इंडियन प्रीमियर लीग २०२१ स्पर्धेचा पहिला टप्पा यशस्वीरित्या पार पडल्यानंतर खेळाडूंना कोरोनाची लागण होऊ लागली होती. ज्यामुळे बीसीसीआय आणि आयपीएल कमिटीने ही स्पर्धा अनिश्चित काळासाठी स्थगित करण्याचा निर्णय घेतला होता. या स्पर्धेच्या दुसऱ्या टप्प्यातील सामने येत्या १९ सप्टेंबरपासून यूएईमध्ये पार पडणार आहेत. या स्पर्धेसाठी सर्वच संघ सध्या कसून सराव करण्यात व्यस्त आहेत. दरम्यान या स्पर्धेचा प्रारंभ मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज यांच्यातील सामन्याने होणार आहे. हा सामना सुरू होण्यासाठी अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. तत्पूर्वी पाहूया अंकतालिकेत कुठला संघ कुठल्या स्थानी आहे? तसेच प्लेऑफमध्ये स्थान मिळवण्यासाठी या ८ संघांना काय करावे लागेल?
१) दिल्ली कॅपिटल्स :
रिषभ पंतच्या नेतृत्वाखाली खेळणारा दिल्ली कॅपिटल्स संघ सध्या आयपीएलच्या गुणतालिकेत अव्वल स्थानी आहे. दिल्ली कॅपिटल्स संघाने स्पर्धेच्या पहिल्या टप्प्यात ८ सामने खेळले होते. ज्यामध्ये त्यांना ६ सामने जिंकण्यात यश आले होते. या अप्रतिम कामगिरीच्या जोरावर दिल्ली कॅपिटल्स संघाने जवळ जवळ प्लेऑफ गाठले आहे. प्लेऑफमध्ये स्थान निश्चित करण्यासाठी दिल्ली कॅपिटल्स संघाला दुसऱ्या टप्प्यातील ६ सामन्यांपैकी फक्त २ सामने जिंकायचे आहेत.
२) चेन्नई सुपर किंग्ज :
इंडियन प्रीमियर लीग २०२० स्पर्धेत निराशाजनक कामगिरी केल्यानंतर इंडियन प्रीमियर लीग २०२१ स्पर्धेत या संघाने जोरदार पुनरागमन केले आहे. सध्या चेन्नई सुपर किंग्ज संघ गुणतालिकेत दुसऱ्या स्थानी आहे. जर या संघाला प्लेऑफमध्ये प्रवेश करायचा असेल, तर उर्वरित ७ सामन्यांपैकी ३ सामन्यात विजय मिळवायचा आहे.
३) रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर :
विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाने आयपीएल २०२१ स्पर्धेच्या पहिल्या टप्प्यात अप्रतिम कामगिरी केली आहे. रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाला प्लेऑफमध्ये प्रवेश करायचा असेल, तर त्यांना उर्वरित ७ सामन्यांपैकी ३ सामन्यात विजय मिळवावा लागेल.
४) मुंबई इंडियन्स :
इंडियन प्रीमियर लीग स्पर्धेत ५ वेळेस जेतेपद पटकावणाऱ्या मुंबई इंडियन्स संघाला इंडियन प्रीमियर लीग २०२१ स्पर्धेत साजेशी सुरुवात करण्यात अपयश आले होते. परंतु त्यानंतर जोरदार पुनरागमन केले होते. मुंबई इंडियन्स संघाला प्लेऑफमध्ये प्रवेश करण्यासाठी चांगले क्रिकेट खेळावे लागेल. सध्या गुणतालिकेत मुंबई इंडियन्स संघ चौथ्या क्रमांकावर आहे. जर मुंबई इंडियन्स संघाला प्लेऑफमध्ये स्थान निश्चित करायचे असेल, तर अजून ४ सामने जिंकावे लागणार आहे.
५) राजस्थान रॉयल्स :
युवा संजू सॅमसनच्या नेतृत्वाखाली खेळणारा राजस्थान रॉयल्स संघ आयपीएलच्या गुणतालिकेत ५ व्या स्थानी आहे. जर राजस्थान रॉयल्स संघाला प्लेऑफमध्ये स्थान मिळवायचे असेल, तर त्यांना उर्वरित ७ सामन्यांपैकी ४ सामन्यात विजय मिळवावा लागणार आहे.
६) पंजाब किंग्ज :
आयपीएलच्या गुणतालिकेत पंजाब किंग्ज संघ सहाव्या स्थानी आहे. पंजाब संघाला १४ गुण प्राप्त करण्यासाठी कमीत कमी ५ सामन्यात विजय मिळवावा लागणार आहे. आयपीएल २०२१ स्पर्धेच्या पहिल्या टप्प्यात पंजाब किंग्ज संघाला साजेशी कामगिरी करण्यात अपयश आले होते. दरम्यान दुसऱ्या टप्प्यात हा संघ जोरदार पुनरागमन करेल, अशी आशा व्यक्त केली जात आहे.
७) कोलकाता नाईट रायडर्स :
कोलकाता नाईट रायडर्स संघाला प्लेऑफमध्ये स्थान निश्चित करण्यासाठी उर्वरित ७ सामन्यांपैकी ५ सामन्यात विजय मिळवावा लागणार आहे. त्यांनी पहिल्या टप्प्यात फक्त २ सामने जिंकले होते.
८) सनरायझर्स हैदराबाद :
सनरायझर्स हैदराबाद संघाने या हंगामात खूपच निराशाजनक कामगिरी केली आहे. जर सनरायझर्स हैदराबाद संघाला प्लेऑफमध्ये प्रवेश करायचा असेल तर, त्यांना उर्वरित ७ सामन्यांपैकी ६ सामन्यात विजय मिळवावा लागेल.
महत्त्वाच्या बातम्या-
टी२० विश्वचषक २०२१ साठी ‘असे’ आहेत सर्व १६ संघ, पाहा प्रत्येक टीम फक्त एका क्लिकवर
मिस्टर अन् मिसेस कोहलीला दुबईतील हॉटेलकडून ‘चॉकलेटी सरप्राईज’, खास वेलकमने अनुष्का खुश
युएई टप्प्यात ‘हे’ समालोचक आयपीएल सामन्यांमध्ये आणणार आणखी रंगत, भारतीय दिग्गजांची भरमार