---Advertisement---

रोहित आणि गंभीरचा प्रयोग फसला, दुसऱ्या वनडे सामन्यात टीम इंडियाला सुधारावी लागेल ही चूक

Rohit Sharma, Gautam Gambhir
---Advertisement---

IND vs SL, Second ODI : रोहित शर्मा, विराट कोहली, श्रेयस अय्यर यांसारख्या मोठ्या खेळाडूंचे श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या वनडे सामन्यातून भारतीय वनडे संघात पुनरागमन झाले. परंतु या वरिष्ठ खेळाडूंच्या पुनरागमनानंतरही भारतीय संघाला विजयश्री फडकावता आली नाही. भारतीय खेळाडूंना विजयासाठी आवश्यक असलेली 1 धाव करता आली नाही आणि सामना बरोबरीत सुटला. या सामन्यात भारताचे प्रशिक्षक गौतम गंभीर आणि कर्णधार रोहित शर्माने नवा प्रयोग करुन पाहिला, परंतु तो फसला.

शुक्रवारी कोलंबोमध्ये 3 सामन्यांचा वनडे मालिकेतील पहिला सामना बरोबरीत सुटला. प्रथम फलंदाजी करताना श्रीलंकेने 230 धावा केल्या होत्या आणि भारतीय संघ ही धावसंख्या पार करू शकला नाही. कर्णधार रोहित शर्माने भारतीय संघाची स्फोटक सुरुवात करून विजयाचा चांगला पाया रचला. मात्र, रोहित आणि शुबमन गिल काही चेंडूतच बाद झाले. गिल बाद झाल्यानंतर विराट कोहली तिसऱ्या क्रमांकावर आला, पण रोहित बाद झाल्यानंतर गंभीरने चौथ्या क्रमांकावर एक प्रयोग केला, जो कामी आला नाही.

गंभीर-रोहितचा प्रयोग फसला
भारतीय संघाच्या फलंदाजीच्या क्रमानुसार श्रेयस अय्यर चौथ्या क्रमांकावर येणार होता, पण त्यावेळी श्रीलंकेचा युवा लेगस्पिनर दुनिथ वेल्लालगे दमदार गोलंदाजी करत होता. गिल आणि रोहितची विकेट त्यानेच घेतली होती. त्यामुळे वेल्लालगेचा सामना करण्यासाठी भारतीय संघाने श्रेयसच्या जागी अष्टपैलू वॉशिंग्टन सुंदरला बढती दिली. डावखुरा फलंदाज सुंदरच्या फलंदाजीच्या क्षमतेचे अनेकदा कौतुक केले गेले आहे आणि त्याने कसोटी क्रिकेटमध्ये अनेकदा ते दाखवून दिले आहे, परंतु ही चाल वनडेत कामी आली नाही. सुंदर 4 चेंडूत केवळ 5 धावा करून बाद झाला.

जर या सामन्यात भारतीय संघाने रिषभ पंतला खेळवले असते तर याची गरजच पडली नसती. त्याच्या अनुपस्थितीत भारतीय संघाकडे फक्त दोन डावखुऱ्या फलंदाजीचे पर्याय होते आणि इथेच गौतम गंभीर-रोहित शर्माने चूक केली. वास्तविक, सुंदरशिवाय भारतीय संघाकडे अक्षर पटेलला पाठवण्याचा पर्यायही होता आणि त्याचा अलीकडचा फॉर्म लक्षात घेता त्याला पाठवायला हवे होते.

अक्षरने बॅटने कमाल केली आहे
गेल्या काही सामन्यांमध्ये भारतीय संघाने अक्षरवर खूप विश्वास दाखवला होता आणि त्याने फलंदाजीमध्ये हा विश्वास खराही ठरवला. टी20 विश्वचषकात अक्षरला 2-3 सामन्यांमध्ये चौथ्या किंवा पाचव्या स्थानावर बढती मिळाली, ज्यामध्ये त्याने पाकिस्तानविरुद्ध 20 धावांची महत्त्वपूर्ण खेळी खेळली होती. त्यानंतर अंतिम सामन्यात पाचव्या स्थानावर खेळताना त्याने 47 धावांची स्फोटक खेळी कोली होती. अशा परिस्थितीत फॉर्म आणि आत्मविश्वास लक्षात घेता अक्षर चौथ्या क्रमांकासाठी चांगला पर्याय ठरला असता. आता मालिकेच्या पुढील 2 सामन्यांमध्ये अशी गरज निर्माण झाल्यास गंभीर आणि रोहित कोणता निर्णय घेतील?, हे पाहावे लागेल.

महत्त्वाच्या बातम्या-

दीपिका कुमारीचं स्वप्न पुन्हा भंगलं, तिरंदाजीतील भारताचं आव्हान संपुष्टात
आर अश्विनचा फलंदाजीत कहर! सलामीला येऊन अवघ्या 30 चेंडूत फिरवला सामना
दुसऱ्या एकदिवसीय सामन्यासाठी पाहा भारतीय संघाची संभावित प्लेइंग 11

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---