तिरुअनंतपुरम | आज (1 नोव्हेंबर) भारत विरुद्ध विंडीज यांच्यात झालेल्या पाचव्या वनडे सामन्यात भारतीय संघाने 9 विकेट्ने मोठा विजय मिळवला आहे. यावेळी भारताकडून सलामीवीर रोहित शर्मा आणि कर्णधार विराट कोहलीने नाबाद अनुक्रमे 63 आणि 33 धावा केल्या.
भारताच्या या विजयात भारतीय गोलंदाजाचा महत्त्वाचा वाटा आहे. यावेळी नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजीला आलेल्या विंडीज संघाला भारतीय गोलंदाजांनी सळो की पळो करून सोडले होते.
आश्चर्याची गोष्ट म्हणजे भारताच्या पाचही गोलंदाजांना विकेट्स घेण्यात आज यश आले. तसेच या पाचही जणांनी प्रत्येकी एक षटक निर्धाव टाकले.
यामध्ये फिरकी गोलंदाज रविंद्र जडेजाने सर्वाधिक 4 विकेट घेतल्या. 9.5 षटके टाकताना त्याने 34 धावा दिल्या. त्याला जसप्रीत बुमराह आणि खलील अहमद यांनी प्रत्येकी 2-2 विकेट्स घेत चांगली साथ दिली. तसेच भुवनेश्वर कुमार आणि कुलदिप यादव यांनाही प्रत्येकी एक विकेट घेण्यात यश आले.
भारतीय गोलंदाजापुढे विंडीजचा संघ 31.5 षटकातच 104 धावा करत सर्वबाद झाला. या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताला शिखर धवनच्या रूपात पहिला धक्का बसला. मग तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या विराटने रोहितच्या सोबत 14.5 षटकातच सामना जिंकला.
यामुळे भारताने पाच सामन्यांची ही वनडे मालिका 3-1 अशी जिंकली.
महत्त्वाच्या बातम्या:
–ती एक धाव आणि ती एक विकेट… धोनी-भुवीला पडली भलतीच महागात
–एकवेळ क्रिकेट गाजवणाऱ्या सर्वच दिग्गजांचे विक्रम रोहितने आरामात घातले खिशात
–विराट कोहलीने त्या हॉटेलच्या विजीटींग बुकमध्ये नक्की काय लिहले?






