भारत विरुद्ध इंग्लंड संघातील कसोटी मालिका सुरू होण्यासाठी फक्त एक दिवस उरला आहे. त्यामुळे क्रिकेट रसिकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. या चार सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिले दोन सामने चेन्नईमध्ये तर शेवटचे दोन सामने अहमदाबाद येथे होणार आहेत. दोन्ही संघ सध्या आत्मविश्वासाने भरलेले आहेत. कारण भारताने नुकताच ऑस्ट्रेलियामध्ये कसोटी मालिकेत विजय मिळवला आहे; तर इंग्लंडने श्रीलंकेला श्रीलंकेत चीतपट केले आहे. त्यामुळे भारत विरुद्ध इंग्लंड संघातील आगामी कसोटी मालिकादेखील रंगतदार होईल, अशी अनेकांना अपेक्षा आहे.
अशात यजमान भारत आणि पाहुण्या इंग्लंड संघात असे काही खेळाडू उपस्थित आहेत, ज्यांमध्ये आपल्या प्रदर्शनाच्या बळावर संघाला एकहाती सामना जिंकून देण्याची क्षमता आहे. त्याच महत्त्वात्या ठरु शकणाऱ्या खेळाडूंचा आम्ही या लेखात आढावा घेतला आहे.
चला तर जाणून घेऊया…
रिषभ पंत (Rishabh Pant)
भारतीय संघाचा यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंत हा सध्या कमालीच्या फॉर्ममध्ये आहे. मागील ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेत तो भारतीय संघाच्या विजयाचा शिल्पकार ठरला होता. ऍडलेड येथे झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात त्याला संधी मिळाली नव्हती. पण पुढील तीन कसोटी सामन्यात त्याने जबरदस्त कामगिरी करत संघाला विजयपथावर पोहोचवले. त्यातही सिडनी कसोटीत ११८ चेंडूत ३ षटकार आणि १२ चौकारांच्या मदतीने त्याने केलेली ९७ धावांची खेळी सर्वोत्कृष्ट ठरली. याबरोबरच अखेरच्या ब्रिस्बेन कसोटीत आक्रमक रवैय्या अंगिकारत सामन्याच्या शेवटी त्याने केलेल्या ८९ धावाही अतिशय महत्त्वपुर्ण ठरल्या.
विशेष म्हणजे, पंतने त्याच्या कसोटी कारकिर्दीत केवळ २ शतके केली आहेत. त्यातील एक शतक त्याने इंग्लंडविरुद्ध केले होते. २०१८ मध्ये इंग्लंडविरुद्ध ३ कसोटी सामने खेळताना ११४ धावांच्या शतकी खेळीसह त्याने १६२ धावा केल्या होत्या.
त्यामुळे इंग्लंडविरुद्ध कसोटी मालिकेतही पंत फिनिशरच्या भूमिकेत दिसेल. याबरोबरच तो चांगले यष्टीरक्षणही करू शकतो. त्यामुळे संघाची यष्टीरक्षणाचीही जबाबदारी त्याच्या खाद्यांवर असेल.
वॉशिंग्टन सुंदर (Washington Sundar)
‘वय छोटे पण पराक्रम मोठे’, या म्हणीचा प्रत्यय युवा भारतीय क्रिकेटपटू वॉशिंग्टन सुंदर याने ऑस्ट्रेलिया दौऱ्यात दिला होता. ब्रिस्बेन कसोटीत भारतीय संघ अतिशय बिकट परिस्थितीत फसला असताना त्याने ६२ धावांची अविश्वसनीय खेळी केली होती. याबरोबरच गोलंदाजी करतानाही संघाला महत्त्वपुर्ण विकेट्स मिळवून दिल्या होत्या. भलेही सुंदरला इंग्लंडविरुद्ध खेळण्याचा अनुभव नाही. परंतु त्याची पदार्पणाच्या सामन्यातील कामगिरी पाहता इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत तो भारतीय संघाचा एक्स फॅक्टर खेळाडू ठरू शकतो.
विराट कोहली (Virat Kohli)
भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली याची जगातील सर्वोत्कृष्ट फलंदाजांमद्ये गणना केली जाते. याबरोबरच इंग्लंडविरुद्ध कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा तो भारताचा अव्वल सक्रिय फलंदाज आहे. आजवर इंग्लंडविरुद्ध त्याने १९ कसोटी सामने खेळले असून तब्बल १५७० धावा केल्या आहेत. यात ५ शतके आणि ५ अर्धशतकांचा समावेश आहे. त्यामुळे इंग्लंडच्या गोलंदाजांसाठी तो सर्वात मोठी डोकेदुखी ठरू शकतो.
याबरोबरत पालकत्त्व रजेमुळे विराटने ऑस्ट्रेलियाविरुद्ध केवळ एकच कसोटी सामना खेळला होता. अशात इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत तो ऑस्ट्रेलिया दौऱ्यातीलल कमी पूर्ण करण्याच्या तयारीत असणार आहे.
अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane)
भारतीय कसोटी संघाचा उपकर्णधार आणि अनुभवी कसोटीपटू अजिंक्य रहाणे याच्यात एकहाती संघाला सामना जिंकून देण्याची क्षमता आहे. मेलबर्न कसोटीत त्याने आपल्यातील या क्षमतेचा नमुना सर्वांना दिला आहे. ऑस्ट्रेलियाच्या बलाढ्य गोलंदाजांविरुद्ध चिवट झुंज देत त्याने ११२ धावांची आतिशी खेळी केली होती. यासह ८ विकेट्सने सामना खिशात घालत संघाला मालिकेत दमदार पुनरागमनही त्याने करवून दिले. एवढेच नव्हे तर, इंग्लंडविरुद्ध या शिलेदाराने एका शतकासह ६१९ धावा केल्या आहेत. १३ कसोटी सामन्यात त्याने हा पराक्रम केला आहे. त्यामुळे येत्या कसोटी मालिकेत त्याच्या प्रदर्शनावर सर्वांचे लक्ष असेल.
जो रूट (Joe Root)
इंग्लंडचा कर्णधार जोर रूट हा सध्या दमदार फॉर्ममध्ये आहे. नुकत्याच पार पडलेल्या श्रीलंका दौऱ्यात त्याने ४००हून धावा चोपल्या आहेत. अवघ्या २ कसोटी सामन्यात एक द्विशतक आणि शतकासह त्याने ४२६ धावा खात्यात जमा केल्या आहेत. सोबतच भारताविरुद्ध कसोटी सामन्यात सर्वाधिक धावा करणारा अव्वल क्रमांकाचा सक्रिय फलंदाज आहे. भारताविरुद्ध १६ कसोटी सामने खेळताना ४ शतक आणि ९ अर्धशतकांसह त्याने १४२१ धावा केल्या आहेत.
विशेष बाब अशी की, इंग्लंडने २०१२ साली भारत दौऱ्यात जबरदस्त खेळ करत भारताचा २-१ अशा फरकाने कसोटी मालिकेत पराभव केला होता. त्यावेळी रूट भारताला चितपट करणाऱ्या इंग्लंड संघाचा भाग होता. त्यामुळे यंदा रूटचे प्रदर्शन इंग्लंड संघासाठी खूप महत्त्वपुर्ण असणार आहे.
जेम्स अंडरसन (James Anderson)
आत्तापर्यंत भारत आणि इंग्लंड यांच्यात झालेल्या द्विपक्षीय कसोटी मालिकेचा विचार करायचा झाल्यास अनेक असे गोलंदाज आहेत, ज्यांनी उत्तम कामगिरी केली आहे. मात्र एकमात्र असा गोलंदाज आहे, ज्याने भारत आणि इंग्लंड यांच्यात झालेल्या कसोटी सामन्यांमध्ये १०० हून अधिक विकेट्स घेण्याचा कारनामा केला आहे. तो म्हणजे, इंग्लंड संघाचा वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसन होय.
या ३८ वर्षीय गोलंदाजाने २००६ ते २०१८ या कालावधीत भारताविरुद्ध एकूण २७ कसोटी सामने खेळले आहेत. यादरम्यान २.८४ च्या इकोनॉमी रेटने गोलंदाजी करताना त्याने सर्वाधिक ११० विकेट्स चटकावल्या आहेत. यात त्याच्या २० धावांवर ५ विकेट्स घेण्याच्या सर्वोत्तम खेळीचाही समावेश आहे.
याबरोबरच नुकत्याच इंग्लंड संघाच्या श्रीलंकाविरुद्ध झालेल्या कसोटी मालिकेत त्याने ६ विकेट्स घेतल्या होत्या. महत्त्वाचे म्हणजे, मालिकेतील एका सामन्यातील फक्त एका डावात त्याने या ६ विकेट्स काढल्या होत्या. त्यामुळे भारताविरुद्धच्या येत्या कसोटी मालिकेत तो इंग्लंडचा सर्वात महत्त्वाचा खेळाडू असणार आहे.
स्टुअर्ट ब्रॉड (Stuart Broad)
इंग्लंडने २०१२ साली भारत दौऱ्यात जबरदस्त खेळ करत भारताचा २-१ अशा फरकाने कसोटी मालिकेत पराभव केला होता. त्यावेळी भारताला चितपट करणाऱ्या इंग्लंड संघात जो रूट, जेम्स अंडरसनबरोबर स्टुअर्ट ब्रॉडचाही समावेश होता. श्रीलंका दौऱ्यात ब्रॉडला खास कामगिरी करता आली नाही. परंतु त्याची भारताविरुद्ध कसोटीतील आकडेवारी दमदार आहे. जेम्स अंडरसननंतर भारताविरुद्ध कसोटीत सर्वाधिक विकेट्स घेणारा तो इंग्लंडचा दुसरा गोलंदाज आहे. २० कसोटी सामन्यात त्याने ७० भारतीय फलंदाजांना बाद केले आहे.
जॅक लीच (Jake Leach)
इंग्लंड संघाचा युवा फिरकीपटू जॅक लीच हा भारताविरुद्ध सर्वात खरतनाक खेळाडू ठरू शकतो, असा अंदाज बऱ्याच क्रिकेट दिग्गजांनी वर्तविला आहे. त्यानुसार लीचनेही श्रीलंकाविरुद्ध चमकदार कामगिरी केली आहे. २ कसोटी सामन्यात या युवा गोलंदाजाने १० विकेट्स चटकावल्या आहेत. तसेच भारताचा कर्णधार विराट कोहली हा फिरकी गोलंदाजांविरुद्ध संघर्ष करताना दिसतो. त्यामुळे जॅक लीचची उपस्थिती इंग्लंड संघासाठी महत्त्वाची ठरणार आहे.
संबंधित लेख-
भारत-इंग्लंड कसोटी सामन्यांत १०० हून अधिक विकेट्स घेणारा एकमात्र जाबाज