आयसीसी महिला विश्वचषक २०२२ स्पर्धा (ICC Women’s World Cup 2022) मार्चमध्ये न्यूझीलंड येथे खेळवण्यात येणार आहे. त्यासाठी आता खूप कमी दिवस उरले असल्याने आयसीसी स्पर्धेच्या आयोजनासाठी जोरदार तयारी करत आहे. या स्पर्धेदरम्यान कोविड-१९ पासूनही सुरक्षित राहाण्याचे आव्हान सर्व संघांना असणार आहे. पण, नुकताच आयसीसीने एका नियमामुळे सर्व संघांना दिलासा दिला आहे.
आयसीसीच्या (ICC) नियमानुसार विश्वचषकातील सहभागी संघात जर कोरोना व्हायरसची प्रकरणे आढळली तर आयसीसी त्या परिस्थितीत संघाला ९ खेळाडूंना घेऊन सामना खेळण्यासाठी परवानगी देऊ शकते. आयसीसीला अपेक्षा आहे की, या नियमामुळे स्पर्धा कोणत्याही अडथळ्याशिवाय आणि नियोजित वेळेत पूर्ण होईल.
खरंतर हा नियम जानेवारी-फेब्रुवारी दरम्यान वेस्ट इंडिजमध्ये झालेल्या १९ वर्षांखालील विश्वचषकासाठीही (U19 World Cup 2022) लागू करण्यात आला होता. पण, त्या स्पर्धेत या नियमाला अंमलात आणण्याची गरज पडली नाही.
आयसीसीचे कार्यक्रम प्रमुख ख्रिस टेटली यांनी महिला विश्वचषकासाठी प्लेईंग कंडिशन्सच्या (Playing Condition) ९ खेळाडूंना खेळवण्याच्या नियमाबद्दल माहिती दिली. त्यांनी सांगितले आहे की, संघ कोरोना व्हायरसच्या प्रकोपामुळे कमी खेळाडू असलेला संघ मैदानात उतरवू शकतो. तसेच संघ व्यवस्थापक आणि सपोर्ट स्टाफमधील सदस्यांना पर्यायी क्षेत्ररक्षक म्हणून उतरण्याचीही परवानगी असेल.
इएसपीएन क्रिकइन्फोने दिलेल्या वृत्तानुसार टेटली म्हणाले, ‘जर गरज भासली तर आम्ही परिस्थितीचा अपवाद म्हणून ९ खळाडूंना घेऊन मैदानात उतरण्याची संघांना परवानगी देऊ. तसेच जर त्यांच्या संघव्यवस्थापनामध्ये किंवा सपोर्ट स्टाफमध्ये महिला सदस्य असतील, तर त्यांच्यातील दोन सदस्यांना आम्ही पर्यायी क्षेत्ररक्षक म्हणून मैदानात उतरण्याची परवानगी देऊ. पण त्यांना फलंदाजी किंवा गोलंदाजी करण्याची परवानगी नसेल.’
त्याचबरोबर त्यांनी गरज पडल्यास सामन्यांचे वेळापत्रक बदलण्याचीही तयारी दाखवली. ते म्हणाले, ‘आम्ही संघांनी लवचिकता दाखवावी अशी अपेक्षा करतो. तसेच सामना पूर्ण होण्यासाठी आम्ही गरज पडेल तेव्हा शक्य तेवढी लवचिकता दाखवण्याचा प्रयत्न करू.’
याशिवाय कोविड-१९च्या प्रकोपाचा विचार करून यापूर्वीच आयसीसीने प्रत्येक संघासह ३ अतिरिक्त खेळाडू ठेवण्याची परवानगी दिली आहे. जेणेकरुन आवश्यकता भासल्यास त्यांना १५ जणींच्या संघात सामील करता येईल.
भारताचा पहिला सामना पाकिस्तानविरुद्ध
महिला विश्वचषक २०२२ स्पर्धेतील पहिला सामना ४ मार्चला यजमान न्यूझीलंड आणि वेस्ट इंडिज संघात खेळवला जाईल. या सामन्यापासून स्पर्धेला सुरुवात होईल. भारतीय महिला संघ या स्पर्धेतील पहिला सामना ६ मार्च रोजी तौरंगा येखे पाकिस्तानविरुद्ध खेळेल. त्यानंतर भारताला न्यूझीलंड, वेस्ट इंडिज, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, बांगलादेश आणि दक्षिण आफ्रिका या संघांविरुद्ध सामने खेळायचे आहेत.
महत्त्वाच्या बातम्या –
नवी इनिंग! ज्या दिल्लीकडून खेळला शेवटचा आयपीएल सामना, त्याच दिल्लीत आगरकरांचे पुनरागमन
चहल की बुमराह, कोण होणार भारताचा यशस्वी टी२० गोलंदाज? श्रीलंकेविरुद्ध रंगणार ‘कांटे की टक्कर’
संजू सॅमसनची टी-२० विश्वचषकासाठी निवड निश्चित? कर्णधार रोहित शर्मा काय म्हणतोय पाहा