संपुर्ण क्रिकेटविश्वाला ज्या सामन्याची प्रतिक्षा आहे तो म्हणजे भारत विरुद्ध पाकिस्तान. आशिया खंडाच्या भारत आणि श्रीलंकेत सुरू असलेल्या आयसीसी पुरूष टी२० विश्वचषक २०२६मध्ये हे दोन्ही संघ १५ फेब्रुवारीला कोलंबोमध्ये भिडणार आहेत. आर प्रेमदासा स्टेडियमवर खेळला जाणारा हा सामना सध्या आकर्षणाचे केंद्र बनला आहे. या स्टेडियमवर दोन्ही संघानी सामने खेळले असून त्यामध्ये कोण वरचढ ठरला ते जाणून घेऊ.
या स्टेडियमवर पाकिस्तानने ७ आणि भारताने १५ आंतरराष्ट्रीय २० सामने खेळले आहेत. तसेच येथे भारत-पाकिस्तानमध्ये एक सामना खेळला गेला आहे. त्याचा काय निकाल लागला हे पण पाहू.
भारताने या स्टेडियमवर खेळलेल्या १५ पैकी ११ सामने जिंकले आहेत. त्यामध्ये पाकिस्तानविरुद्धचा एक सामनाही आहे. २०१२मध्ये झालेला हा सामना भारताने जिंकला होता. एमएस धोनीच्या नेतृत्वाखाली खेळल्या गेलेल्या त्या सामन्यात भारताने १२९ धावसंख्येच्या लक्ष्याचा पाठलाग करताना ८ विकेट्सने विजय मिळवला होता. यामध्ये विराट कोहलीने नाबाद ७८ धावा केल्या होत्या.
या मैदानावर भारताने ४ टी२० सामने गमावले आहेत. त्यामध्ये श्रीलंकेने तीनदा आणि ऑस्ट्रेलियाने एकदा भारताला पराभूत केले आहे. येथे भारताकडून शिखर धवनच्या नावावर सर्वाधिक टी२० धावा आहेत. त्याने २८४ धावा केल्या होत्या. तसेच सर्वाधिक विकेट्स युझवेंद्र चहलने (१२) घेतल्या आहेत.
पाकिस्तानने येथे ७ पैकी ५ सामने जिंकले आहेत. उर्वरित सामन्यांमध्ये पाकिस्तानला श्रीलंका आणि ऑस्ट्रेलियाने प्रत्येकी एक-एकदा पराभूत केले आहे. येथे पाकिस्तानकडू सर्वाधिक टी२० धावा उमर अकमलने (१८२) केल्या आहेत. सईद अजमलने सर्वाधिक ८ विकेट्स घेतल्या आहेत.
या स्पर्धेत दोन्ही संघांनी त्यांचे पहिले दोन्ही सामने जिंकले आहेत. त्यामुळे हा सामना चुरशीचा होण्याची शक्यता आहे. तसेच या स्पर्धेतील दोन्ही संघांचा एकमेेंकाविरुद्धचा विक्रम पाहिला तर भारतच वरचढ ठरला आहे. खेळल्या गेलेल्या ८ सामन्यांपैकी ७ सामने भारत जिंकला आहे. पाकिस्तानने एकच सामना जिंकला आहे.






