15 ऑगस्ट हा दिवस प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाचा आणि भावना जागवणारा आहे. स्वातंत्र्य दिन हा केवळ ध्वजारोहण आणि परेडपुरता मर्यादित नसून, त्याचा ठसा खेळाच्या मैदानावरही उमटतो. भारतीय क्रिकेट संघाने अनेकदा या दिवशी मैदानात उतरून देशभक्तीचा जाज्वल्य संदेश दिला आहे.
भारताला 15 ऑगस्ट 1947 रोजी ब्रिटिश सत्तेतून स्वातंत्र्य मिळाले आणि त्यानंतर अवघ्या 5 वर्षांनी क्रिकेटच्या मैदानावरही हा दिवस साजरा झाला. 1952 साली भारताने इंग्लंडविरुद्ध पहिल्यांदाच टेस्ट सामना खेळला. 14 ऑगस्टपासून सुरू झालेला हा सामना स्वातंत्र्य दिनीही सुरू होता आणि अखेरीस ड्रॉ झाला.
यानंतर बराच काळ टीम इंडियाला 15 ऑगस्ट रोजी टेस्ट खेळण्याची संधी मिळाली नाही. 2001 मध्ये श्रीलंकेविरुद्ध ही मालिका पुन्हा सुरू झाली, पण भारताला 10 विकेट्सनी पराभव स्वीकारावा लागला. 2014 मध्ये इंग्लंडविरुद्धचा सामना 15 ऑगस्टला झाला आणि भारताला डाव व 244 धावांनी हार मिळाली. 2015 मध्ये श्रीलंकेविरुद्ध खेळताना देखील भारताला पराभवाचा सामना करावा लागला. मात्र, 2021 मध्ये लॉर्ड्सच्या मैदानावर भारताने इंग्लंडवर 151 धावांनी ऐतिहासिक विजय मिळवत तिरंगा उंचावला.
2019 मध्ये वेस्टइंडीज दौर्यावर तिसरा वनडे 14 ऑगस्टला सुरू झाला आणि 15 ऑगस्टला (भारतीय वेळेनुसार) संपला. पावसामुळे डकवर्थ-लुईस नियमाने भारताने हा सामना 6 विकेट्सने जिंकत स्वातंत्र्य दिनी आणखी एक विजय आपल्या नावावर केला.






