सध्या संपूर्ण भारत देशात कोरोनाच्या रुग्णांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. या कारणाने अनेक देशांनी भारताचा समावेश रेड लिस्टमध्ये केला असून, भारतातून येणाऱ्या नागरिकांवर निर्बंध लादण्यात आली आहे. मात्र, पुढील महिन्यात इंग्लंड दौऱ्यावर जाणाऱ्या भारतीय संघासाठी खूषखबर आली आहे. भारत आणि पाकिस्तानच्या खेळाडूंना इंग्लंडमध्ये येण्यास परवानगी दिली गेली आहे. भारतीय संघ पुढील महिन्यात इंग्लंडमध्ये जागतिक कसोटी चॅम्पियनशिपचा अंतिम सामना खेळेल. तसेच, यानंतर भारताला यजमान इंग्लंड विरुद्ध पाच कसोटी सामन्यांची मालिका खेळायची आहे.
खेळाडूंना विलगीकरणात राहावे लागणार नाही
इंग्लंडमधील प्रमुख वृत्तपत्र असलेल्या इव्हिनिंग स्टॅंडर्डच्या वृत्तानुसार, भारत आणि पाकिस्तानातून येणाऱ्या खेळाडूंना सरकारी विलगीकरण केंद्रात राहावे लागणार नाही. हे खेळाडू साऊदम्टन येथील रोज बाऊल येथे थांबू शकतात. याच मैदानावर भारत न्यूझीलंड विरुद्ध १८ जूनपासून जागतिक कसोटी चॅम्पियनशिपचा अंतिम सामना खेळेल. त्यानंतर भारतीय महिला क्रिकेट संघ देखील इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे. येथे महिला संघाला एक कसोटी व प्रत्येकी ३ वनडे आणि ३ टी२० सामने खेळायचे आहेत.
कुटुंब नाही नेता येणार सोबत
रेड लिस्टमधील देशातून येणाऱ्या खेळाडूंसाठी विलगीकरणाचे नियम कडक असतील. तर, ग्रीन लिस्टमधील देशातून येणाऱ्या खेळाडूंसाठी काही सुट असेल. न्यूझीलंडचा समावेश ग्रीन लिस्टमध्ये आहे व त्यांचे खेळाडू इंग्लंडमध्ये दाखल झाले आहेत. सध्या क्रिकेटपटूंना आपल्या कुटुंबातील सदस्यांना इंग्लंडला नेता येणार नाही. मात्र, याबाबत चर्चा सुरू आहे. भारतीय संघ जवळपास चार महिने इंग्लंडमध्ये राहणार असल्याने ते कुटुंबाला सोबत नेऊ इच्छितात.
द हंड्रेडसाठी असेल वेगळी नियमावली
सध्या मिळालेली सुट केवळ आंतरराष्ट्रीय सामन्यांसाठी आहे. जुलै महिन्यात सुरू होणाऱ्या ‘द हंड्रेड’ लीगचा यात समावेश नाही. त्यामुळे पाकिस्तान आणि दक्षिण आफ्रिकेच्या खेळाडूंच्या सहभागावर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. या स्पर्धेसाठी पाच भारतीय महिलांची देखाल निवड झाली आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
आयपीएलमध्ये भावासमोर गोलंदाजी करताना सॅम करनची ‘अशी’ झाली होती अवस्था, स्वतः केला खुलासा
पोहचले एकदाचे! आयपीएल स्थगितीनंतर दोन आठवड्यांची प्रतिक्षा संपवून ऑस्ट्रेलियन सदस्यांची अखेर घरवापसी






