२००७ चा वनडे विश्वचषक भारतीय संघासाठी विसरण्याजोगा राहिला असला तरी बांगलादेशसाठी मात्र तो अविस्मरणीय होता. त्यांनी त्या विश्वचषकात बलाढ्य भारतालाच नाही तर दक्षिण आफ्रिकेलाही मात दिली होती. त्यावेळी त्या संघाचा कर्णधार होता हाबिबूल बाशर. बाशर हा बांगलादेश संघाचा २००० च्या दशकातील प्रमुख खेळाडू. बांगलादेश संघ जेव्हा क्रिकेटजगतात त्यांनी नवी ओळख तयार करत होता, त्यावेळी बशरदेखील त्या संघातील मुख्य खेळाडू होता एवढेच नाही तर बांगलादेशचा तो एक यशस्वी कर्णधार होता. त्या बशरने रविवारी ४८ वा वाढदिवस साजरा केला.
बाशरचा जन्म १७ ऑगस्ट १९७२ ला बांगलादेशमधील नागकांडा, कुश्तिया येथे झाला. तो लहान असताना नुकतेच बांगलादेश क्रिकेट आपले आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये छोटी छोटी पावले उचलत होता. तसेच त्यावेळी बांगलादेशला कसोटी क्रिकेटचा दर्जाही नव्हता. त्यामुळे कोणत्याही पालकांना वाटेल, तेच बशरच्या पालकांनाही वाटत होते की त्याने क्रिकेटपेक्षा शिक्षणाकडे लक्ष द्यावे. पण बाशरचे क्रिकेटवरील प्रेम आणि खेळण्याच्या जिद्दीने त्याने सर्व अडचणींवर मात करत १९८९ मध्ये १९ वर्षांखालील बांगलादेश संघात स्थान मिळवले. तो एशिया युथ कपमध्ये खेळला. यावेळी त्याच्या प्रतिस्पर्धी संघांमध्ये सौरव गांगुली, अजय जडेजा, मोईन खान, मार्वन अट्टापट्टू असे काही क्रिकेटपटू होती, ज्यांनी पुढे जाऊन त्यांच्या वरिष्ठ राष्ट्रीय संघाचे प्रतिनिधित्व करताना शानदार कामगिरी केली.
बाशर ९० च्या दशकात बिमान बांगलादेश एअरलाईन्सचे देशांतर्गत क्रिकेटमध्ये प्रतिनिधित्व करत होता. तसेच बाशर भारताचा माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दीनला आदर्शही मानत होता. हळुहळू बाशरने क्रिकेटमध्ये प्रगती करत सप्टेंबर १९९३ला बांगलादेश क्रिकेट बोर्डाच्या संघात स्थान मिळवले. या संघाकडून त्याने भारत दौऱ्यात सामने खेळले. तो १९९५ पर्यंत या संघाकडून खेळला. अखेर त्याला बांगलादेशच्या वरिष्ठ संघात स्थान मिळाले. त्याने १९९५ मध्ये आशिया चषकातून शारजाह येथे श्रीलंकेविरुद्ध आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. पण त्या स्पर्धेत त्याला खास काही करता आले नाही. त्यानंतर बांगलादेशने १९९७ च्या आशिया चषकात पुढचा वनडे सामना खेळला. या स्पर्धेतही तो खास यशस्वी ठरला नाही. तरी त्याला झिम्बाब्वे आणि केनियाबरोबर झालेल्या तिरंगी मालिकेसाठी संघात स्थान मिळाले. यावेळी मात्र त्याने हातातील संधी सोडली नाही. त्याने झिम्बाब्वेविरुद्ध ७० धावा केल्या. पण त्यानंतर पुन्हा तो अपयशी ठरला. पुढेही तो सातत्य न राखल्याने संघातून बाहेर पडला. त्याचा १९९९ च्या विश्वचषकासाठी बांगलादेश संघात समावेश नव्हता.
पण त्यानंतर त्याला पुन्हा एकदा संघात स्थान मिळवण्यात यश आले. त्याने वेस्ट इंडिज विरुद्धच्या वनेड मालिकेतून पुनरागमन केले. तो २००० ला झालेल्या आशिया चषकातही खेळला. या स्पर्धेत त्याने भारताविरुद्ध ५७ धावा केल्या. याचदरम्यान बांगलादेश कसोटी दर्जा मिळावा यासाठी संघर्ष करत होते. तसेच १९९९ विश्वचषकातील पाकिस्तानविरुद्धच्या विजयाने त्यांच्या या संधी वाढल्या होत्या. अखेर नोव्हेंबर २०००मध्ये बांगलादेश भारताविरुद्ध त्यांचा पहिला कसोटी सामना खेळला. या सामन्यात बशरचाही समावेश होता. विशेष म्हणजे त्याने या सामन्यात पहिल्या डावात ७१ धावांची खेळी केली. तर दुसऱ्या डावात ३० धावा केल्या.
पण बाशरच्या बाबतीत एक समस्या होती. त्याचे पुलशॉट आणि हुकशॉट हे त्याच्यासाठी त्याची क्षमताही होते आणि त्याची कमकुवत बाजूही. त्यामुळे तो पहिल्या कसोटीतही दोन्ही डावात हुक करताना बाद झाला. कसोटीमध्ये बशर फलंदाजीत सातत्य ठेवत होता. जरी बांगलादेशला सामने जिंकण्यात अपयश येत असले तरी बाशर चांगली कामगिरी करत होता. त्याने झिम्बाब्वे, न्यूझीलंड विरुद्धही चांगली कामगिरी केली. २००३ च्या विश्वचषकातील खराब कामगिरीनंतर बांगलादेशने डॅव व्हॉटमोरला प्रशिक्षक म्हणून तर खालीद मेहमुदला कर्णधार म्हणून नियुक्त केले. त्यावेळी २००३ च्या पाकिस्तान दौऱ्यात बाशर चांगलाच चमकला. त्याने कसोटी मालिकेत ६३.१६ च्या सरासरीने ३६३ धावा केल्या. यात त्याच्या ३ अर्धशतकांचा आणि १ शतकांचा समावेश आहे. या मालिकेत बांगलादेशने पाकिस्तानला चांगली टक्कर दिली होती. तरी त्यांना विजय मिळवता आला नव्हता.
त्यानंतर मेहमुदला कर्णधारपदावरुन काढून टाकण्यात आले आणि बांगलादेशने बाशरच्या डोक्यावर कर्णधारपदाचा मुकुट चढवला. त्याने कर्णधार म्हणून सुरुवातीच्याच दौऱ्यात झिम्बाब्वे विरुद्ध पहिले दोन वनडे सामने रद्द झाल्यानंतर तिसऱ्या वनडेत बांगलादेशला विजय मिळवून दिला. तसेच नंतर ते कसोटी सामना अनिर्णित राखण्यातही यशस्वी ठरले. ही बांगलादेशसाठी मोठी गोष्ट होती. बशरच्या नेतृत्वाने बांगलादेश संघान नवीन आशा निर्माण केल्या होत्या. त्यांनी २००४ च्या वेस्ट इंडिज दौऱ्यातही चांगली कामगिरी केली.
त्यामुळे हळूहळू बांगलादेश एक चांगला संघ बनण्याकडे प्रगती करु लागला होता. त्यांनी २६ डिसेंबर २००४ ला भारताविरुद्ध वनडे विजयही मिळवला. त्यानंतर त्यांच्यासाठी सर्वात मोठी गोष्ट घडली ती म्हणजे पहिला कसोटी विजय. बांगलादेशच्या दौऱ्यावर आलेल्या झिम्बाब्वेविरुद्ध २ सामन्यांची कसोटी मालिका झाली. या मालिकेतील पहिल्याच सामन्यात बांगलादेशने झिम्बाब्वेवर २२६ धावांनी विजय मिळवला. या विजयात बाशरने महत्त्वाचा वाटा उचलला. त्याने दोन्ही डावात अनुक्रमे ९४ आणि ५५ धावा केल्या. हा बांगलादेशसाठी सर्वात मोठा क्षण होता आणि तो बशरच्या नेतृत्वाखाली बांगलादेश क्रिकेट संघाने अनुभवला होता. पुढे त्यांनी वनडे मालिकाही ३-२ ने विजय मिळवला. त्यावेळीही बशरची कामगिरी उल्लेखनीय झाली होती.
पुढे जाऊन त्यांनी २००५ ला कार्डिफ येथे ऑस्ट्रेलिया संघाला वनडेत मात दिली. त्या विजयात मोहम्मद अश्रफुलच्या शतकी खेळीचा आणि बशरच्या ४७ धावांच्या खेळीचा महत्त्वाचा वाटा होता. त्याच्या पुढच्याच वर्षी फतुल्लाहला झालेल्या कसोटी सामन्यात त्यांनी ऑस्ट्रेलियाला दबावात आणले. त्यावेळी बाशरच्या ७६ आणि शहरिअर नाफीसच्या १३८ धावांच्या जोरावर बांगलादेशने ४२७ धावा केल्या होत्या. तर ऑस्ट्रेलियाला पहिल्या डावात २६९ धावावंर सर्वबाद केले होते. परंतू दुसऱ्या डावात बांगलादेश केवळ १४८ धावांवर सर्वाबाद झाल्याने ऑस्ट्रेलियाने ३०७ धावांचे आव्हान केवळ ३ विकेट्स राखून कसेबसे पुर्ण केले.
पुढे बांगलादेशने बाशरच्या नेतृत्वाखाली २००७ च्या विश्वचषकाची तयारी केली. याच विश्वचषकासाठी त्यांनी नफीस, शाकिब, मुशफिकूर रहीम, तमिम इक्बाल, मश्रफे मुर्तझा यांना संघात संधी दिली. बांगलादेशचा एक नवा संघ तयार होत होता. त्यात बशरच्या नेतृत्वाचा वाटा होता. तसेच संघाचे प्रशिक्षक व्हाटमोर यांचा देखील वाटा होता. त्या विश्वचषकात बांगलादेश चांगली कामगिरी केली. त्यांनी साखळी फेरीत भारतासारख्या संघाला मात तर दिलीच, पण सुपर ८ मध्ये दक्षिण आफ्रिकेलाही पराभूत केले. यात बशरची कामगिरी फारशी बरी झाली नसली तरी त्याने त्याच्या नेतृत्वाने सर्वांना प्रभावित केले. या विश्वचषकानंतर भारताने लगेचच बांगलादेशचा दौरा केला. पण त्यावेळी बशर खराब फॉर्ममध्ये होता आणि बांगलादेश संघ बदलातून जात होता. त्या दौऱ्यानंतर बशरची वनडे कारकिर्द संपली. तर २००८ ला तो दक्षिण आफ्रिकेविरुद्ध शेवटचा कसोटी सामना खेळला. त्याच्यानंतर मोहम्मद अश्रफुलला कर्णधार करण्यात आले आणि बांगलादेशला नवीन ओळख मिळवून देणाऱ्या बाशरच्या कारकिर्दीचा शेवट झाला.
त्याने १८ कसोटीत नेतृत्व करताना १ विजय, १३ पराभव पाहिले. तर ४ सामने अनिर्णित राहिले. अनेकांना ही खराब कामगिरी वाटू शकते. पण त्याने त्या संघाचे नेतृत्व केले होते, जो संघ नुकताच त्यांची ओळख निर्माण करण्यासाठी धडपडत होता. तसेच वनडेत त्याने ६९ सामन्यात नेतृत्व करताना २९ विजय आणि ४० पराभव पाहिले. त्याने बांगलादेशला एक चांगला संघ म्हणून पुढे आणण्यात महत्त्वाचा वाटा राहिला.
बाशर आयसीएलमध्येही खेळला. तसेच तो नंतर क्रिकेट प्रशासनातही आला त्याने बांगलादेशच्या निवड समीतीचे प्रतिनिधित्वही केले. तसेच त्याने बांगलादेशमध्ये UNICEF साठी अँबेसेडर म्हणूनही काम पाहिले.
हाबिबूल बाशरची आंतरराष्ट्रीय कारकिर्द –
५० कसोटी – ३०२६ धावा (३ शतके आणि २४ अर्धशतके)
१११ वनडे – २१६८ धावा (१४ अर्धशतके)