---Advertisement---

आठवणीतील सामना: भारताने जेव्हा सलग चौथ्यांदा विश्वचषक जिंकण्याच्या ऑस्ट्रेलियाच्या इराद्यावर फेरले होते पाणी

---Advertisement---

भारतीय उपखंडात 2011 साली भारत, श्रीलंका आणि बांगलादेशमध्ये क्रिकेटचा दहावा विश्वचषक खेळला गेला. यजमान भारत आणि श्रीलंकेसह दक्षिण आफ्रिका व ऑस्ट्रेलियाला या विश्वचषकाचे संभाव्य विजेते मानले गेले होते. साखळी फेरीत अटीतटीची लढत झाल्यानंतर उपांत्यपूर्व फेरीचे चित्र स्पष्ट झाले. चार वेळा विश्वचषक विजेता ठरलेला ऑस्ट्रेलिया दुसऱ्या उपांत्य सामन्यात भारताशी भिडणार होता.

पहिल्या उपांत्यपूर्व सामन्यात पाकिस्तानने वेस्ट इंडिजला पराभूत करत उपांत्य फेरीत जाणारा पहिला संघ होण्याचा मान मिळवला. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील विजेता पाकिस्तानशी खेळणार होता. भारत-पाकिस्तान अशा कट्टर प्रतिस्पर्ध्यांचा उपांत्य सामना व्हावा अशी क्रीडाप्रेमींचे अपेक्षा होती.

अहमदाबादच्या मोटेरा स्टेडियमवर 24 मार्च 2011 रोजी भारत आणि ऑस्ट्रेलिया दुसऱ्या उपांत्यपूर्व सामन्यात मैदानात उतरले. सलग तिसऱ्या विश्वचषकात रिकी पाँटिंग ऑस्ट्रेलियाचे नेतृत्व करत होता. त्याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. शेन वॉटसन व यष्टीरक्षक ब्रॅड हॅडिन ही नवी सलामी जोडी मैदानात उतरली. वॉटसन 25 धावा काढून परतल्यानंतर रिकी पॉंटिंग फलंदाजीला आला. हॅडिनने अर्धशतक झळकावले. मात्र, संपूर्ण विश्वचषकात भारतीय संघासाठी संकटमोचक ठरत असलेल्या युवराज सिंगने त्याला बाद केले. त्यानंतर मात्र, ऑस्ट्रेलियाच्या डावाची घसरगुंडी झाली. मायकल क्लार्क 8, माइक हसी 3 व कॅमेरून व्हाइट 12 धावा काढून माघारी परतले.

आपले साथीदार एकापाठोपाठ एक बाद होत असतानाही रिकी पॉंटिंग आपल्या अनुभवाच्या जोरावर भारतीय गोलंदाजांचा सामना करत होता. त्याने एक दर्जेदार खेळी करत आपले शतक पूर्ण केले. तो वैयक्तिक 104 धावांवर बाद झाल्यानंतर अखेरच्या षटकात डेव्हिड हसीने थोडीफार फटकेबाजी केल्यामुळे ऑस्ट्रेलियाने 260 अशी सन्मानजनक धावसंख्या उभारली.

ऑस्ट्रेलियाप्रमाणे भारताच्या डावाची सुरुवात देखील निराशाजनक झाली. वीरेंद्र सेहवाग केवळ 15 धावा बनवू शकला. सचिन तेंडुलकर व गौतम गंभीर यांनी वैयक्तिक अर्धशतके झळकावून भारतीय संघाला संकटातून बाहेर काढले. मात्र सचिन, गंभीर, कोहली व धोनी नियमित अंतराने बाद झाले आणि सामना पुन्हा ऑस्ट्रेलियाच्या बाजूने झुकला. ऑस्ट्रेलिया भारताला घरच्या मैदानावर पराभूत करणार की काय अशी परिस्थिती निर्माण झाली.

https://twitter.com/cricketworldcup/status/1374710198007369728

कर्णधार धोनी बाद झाला तेव्हा भारतीय संघाची धावसंख्या होती 37.3 षटकात 5 बाद 187. खेळपट्टीवर या स्पर्धेत तुफान फॉर्ममध्ये असणारा युवराज व या विश्वचषकातील आपला पहिला सामना खेळणारा सुरेश रैना मैदानावर होता. विजयासाठी आणखी 74 धावांची गरज होती. भारताचे स्पेशालिस्ट फलंदाज म्हणून हे दोघेच शिल्लक होते. दोघांनीही समजदारीने खेळत टप्प्यात आलेल्या चेंडूवर धावा लुटण्यास सुरुवात केली. रैना-युवराज जोडीने ब्रेट ली, शॉन टेट व मिचेल जॉन्सन या अस्सल वेगवान तिकडीची मनसोक्त धुलाई केली. दोघांनी नाबाद भागीदारी करत14 चेंडू आधीच विजय भारताच्या पारड्यात टाकला.

युवराजने ब्रेट लीला कव्हर्समधून मारलेला चौकार व त्यानंतर गुडघ्यावर बसून केलेले सेलिब्रेशन कोणताही क्रिकेटप्रेमी विसरणार नाही. याच सामन्यात कपाळावरून रक्त येत असतानाही ब्रेट लीने देशासाठी त्वेषाने केलेली गोलंदाजी एका खेळाडूचा उत्साह दाखवते. भारताने या सामन्यात विजय मिळवत उपांत्य फेरीत पाकिस्तानविरुद्ध खेळण्याची जागा पक्की केली. दुसरीकडे, ऑस्ट्रेलियावर 1992 विश्वचषकानंतर प्रथमच विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत सहभागी न होण्याची नामुष्की ओढवली. युवराज सिंगने सलग दुसऱ्या सामन्यात भारताच्या विजयात नायकाची भूमिका वठवली होती. भारताच्या या विजयाबरोबरच ऑस्ट्रेलियाचे सलग चौथ्यांदा विश्वचषक जिंकण्याचे स्वप्न मात्र भंग पावले होते.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
आयपीएल 2023 मध्ये धोनी दिसणार नवीन भूमिकेत! व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल
‘या’ दोन व्यक्तींवर सोपवली गेली बुमराहच्या पुनरागमनाची जबाबदारी! कोच-कॅप्टनलाही नाही मिळणार अपडेट

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---