बुधवारी (11 डिसेंबर) वानखेडे स्टेडियम, मुंबई (Wankhede Stadium, Mumbai) येथे 3 सामन्यांच्या टी20 मालिकेतील (3 Matches T20 Series) अंतिम आणि निर्णायक सामना भारत विरुद्ध विंडीज (India vs Windies) संघात पार पडला. या सामन्यात भारताने 67 धावांनी विजय मिळवत मालिका 2-1 ने जिंकली.
भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने (Virat Kohli) उत्कृष्ट फलंदाजी करत 29 चेंडूत नाबाद 70 धावांची अर्धशतकी खेळी केली. या खेळीत त्याने 4 चौकार आणि 7 षटकार ठोकले. ही खेळी त्याने पत्नी अनुष्का शर्माला (Anushka Sharma)समर्पित केली आहे.
11 डिसेंबरला कोहली आणि अनुष्का शर्मा यांच्या लग्नाचा दुसरा वाढदिवस होता. त्यामुळे विराटने ही खेळी आपल्या पत्नीसाठी खास भेट म्हणून दिल्याचे सांगितले आहे.
सामन्यानंतर विराट म्हणाला की, “ही एक अतिशय विशेष खेळी होती आणि आमच्या लग्नाचा दुसरा वाढदिवसदेखील होता. ही एक विशेष भेट होती. ही एक खास रात्र होती आणि मी खेळलेल्या खेळींपैकी एक सर्वोत्तम खेळी होती,” असे विराट म्हणाला.
11 डिसेंबर, 2017 रोजी इटलीच्या टस्कनी (Tuscany, Italy) येथे विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांचा विवाह पार पडला होता.
“आम्ही प्रथम फलंदाजी करताना जिंकलो, खरोखरच चांगले वाटले. मला माहित आहे की मी क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात योगदान देऊ शकतो. आता विश्वचषक येणार आहे, त्यामुळे ही एक प्रेरणा आहे,” असे कोहली म्हणाला.
“सामन्यात माझा भाग महत्वाचा ठरतो कारण मला दोन भूमिका निभवाव्या लागतात. जेव्हा आपण काही काळासाठी टी20 क्रिकेट खेळत नसाल आणि परत येऊन असे खेळता, तेव्हा हे चांगले वाटते,” असेही विराट म्हणाला.
भारत आणि विंडीज संघ आता 15 डिसेंबर (चेन्नई), 18 डिसेंबर (विशाखापट्टणम) आणि 22 डिसेंबर (कटक) येथे 3 वनडे सामने खेळणार आहेत.






