आयसीसीने (ICC) पाकिस्तानला विचारले आहे की, भारत आणि पाकिस्तान (IND vs PAK) यांच्यातील टी20 वर्ल्ड कप सामना खेळण्यास नकार देण्यासाठी ते ‘फोर्स मेज्योर’ (Force Majeure) या अटीचा आधार कसा काय घेऊ शकतात? विशेषतः तेव्हा, जेव्हा पाकिस्तान क्रिकेट बोर्ड (PCB) आपली जबाबदारी सरकारच्या आदेशांवर ढकलून या परिस्थितीतून मार्ग काढण्याचा प्रयत्न करत आहे.
आयसीसीने पीसीबीला प्रश्न केला आहे की, जर तुमची टीम सरकारच्या निर्देशानुसार संपूर्ण स्पर्धा खेळत आहे, तर मग फक्त एकाच सामन्यातून (भारतांविरुद्धच्या) माघार घेण्याचे समर्थन तुम्ही कसे करू शकता? काही दिवसांपूर्वी, पीसीबीने अधिकृतपणे आयसीसीला कळवले होते की त्यांना ‘फोर्स मेज्योर’ कलमाचा वापर करायचा आहे. यासाठी त्यांनी सरकारच्या एका ‘ट्विट’चा दाखला दिला, ज्यामध्ये टीमला 15 फेब्रुवारी रोजी कोलंबोमध्ये होणाऱ्या सामन्यात खेळण्यास मनाई करण्यात आली होती.
हा करारातील (Contract) असा एक नियम आहे जो एखाद्या पक्षाला त्यांच्या नियंत्रणाबाहेरच्या विलक्षण परिस्थितीमुळे आपली जबाबदारी पूर्ण करण्यापासून सूट देतो. यात युद्ध किंवा नैसर्गिक आपत्ती, सरकारी कठोर कारवाई, सार्वजनिक आणीबाणी समावेश आहे. हा नियम वापरण्यासाठी संबंधित पक्षाला हे सिद्ध करावे लागते की, ही घटना अपेक्षित नव्हती आणि ती टाळणे शक्य नव्हते. त्याचा परिणाम कमी करण्यासाठी त्यांनी सर्व योग्य प्रयत्न केले होते.






