भारत आणि ऑस्ट्रेलिया संघादरम्यान सिडनी येथे पार पडलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यात हनुमा विहारीने गंभीर दुखापत होऊनही मैदानात टिकून राहत सामना अनिर्णित केला. विहारीने पाचव्या दिवशी दुखापतग्रस्त 23 धावा करताना तब्बल 161 चेंडू खेळून काढले. विहारीच्या या खेळाचे संपूर्ण क्रिकेट विश्वाकडून कौतुक केले जात आहे. मात्र विहारीच्या मते जर दुखापत झाली नसती तर आम्ही सामना जिंकला असता.
सामना संपल्यानंतर एका मुलाखतीत विहारी म्हणाला, “ड्रॉ हा चांगला निकाल आहे. मात्र जर पुजारा आणखीन काही काळ टिकला असता व मला दुखापत झाली नसती तर निकाल काही वेगळाच असता. आम्ही जबरदस्त विजय देखील मिळवू शकलो असतो.”
विहारी व अश्विन यांनी सहाव्या विकेटसाठी तब्बल 289 चेंडू खेळून काढत सामना अनिर्णित राखला. सामन्याच्या पाचव्या दिवशी दुपारच्या सत्रात जेव्हा रिषभ पंत व पुजारा थोड्याच अंतरावर बाद झाले तेव्हा ऑस्ट्रेलियन संघ विजय मिळवणार अशी शक्यता वाटत होती. मात्र विहारी व अश्विन यांच्या खेळीने ऑस्ट्रेलियाच्या विजयाच्या आशा समाप्त केल्या.
कसोटी मालिकेतील चौथा व अतिशय महत्त्वपूर्ण सामना 15 जानेवारी रोजी ब्रिसबन येथे खेळला जाणार असून विहारीला झालेल्या दुखापतीमुळे तो या सामन्यात खेळणार नाही. विहारीची दुखापत ही भारतीय संघासाठी मोठा झटका असेल, मात्र आत्मविश्वास उंचावलेल्या भारतीय संघाकडून सर्व क्रिकेटप्रेमींना उत्तम कामगिरीची अपेक्षा असणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
भारतापाठोपाठ ऑस्ट्रेलियालाही दुखापतीचा फटका! चौथ्या कसोटीत ‘या’ खेळाडूच्या खेळण्यावर प्रश्नचिन्ह