---Advertisement---

‘हा’ खेळाडू संघात असता तर भारताने जिंकला असता २०१९ सालचा विश्वचषक; वनडेत ठोकलेत ३ शतक

On: शनिवार, ऑगस्ट 22, 2020 6:49 PM
---Advertisement---

भारतीय संघाचा माजी फलंदाज सुरेश रैनाने म्हटले आहे की, अंबाती रायडू २०१९ सालच्या वनडे विश्वचषकात भारतीय संघाकडून चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करण्यासाठी असायला पाहिजे होता. २०१९ सालच्या विश्वचषकात भारताचा उजव्या हाताचा फलंदाज रायडूला संघात स्थान देण्यात आले नव्हते.

एवढेच नाही तर, विश्वचषकादरम्यान संघातील काही खेळाडूंना दुखापत झाली होती, तरीही त्याला संधी देण्यात आली नव्हती. त्यामुळे रायडूने जुलै २०१९ला क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती जाहीर केली होती. पण, काही दिवसांनंतर तो देशांतर्गत क्रिकेटमध्ये खेळताना दिसला.

रायडूविषयी बोलताना रैना म्हणाला की, “रायडू भारतीय संघातील चौथ्या क्रमांकासाठीचा प्रबळ दावेदार होता. कारण, तो यासाठी खूप मेहनत करत होता. त्याला जेवढी संधी मिळाली, तेवढ्यात त्याने त्याचे उत्कृष्ट दिले. तरीही तो जिथे असायला पाहिजे तिथे पोहोचू शकला नाही.”

२०१८ सालच्या यो-यो टेस्टमध्ये (फिटनेस टेस्ट) फेल झाल्यामुळे रायडूला इंग्लंड दौऱ्यावर जाण्याची संधी मिळाली नव्हती. याविषयी बोलताना रैना म्हणाला की, “मी २०१८सालच्या इंग्लंड दौऱ्याचा आनंद लुटू शकलो नाही. कारण, रायडू फिटनेस टेस्टमध्ये फेल झाल्यानंतर संघातील वातावरण वेगळेच झाले होते. मला खूप वाईट वाटत होते. कारण, रायडूला फेल करुन त्याच्याजागी मला संघात स्थान देण्यात आले होते.”

रैनाने पुढे बोलताना रायडू हा भारतीय संघातील चौथ्या क्रमांकासाठी सर्वोत्कृष्ट फलंदाज असल्याचे सांगितले. “जर तो गतवर्षीच्या वनडे विश्वचषकात भारतीय संघाचा भाग असता, तर भारताने विश्वचषकावर आपले नाव कोरले असते,” असेही त्याने म्हटले. रायडूने त्याच्या वनडे कारकिर्दीत ५५ सामने खेळत ३ शतकांच्या मदतीने १६९४ धावा केल्या आहेत.

काही दिवसांपुर्वी चेन्नई येथे चेन्नई सुपर किंग्स (सीएसके) संघाचा सराव शिबिर आयोजित करण्यात आला होता. या शिबिरात रायडूला फलंदाजी करताना पाहून रैना खूप खुश झाला. रायडू आणि रैना हे आयपीएलच्या सीएसके संघाचा भाग आहेत. १९ सप्टेंबरपासून युएईत खेळल्या जाणाऱ्या आयपीएल २०२०मध्ये हे दोन्ही खेळाडू खेळताना दिसतील.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---