पाकिस्तानची टीम आशिया कपमध्ये यूएईविरुद्ध सामना खेळणार नाही. पाकिस्तानी मीडिया चॅनेलच्या माहितीनुसार, पीसीबीने आपल्या खेळाडूंना स्टेडियमला जाण्यास मनाई केली आहे. जर पाकिस्तानने आशिया कपचा बहिष्कार (Pakistan Boycott Asia Cup) केला, तर त्याचा परिणाम सुपर-4 स्टेजवरही होणार हे निश्चित आहे. आता प्रश्न असा आहे की, पाकिस्तान आशिया कपमधून बाहेर पडल्यास कोणत्या संघाला सर्वाधिक फायदा होणार?
सर्वात आधी आशिया कपच्या पॉइंट्स टेबलकडे नजर टाकूया. ग्रुप A मध्ये भारत, पाकिस्तान, यूएई आणि ओमान यांचा समावेश करण्यात आला होता. भारतीय संघ आधीच सुपर-4 साठी पात्र ठरला आहे, तर ओमान स्पर्धेबाहेर गेला आहे. पाकिस्तान सध्या ग्रुप A मध्ये दुसऱ्या स्थानावर आहे, तर यूएई तिसऱ्या स्थानावर आहे आणि दोघांचेही दोन-दोन गुण आहेत.
जर पाकिस्तानने आशिया कपचा बहिष्कार केला, तर त्याला स्पर्धेबाहेर करण्यात येईल. अशा परिस्थितीत यूएईची टीम सुपर-4 साठी पात्र ठरेल. जर असं घडलं, तर ही पहिलीच वेळ असेल की यूएईची टीम ग्रुप स्टेजपलीकडे जाईल. हा सामना दोन्ही संघांसाठी सुपर-4 च्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा ठरणार आहे. या सामन्यात विजयी ठरणारी टीम सुपर-4 साठी पात्र होईल.
सुपर-4 स्टेजसाठी क्वालिफाय करण्याच्या दृष्टीने पाहिले तर भारतीय संघावर काहीही परिणाम होणार नाही, कारण तो आधीच पात्र ठरला आहे. मात्र सुपर-4 मध्ये भारतीय संघाचा फायनलपर्यंतचा प्रवास अधिक सोपा होऊ शकतो. ग्रुप स्टेजमध्ये पाकिस्तानच्या संघाने भारताला फारशी टक्कर दिली नव्हती. पण जर पाकिस्तान सुपर-4 मध्ये गेला नाही, तर त्याऐवजी यूएई क्वालिफाय होईल, ज्याला भारताने ग्रुप सामन्यात फक्त 27 चेंडूत पराभूत केले होते.






