भारत दौऱ्यावर न्यूझीलंड संघाला वनडे मालिकेत सपाटून पराभवाचा सामना करावा लागला. भारताने वनडे मालिका 3-0ने नावावर केली होती. मात्र, शुक्रवारी (दि. 27 जानेवारी) रांची येथे 3 सामन्यांच्या टी20 मालिकेतील पहिल्या सामन्यात न्यूझीलंडने भारतीय संघाला पराभूत करत एकप्रकारे वनडे मालिकेचा बदला घेतला. या पराभवामुळे भारतीय संघ मालिकेत 1-0ने पिछाडीवर पडला आहे. सामना पराभूत झाल्यानंतर कर्णधार हार्दिक पंड्या याने पराभवामागील कारण सांगितले.
काय म्हणाला पंड्या?
भारतीय कर्णधार हार्दिक पंड्या (Hardik Pandya) याने सामन्यानंतर पराभवाचे कारण सांगितले. यावेळी तो म्हणाला की, “कुणीच असा विचार केला नव्हता की, या खेळपट्टीवर असा खेळ होईल. दोन्ही संघ हैराण होते. मात्र, न्यूझीलंडने चांगला खेळ दाखवला. नवीन चेंडू जुन्या चेंडूच्या तुलनेत अधिक वळण घेत होता. ज्याप्रकारे चेंडूत वळण आणि उसळी होती, त्याने आम्हा सर्वांना हादरून सोडले.”
भारतीय संघाचा स्टार गोलंदाज अर्शदीप सिंग (Arshdeep Singh) याने सामन्याच्या शेवटच्या षटकात 27 धावा खर्च केल्या. त्यामुळे न्यूझीलंड संघ 176 धावांची मजल मारू शकला. दुसऱ्या डावात भारतीय संघाच्या सातत्याने विकेट्स पडल्यानंतर सूर्यकुमार यादव (47) आणि हार्दिक पंड्या (21) यांनी छोटेखानी खेळी साकारली. दोघांच्या भागीदारीने विजयाच्या आशा जागवल्या होत्या, परंतु दोघेही बाद झाल्यानंतर आशा धुळीस मिळाल्या. पंड्याने याबाबत बोलताना म्हटले की, “जोपर्यंत मी आणि सूर्या फलंदाजी करत होतो, आम्ही विचार केला होता की, आम्ही हे आव्हान पार करू. मात्र, आम्ही पहिल्या डावात धावसंख्येपेक्षा 25 धावा अधिकच्या खर्च केल्या होत्या.”
https://twitter.com/BCCI/status/1619020190414667776
वॉशिंग्टन सुंदर याने भारतीय संघासाठी धमाल कामगिरी केली. त्याने गोलंदाजीत 22 धावा देत 2 विकेट्स घेतल्या. त्यानंतर फलंदाजी करताना 28 चेंडूत 50 धावा करत अष्टपैलू कामगिरी करून दाखवली. मात्र, शेवटी भारताला पराभव पत्करावाच लागला. सुंदरच्या कामगिरीविषयी बोलताना पंड्या म्हणाला की, “ज्याप्रकारे वॉशिंग्टन सुंदर याने गोलंदाजी, फलंदाजी आणि क्षेत्ररक्षण केले, ते न्यूझीलंड विरुद्ध भारत कमी आणि न्यूझीलंड विरुद्ध वॉशिंग्टन सुंदर असे जास्त वाटत होते. जर तो आणि अक्षर पटेल ज्याप्रकारचे प्रदर्शन करत आहेत, ते तसेच कायम ठेवू शकतात. त्यामुळे भारतीय क्रिकेटला मोठा फायदा मिळेल.”
सामन्याचा आढावा
या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकत गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. यावेळी पहिल्यांदा फलंदाजी करताना न्यूझीलंडने निर्धारित 20 षटकात 6 विकेट्स गमावत 176 धावा चोपल्या होत्या. या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय संघाला फक्त 155 धावाच करता आल्या. त्यामुळे न्यूझीलंडने हा सामना 21 धावांनी जिंकला.
पुढील सामन्यात विजय मिळवणे गरजेचे
भारत विरुद्ध न्यूझीलंड (India vs New Zealand) संघात 3 सामन्यांच्या टी20 मालिकेतील दुसरा सामना रविवारी (दि. 29 जानेवारी) लखनऊ येथे खेळला जाणार आहे. या मालिकेत आव्हान कायम राखण्यासाठी भारतीय संघाला हा सामना कोणत्याही परिस्थितीत जिंकावा लागणार आहे. या सामन्यात पंड्या नवीन रणनीतीसोबत मैदानात उतरण्याचा प्रयत्न करेल. पंड्याच्या नेतृत्वात भारतीय संघाने एकही टी20 मालिका गमावली नाहीये. अशात पंड्याला हा विक्रम कायम राखण्यासाठी पुढील सामना जिंकावाच लागेल. (ind vs nz 1st T20 hardik pandya reacts to loss)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
कौतुक केलंच पाहिजे! 12 डावात न जमलेली कामगिरी सुंदरने एकाच डावात करून दाखवली, एक नजर टाकाच
भारतात टीम इंडियाला नडते फक्त न्यूझीलंडच! एकदा नव्हेतर चार वेळा करून दाखवलंय






