भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना कानपूर येथील ग्रीन पार्क स्टेडियमवर खेळला जात आहे. सामन्याच्या पहिल्या दिवशी भारतीय संघाने ४ बाद २५८ धावा केल्या होत्या. सामन्याच्या दुसऱ्या दिवशी भारतीय संघ ३४५ धावांवर सर्वबाद झाला. पदार्पणवीर श्रेयस अय्यरचे शतक आणि न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज टीम साऊदी याचे पाच बळी या पहिल्या डावातील प्रमुख घटना राहिल्या.
जडेजा साहा स्वस्तात बाद
पहिल्या दिवशीच्या ४ बाद २५८ वरून भारतीय संघाने खेळाला सुरुवात केली. मात्र, रवींद्र जडेजा पहिल्या दिवशीच्या धावसंख्येत (५०) एकाही धावेची भर न घालता माघारी परतला. यष्टीरक्षक वृद्धिमान साहा दुहेरी धावसंख्या गाठू शकला नाही. मात्र, श्रेयस अय्यरने एक बाजू लावून धरत कसोटी कारकिर्दीतील पहिले शतक झळकावले. त्याने १२ चौकार व २ षटकार ठोकत १०५ धावांची खेळी केली. त्यानंतर रविचंद्रन अश्विन वगळता (३८) आणखी कोणताही फलंदाज खेळपट्टीवर टिकू शकला नाही. सामन्याच्या पहिल्या दिवशी शुबमन गिलने अर्धशतकी खेळी केली होती.
न्यूझीलंडची भेदक गोलंदाजी
भारतीय संघ ४०० धावांचा टप्पा गाठण्याच्या इराद्याने मैदानात उतरला होता. मात्र, न्यूझीलंडचा अनुभवी वेगवान गोलंदाज टीम साऊदी याने भारताचे इरादे धुळीस मिळवले. त्याने सलग ११ षटकांचा मॅरेथॉन स्पेल टाकत पहिल्या सत्रात चार बळी मिळवत आपले पंचक पूर्ण केले. त्याने श्रेयस अय्यरसह रवींद्र जडेजा, अक्षर पटेल व वृद्धिमान साहा यांना तंबूचा रस्ता दाखवला. पहिल्या दिवशी त्याने शुबमन गिल याला बाद केले होते. त्याव्यतिरिक्त जेमिसनने तीन तर फिरकीपटू एजाज पटेलने दोन बळी आपल्या नावे केले.