टीम इंडियाविरुद्ध चेन्नई कसोटीच्या पहिल्या डावात बांगलादेशची कामगिरी अत्यंत खराब झाली. नझमुल हुसेन शांतोच्या नेतृत्वाखालील संघ पहिल्या डावात 149 धावांवर ऑलआऊट झाला.
पहिल्या डावात टीम इंडियाच्या वेगवान गोलंदाजांनी धुमाकूळ घातला. भारताकडून जसप्रीत बुमराह, आकाश दीप आणि मोहम्मद सिराज यांनी अप्रतिम गोलंदाजी केली. तत्पूर्वी, टीम इंडिया पहिल्या डावात 376 धावा करून ऑलआऊट झाली होती. भारताकडे अजूनही 227 धावांची आघाडी आहे.
बांगलादेशकडून शाकिब अल हसननं सर्वाधिक 32 धावा केल्या. त्यानं 64 चेंडूंचा सामना करत 5 चौकार मारले. लिटन दासनं 42 चेंडूत 22 धावा केल्या. तर मेहंदी हसन मिराजनं नाबाद 27 धावा केल्या. कर्णधार नजमुल हुसेन शांतो 20 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. भारतीय गोलंदाजांनी सुरुवातीपासून टाकलेला दबाव कमी होऊ दिला नाही. त्यामुळे बांगलादेशचा संपूर्ण संघ 149 धावांवर गडगडला.
बांगलादेशनं नुकतेच पाकिस्तानला त्यांच्याच भूमीवर पराभूत केले होतं. संघानं दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत 2-0 ने विजय मिळवला होता. त्यामुळे ते भारतीय संघाला चांगली टक्कर देतील, असं बोललं जात होतं. परंतु ते टीम इंडियाविरुद्ध पूर्णपणे फ्लॉप झाले. चेन्नई कसोटीच्या पहिल्या डावात बांगलादेशकडून शादमान इस्लाम आणि झाकीर हसन सलामीला आले. झाकीर 3 धावा करून बाद झाला. तर शादमान 2 धावा करून तंबूत गेला. मोमिनुल हकला खातेही उघडता आलं नाही.
टीम इंडियासाठी जसप्रीत बुमराहनं घातक गोलंदाजी करत 4 बळी घेतले. त्यानं 11 षटकात 50 धावा दिल्या. तर आकाश दीपनं 5 षटकात 19 धावा देत 2 बळी घेतले. या दोघांनी बांगलादेशचं कंबरडं मोडलं. यानंतर सिराज आणि जडेजानं उर्वरित काम पूर्ण केलं. सिराजनं 10.1 षटकात 30 धावा देत 2 बळी घेतले. तर रवींद्र जडेजानं 8 षटकांत 19 धावा देत 2 बळी घेतले.
हेही वाचा –
जसप्रीत बुमराहचा आणखी एक विक्रम; झहीर खान, कपिल देव, मोहम्मद शमीच्या खास क्लबमध्ये एंट्री
ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूची कमाल! 53 वर्षांच्या वनडे इतिहासात अशी कामगिरी करणारा पहिला खेळाडू
टीम इंडियाचं टेन्शन वाढलं, बांगलादेश कसोटीत प्रमुख गोलंदाज जखमी; अर्ध्यातच मैदान सोडलं