भारत आणि वेस्ट इंडिज (INDvWI ODI Series) संघांमध्ये अहमदाबाद येथे तीन सामन्यांची वनडे मालिका खेळली जात आहे. मालिकेतील पहिले दोन सामने जिंकून यजमान संघाने विजयी आघाडी मिळवली. बुधवारी (९ फेब्रुवारी) झालेल्या मालिकेतील दुसऱ्या सामन्यात भारतीय संघाने दमदार कामगिरी करत ४४ धावांनी विजय मिळवला. या विजयासह भारतीय संघाने नव्या विक्रमाला गवसणी घातली आहे.
भारतीय संघाने मिळवला दणदणीत विजय
मालिकेतील पहिल्या सामन्यात भारतीय संघाने वेस्ट इंडिजला ६ गडी राखून पराभूत केले होते. दुसऱ्या सामन्यातही भारतीय संघाने सांघिक कामगिरीच्या जोरावर वेस्ट इंडीजला धूळ चारली. सूर्यकुमार यादवच्या ६४ व केएल राहुलच्या ४९ धावांच्या जोरावर भारतीय संघाने निर्धारित ५० षटकात २३७ धावा केल्या होत्या. त्याच्या प्रत्युत्तरात वेस्ट इंडीज संघ मागे राहिला. प्रसिद्ध कृष्णा याने चार बळी मिळवत वेस्ट इंडीज संघाचे कंबरडे मोडले. इतर गोलंदाजांनी त्याला सुरेख साथ दिली. भारतीय गोलंदाजांनी ४६ षटकांमध्ये १९३ धावांत वेस्ट इंडीजला सर्वबाद करत ४४ धावांनी विजय संपादन केला. चार बळी मिळवणाऱ्या कृष्णा याला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले.
भारताच्या नावे अनेक विक्रम
भारतीय संघाने वेस्ट इंडीजला सलग सातव्या तर एकूण अकराव्या वनडे मालिकेत पराभूत केले. वेस्ट इंडिज संघ भारताला अखेरच्या वेळी २००६ मध्ये वनडे मालिकेत पराभूत करण्यात यशस्वी ठरलेला. मे २००६ मध्ये वेस्ट इंडीजने भारताला ४-१ असे पराभूत केले होते. याच बरोबर एका संघाला सर्वाधिक वेळा द्विपक्षीय वनडे मालिकेत पराभूत करण्याच्या विश्वविक्रमाची देखील बरोबरी केली. पाकिस्तानने झिम्बाब्वे संघाला ११ वेळा वनडे मालिकेत पराभूत करण्याचा कारनामा केला आहे. मालिकेतील तिसरा व अखेरचा सामना ११ फेब्रुवारी रोजी नरेंद्र मोदी स्टेडियम अहमदाबाद येथे खेळला जाईल. यानंतर उभय संघांमध्ये तीन सामन्यांची टी२० मालिका खेळली जाणार आहे.
महत्वाच्या बातम्या-
VIDEO: डीआरएस घेण्याच्या बाबतीत हिटमॅनची धोनीला टक्कर; दुसऱ्या सामन्यातही अचूक राहिले निर्णय
सनरायझर्स हैदराबादची आघाडी! आयपीएल २०२२ साठी लॉन्च केली जर्सी; सात वर्षांनी केला बदल
विराटला मिळणार डच्चू? ‘या’ खेळाडूंची लागू शकते तिसऱ्या क्रमांकावर वर्णी