराबादविरुद्ध खेळत होतो. पतौडी यांनी मला खूप जवळून पाहिले. 1968 साली न्यूझीलंडचा संघ भारतात आला होता आणि अध्यक्ष एकादश संघाविरुद्ध सामना होणार होता. मला त्यावेळी संघात निवडण्यात आले. चंदू बोर्डे कर्णधार होते. चंदू बोर्डे यांनी पतौडी यांच्याकडे माझ्या नावाची शिफारस केली आणि त्यानंतर मी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पाऊल टाकले.”
1969 साली ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळताना पदार्पणाच्या पहिल्या सामन्यातच गुंडप्पा विश्वनाथ यांनी शतक ठोकले होते त्यांच्या कारकीर्दीत त्यांनी एकूण चौदा शतके ठोकली.