भारत-बांगलादेश यांच्यातल्या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना शुक्रवारी (27 सप्टेंबर) कानपूरमध्ये सुरू झाला. मात्र पहिला दिवस पावसामुळे लवकर संपला.
सामन्यावर सकाळपासूनच पावसाचं सावट होतं. त्यामुळे दिवसाचा खेळ दुसऱ्या सत्रातच आटोपावा लागला. दिवसभरात एकूण 35 षटकांचा खेळ झाला, ज्यात बांगलादेशनं 107/3 धावा केल्या. भारताकडून आकाश दीपनं 2 विकेट घेतल्या. तर रविचंद्रन अश्विननं एक बळी घेतला.
कानपूर कसोटीच्या पहिल्या दोन दिवसांत मुसळधार पावसाची शक्यता आहे. गुरुवारी रात्री देखील पाऊस झाला. शुक्रवारी ओल्या मैदानामुळे नाणेफेकीला एक तास उशीर झाला. सामनाही सकाळी साडेदहा वाजता सुरू झाला. पहिलं सेशन संपल्यानंतर कव्हर्स मैदानावर आले आणि त्यानंतर दुपारी 1.25 वाजता दुसऱ्या सत्राचा खेळ सुरू झाला. मात्र, या सत्रात फारसा खेळ झाला नाही आणि केवळ 9 षटकं टाकली गेली. पहिल्या सेशनमध्ये 26 षटकांचा खेळ झाला होता. बीसीसीआयनं ‘X’ वर पोस्ट करून सांगितलं केलं की, पावसामुळे पहिल्या दिवसाचा खेळ लवकर संपला आहे.
भारतीय कर्णधार रोहित शर्मानं वेगवान गोलंदाजांसाठी अनुकूल परिस्थिती पाहून नाणेफेक जिंकल्यानंतर गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र पहिल्या काही षटकांमध्ये जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज यांना विकेट मिळाली नाही. यानंतर रोहितनं डावाच्या नवव्या षटकात चेंडू आकाश दीपकडे सोपवला. त्यानं येताच संघाला यश मिळवून दिलं.
आकाशदीपनं सलामीवीर झाकीर हसनला शून्यावर बाद केलं. तर त्याचा साथीदार शादमान इस्लामही 24 धावा करून बाद झाला. यानंतर दुसऱ्या सत्रात अश्विननं कर्णधार नजमुल हुसेन शांतोला (31) एलबीडब्ल्यू आऊट केलं. खेळ संपेपर्यंत मोमिनुल हक 40 आणि मुशफिकर रहीम 6 धावांवर नाबाद होते.
हेही वाचा –
विराट कोहलीची क्रेझ! 15 वर्षाच्या मुलानं भेटण्यासाठी चालवली चक्क 58 किमी सायकल
कानपूर कसोटीत राडा! बांगलादेशच्या चाहत्याला बेदम मारहाण, हिंसाचाराचा व्हिडिओ व्हायरल
अजबच! कानपूरमध्ये चाहत्यांच्या संरक्षणासाठी लंगूरची मदत! काय आहे प्रकरण?