बुधवारी (१७ ऑगस्ट) आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) पुढील चार वर्षांसाठी म्हणजेच २०२३ ते २०२७ पर्यंत सर्व संघांचे वेळापत्रक जाहीर केले आहे. या वेळापत्रकानुसार भारतीय क्रिकेट संघाची पुढील चार वर्षे अतिशय व्यस्त असणार आहेत.
आयसीसीने जारी केलेल्या एफटीपीनुसार, भारत पुढील चार वर्षांत ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडविरुद्ध प्रत्येकी पाच सामन्यांच्या दोन कसोटी मालिका खेळणार आहे. १९९२ नंतर पहिल्यांदाच भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी सामन्यांची संख्या चार ऐवजी पाच असेल.
भारताच्या या वेळापत्रकाला पुढील वर्षी जुलैमध्ये वेस्ट इंडिज दौऱ्यापासून सुरुवात होईल. या दौऱ्यात संघाला दोन कसोटी, तीन वनडे आणि दोन टी२० सामने खेळायचे आहेत. डिसेंबर २०२३ मध्ये दक्षिण आफ्रिकेच्या पूर्ण दौऱ्यावर जाण्यापूर्वी भारत ऑस्ट्रेलियाविरुद्ध मर्यादित षटकांच्या सामन्यांचे आयोजन करेल.
जानेवारी २०२४ मध्ये भारत पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी इंग्लंडचे यजमानपद भूषवणार आहे. वर्षाच्या शेवटी, नोव्हेंबर ते जानेवारी २०२५ दरम्यान, भारत ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर जाईल. त्यानंतर भारतीय संघ जूनमध्ये इंग्लंडला जाईल. या संपूर्ण कार्यक्रमात सर्वात शेवटी ऑस्ट्रेलिया जानेवारी-फेब्रुवारी २०२७ मध्ये भारत दौऱ्यावर येईल.
याशिवाय भारताला अफगाणिस्तानविरूद्ध एक कसोटी आणि तीन वनडे सामन्यांची मालिकाही आयोजित करायची आहे. जी वेळापत्रकानुसार २०२६ च्या मध्यात निश्चित करण्यात आली आहे. भारत पुढील चार वर्षांत ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, न्यूझीलंड, श्रीलंका आणि वेस्ट इंडिजविरुद्ध मर्यादित षटकांचे सामने खेळेल.
भारत २०२३-२०२५ सायकलमध्ये बांगलादेश, इंग्लंड आणि न्यूझीलंडचे घरच्या मैदानावर यजमानपद भूषवणार आहे. तर ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका आणि वेस्ट इंडिजच्या दौऱ्यावर जाणार आहे.
त्यानंतर २०२५-२०७ या सायकलमध्ये भारत ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका आणि वेस्ट इंडिज यांच्याशी मायदेशात खेळणार आहे, तर परदेशात इंग्लंड, न्यूझीलंड आणि श्रीलंकेविरुद्ध खेळेल.
महत्त्वाच्या बातम्या-
‘पाकिस्तान विरुद्ध नाही, ट्रॉफी जिंकण्यासाठी खेळा’; टीम इंडियाला ‘दादा’ने दिला प्रेमाचा सल्ला
देशातील बड्या नेत्याच्या मुलाचं क्रिकेट असोसिएशनमधील मोठं पद जाणार! सुप्रिम कोर्ट ठरतंय अडथळा
‘बाबरचे वादळ रोखणं होतंय कठीण!’ मागील ८ पैकी ७ सामन्यात झळकावलंय अर्धशतक, वाचा रेकॉर्ड्स




