भारतीय संघाने अंडर-१९ वर्ल्ड कप २०२६ चे जेतेपद पटकावले आहे. फायनलमध्ये त्यांनी इंग्लंडचा १०० धावांनी पराभव करत सहाव्यांदा ही ट्रॉफी जिंकली. टीम इंडियाच्या या विजयात वैभव सूर्यवंशीची भूमिका अत्यंत महत्त्वाची होती. संपूर्ण स्पर्धेत सूर्यवंशीची कामगिरी धमाकेदार राहिली आणि फायनलमध्ये त्याने १७५ धावांची तुफानी खेळी खेळली. वैभव अवघ्या १४ वर्षांचा असून तो सातत्याने चाहत्यांमध्ये चर्चेचा विषय बनला आहे. सूर्यवंशी फक्त खेळावरच नाही, तर अभ्यासावरही लक्ष केंद्रित करतो. टीम इंडियाला चॅम्पियन बनवल्यानंतर आता अभ्यासाच्या बाबतीतही त्याची ‘अग्निपरीक्षा’ होणार आहे.
१४ वर्षांचा वैभव सूर्यवंशी क्रिकेटव्यतिरिक्त अभ्यासाकडेही पूर्ण लक्ष देतो. तो बिहारच्या समस्तीपूर जिल्ह्यातील रहिवासी आहे. सूर्यवंशी ताजपूर ब्लॉकच्या ‘डॉक्टर मुक्तेश्वर सिन्हा मॉडेस्टी स्कूल’मध्ये शिकतो. क्रिकेटवर लक्ष केंद्रित असल्यामुळे तो शाळेत कमी जातो, पण त्याला त्याच्या शिक्षकांकडून पूर्ण पाठिंबा मिळतो. तो स्वत: देखील आपला अभ्यास सांभाळतो. वैभवने स्वतः सांगितले आहे की, क्रिकेट सरावाव्यतिरिक्त तो कोचिंगलाही जातो.
वैभव सूर्यवंशीने २०२५ मध्ये नववी इयत्ता पूर्ण केली असून आता तो दहावीत (Class 10) आहे. आता त्याच्यासमोर सर्वात मोठी परीक्षा आहे. तो सीबीएसई (CBSE) दहावीची बोर्ड परीक्षा देणार आहे. अवघ्या ७ दिवसांनंतर त्याची परीक्षा सुरू होईल. १७ फेब्रुवारी ते ११ मार्च २०२६ या काळात तो आपल्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करेल आणि परीक्षा उत्तीर्ण होऊन चांगले गुण मिळवण्याचा प्रयत्न करेल.
१४ वर्षीय वैभव सूर्यवंशीने अंडर-१९ वर्ल्ड कप २०२६ मध्ये एकूण ७ सामने खेळले आणि ४३९ धावा केल्या. त्याने ६२.७ च्या सरासरीने धावा केल्या असून या दरम्यान त्याचा स्ट्राईक रेट १६९.४९ इतका राहिला. या स्पर्धेत त्याने एक शतक आणि तीन अर्धशतके झळकावली. स्पर्धेत त्याने तब्बल ४१ चौकार आणि ३० षटकार ठोकले.






