टी20 विश्वचषक 2024 चा तिसरा सामना बरोबरीत संपला. हा सामना ओमान आणि नामिबिया यांच्यात खेळला गेला होता. यानंतर या सामन्याचा निकाल सुपर ओव्हरमध्ये लागला. सुपर ओव्हरमध्ये नामिबियानं प्रथम फलंदाजी करताना 21 धावा केल्या. प्रत्युत्तरात, ओमानला केवळ 10 धावाच करता आल्या. मात्र तुम्ही असा विचार केला आहे का की, जर हा सुपर ओव्हरही बरोबरीत सुटला असता, तर सामन्याचा निकाल कसा लागला असता? या प्रश्नाचं उत्तर आम्ही तुम्हाला या बातमीद्वारे देणार आहोत.
आयसीसीच्या नियमांनुसार, टी20 विश्वचषकातील कोणताही सामना टाय झाल्यास त्यानंतर सुपर ओव्हर खेळवला जातो. त्याच वेळी, जर सुपर ओव्हर देखील टाय झाला आणि सामन्याचा निकाल लागला नाही, तर अशा परिस्थितीत पुन्हा सुपर ओव्हर घेण्यात येईल. नियमानुसार, सामन्याचा निकाल मिळेपर्यंत सुपर ओव्हर खेळवला जाईल. अशाप्रकारे, शेवटी सामन्याचा निकाल हा सुपर ओव्हरनेच लावला जाईल.
टी20 विश्वचषकाच्या इतिहासात आतापर्यंत एकूण 4 सामने टाय झाले आहेत. पहिला बरोबरीत सुटलेला सामना होता भारत विरुद्ध पाकिस्तान. 2007 टी20 विश्वचषकात झालेला या सामन्याच्या वेळी सुपर ओव्हर ही संकल्पना नव्हती. त्यावेळी ‘बॉल आऊट’ पद्धतीनं विजेता ठरवण्यात आला होता. यात भारतानं पाकिस्तानवर विजय मिळवला होता.
यानंतर 2012 टी20 विश्वचषकात श्रीलंका विरुद्ध न्यूझीलंड सामना टाय झाला होता. यानंतर खेळवण्यात आलेल्या सुपर ओव्हरमध्ये श्रीलंकेनं विजय मिळवला. त्यानंतर त्याच विश्वचषकात वेस्ट इंडिज विरुद्ध न्यूझीलंड सामनाही बरोबरीत सुटला होता. दुर्दैवानं, या सामन्यातही न्यूझीलंडचा पराभव झाला होता.
आता तब्बल 12 वर्षांनंतर टी20 विश्वचषकात सुपर ओव्हर पाहायला मिळाला आहे. 3 जून रोजी खेळला गेलेला नामिबिया विरुद्ध ओमान सामना बरोबरीत सुटल्यानंतर सुपर ओव्हर खेळवण्यात आला, ज्यामध्ये नामिबियानं शानदार विजय नोंदवला.
महत्त्वाच्या बातम्या –
टी20 विश्वचषकाच्या इतिहासातील 3 रोमांचक सुपर ओव्हर्स! न्यूझीलंडचा दोनदा झालाय पराभव
टी20 विश्वचषकात 12 वर्षांनंतर सुपर ओव्हरचा थरार! नामिबियाचा ओमानवर रोमहर्षक विजय
नामिबियाच्या रुबेन ट्रम्पेलमननं रचला इतिहास! टी20 विश्वचषकात अशी कामगिरी करणारा जगातील पहिलाच गोलंदाज