रोहित शर्माच्या नेतृत्त्वाखालील मुंबई इंडियन्स संघ सध्या संघर्ष करताना दिसत आहे. त्यातही शुक्रवार रोजी (२३ एप्रिल) पंजाब किंग्जविरुद्ध झालेल्या हंगामातील सतराव्या सामन्यात कर्णधार रोहित वगळता इतर कोणत्याही फलंदाजाला आणि गोलंदाजाला साजेशी कामगिरी करता आली नाही. परिणामत: ९ विकेट्सने त्यांचा दारुण पराभव झाला. अशात मुंबईचा भक्कम कणा असलेला एक खेळाडू आता त्यांच्यासाठी डोकेदुखी बनताना दिसत आहे. हा खेळाडू अजून कोण नसून, अष्टपैलू हार्दिक पंड्या होय.
हार्दिक मुंबईच्या आतापर्यंतच्या पाचही सामन्यात सपशेल फ्लॉप ठरला आहे. दुखापतीमुळे संघ व्यवस्थापनाला या शिलेदाराला गोलंदाजीपासून विश्रांती द्यावी लागली आहे. मात्र फलंदाजीत चांगल्या कामगिरीची अपेक्षा असताना हार्दिक एकाही सामन्यात साध्या २० धावाही करु शकलेला नाही.
त्याने रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरविरुद्ध १३, कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध १५, सनरायझर्स हैदराबादविरुद्ध ७, दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध शून्य आणि नुकत्याच पंजाब किंग्जविरुद्ध अवघी १ धाव केली आहे. अशाप्रकारे आतापर्यंतच्या मुंबईच्या ५ सामन्यात तो फक्त ३६ धावा करु शकला आहे. त्यामुळे फलंदाजीत फेल आणि काही कारणास्तव गोलंदाजी न करु शकणारा अष्टपैलू हार्दिक सध्या मुंबई संघावर ओझ बनताना दिसत आहे.
आयपीएल २०१६ नंतर ही हार्दिकची सर्वात वाईट कामगिरी राहिली आहे. २०१६ साली पूर्ण हंगामात ११ सामने खेळताना हार्दिकने केवळ ४४ धावा केल्या होत्या. यावेळी त्याची सर्वोच्च धावसंख्या फक्त ९ इतकी होती. तर गोलंदाजी करताना ७ धावांवर १ विकेटच्या सर्वोत्तम कामगिरीसह फक्त ३ विकेट्स घेतल्या होत्या.
जर लवकरच हार्दिकने त्याच्या खराब फॉर्ममध्ये सुधारणा केल्या नाहीत, तर मुंबई संघाला त्याच्याबाबत कठोर निर्णय घ्यावे लागू शकतात. मुंबईचा पुढील सामना राजस्थान रॉयल्सविरुद्ध २९ एप्रिल रोजी होणार आहे. दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर होणाऱ्या या सामन्यात हार्दिकची फलंदाजी कमाल करेल का नाही?, हे पाहावे लागेल.
महत्त्वाच्या बातम्या-
चार सामन्यात ना षटकार ना अर्धशतक, मुंबईतील ‘या’ खेळाडूला डच्चू देण्याच्या मागणीने धरला जोर
अरेच्च्या! ‘मॅच विनिंग’ खेळीनंतर बुमराहला आली शंका, तपासली राहुलची बॅट; फोटो होतोय व्हायरल
हंगामातील पहिलाच सामना खेळणाऱ्या ‘या’ शिलेदाराचा केएल राहुल बनला चाहता, केलं तोंडभरुन कौतुक